Home > News Update > महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय?

महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय?

महाराष्ट्रातील कोरोनावाढीमुळे आरोग्यव्यवस्था कोसळून पडली असताना आता कोरोनाचा प्रादुर्भाव इतर राज्यांमध्ये देखील वाढत आहे. सोशल मीडियावर प्रबोधनात्मक संदर्भात पोस्ट करणारे आमदार रोहित पवार यांनी नव्या कोरोना विषाणुबाबत शास्त्रीय माहिती पुन्हा एकदा सोशल मीडियावर शेअर केली आहे नक्की वाचा..

महाराष्ट्रात कोरोना का वाढतोय?
X

जिनोम सिक्वेन्सिंगसाठी घेतलेल्या महाराष्ट्रातील ३६१ नमुन्यांपैकी ६१% नमुन्यांमध्ये डबल म्यूटेशन असल्याचे पुण्याच्या 'एनआयव्ही'मधील अधिकाऱ्यांनी दोन दिवसांपूर्वीच स्पष्ट केलं. केंद्रीय आरोग्य मंत्रालयानेही किमान दहा राज्यांमध्ये डबल म्यूटेशन चे नमुने आढळल्याचे स्पष्ट केले आहे. अचानक वाढणाऱ्या रुग्णसंख्येमागे डबल म्यूटेशनही कारणीभूत असल्याची शक्यता गेल्या काही दिवसांपासून अनेक आरोग्य तज्ज्ञांनी वर्तवली होती.

भारतात आढळलेल्या B.1.617 या डबल म्यूटेशन व्हेरियंटमध्ये ब्राझील, आफ्रिकन प्रकारचा E484Q आणि कॅलिफोर्निया प्रकारचा L452R हे दोन व्हेरियंट आढळले असल्याची माहिती मिळतेय. घरफोडी करण्यात सराईत असलेल्या एखाद्या चोरांच्या टोळीला जर सायबर क्राईम करणारी टोळी येऊन मिळाली तर दोन्ही टोळ्या मिळून नवी तयार होणारी टोळी मोठ्या प्रमाणात धुमाकूळ माजवू शकते त्याप्रमाणे ब्राझील, आफ्रिकन व्हेरियंट मानवी शरीरात अत्यंत सहजरित्या प्रवेश करून अत्यंत वेगाने पसरतात तर कॅलिफोर्निया व्हरियंट शरीराची प्रतिकारशक्ती कमी करतो. परिणामी डबल म्यूटेशन व्हेरियंट वेगाने तर पसरणारा आहेच शिवाय प्रतिकारशक्ती आणि लसीचा प्रभाव यावरही परिणाम करू शकतो. त्यामुळं डबल म्यूटेशन व्हेरियंट हा नक्कीच चिंता करण्याचा विषय आहे.

आपल्या देशात आढळलेला डबल म्यूटेशन व्हेरियंट काही दिवसांपूर्वी अमेरिका, जर्मनी, युके, आस्ट्रेलिया या देशांमध्येही आढळला होता. जर्मनी मध्ये सद्यस्थिती अतिशय गंभीर आहे तर फ्रान्समध्ये मृत्यूंची संख्या एक लाखाच्या जवळ पोहचलीय. ब्रिटनमध्ये लसीकरण मोठ्या प्रमाणात झाल्याने त्या ठिकाणी परिस्थिती बऱ्यापैकी नियंत्रणात आहे.

आफ्रिकेत आलेल्या दुसऱ्या लाटेत मृत्युदर मोठ्या प्रमाणात वाढला होता.पहिली लाट ज्या देशांमध्ये तीव्र नव्हती त्या देशांमध्ये दुसऱ्या लाटेची तीव्रता मात्र खूप असल्याचं दिसतं. महाराष्ट्रात बघितलं तर पहिल्या लाटेत काही जिल्ह्यामध्ये रुग्णसंख्या नव्हती मात्र दुसऱ्या लाटेत त्या जिल्ह्यांमध्ये मोठी रुग्णसंख्या पहायला मिळाली. महाराष्ट्रात आरोग्य यंत्रणा सक्षम असल्याने तसेच गेल्या वर्षभरात आरोग्य यंत्रणा अधिक गतिमान झाल्याने तसेच लोकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याने कोरोनाचे घातक परिणाम आपण रोखू शकत आहोत. भविष्यातही आपल्याला आणखी दक्षता घ्यावी लागणार आहे. आज देशात काहीशी आफ्रिकेतील दुसऱ्या लाटेसारखी परिस्थिती दिसत असून उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड या राज्यांमध्येही रुग्ण संख्या झपाट्याने वाढताना दिसतेय. त्यामुळं या राज्यांनी आता अधिक सतर्क राहण्याची वेळ आली आहे.

गेल्या आठवड्यात केंद्रीय आरोग्य मंत्र्यांनी महाराष्ट्रात वाढणाऱ्या रुग्णसंख्येला राज्य सरकारची अकार्यक्षमता जबाबदार असून देशाच्या कोरोना विरुद्धच्या लढाईत महाराष्ट्र अडचणीचा ठरत असल्याचे अत्यंत दुर्दैवी विधान केले. मग हाच निकष लावायचा तर आज इतर राज्यांमध्ये वाढणारी रुग्णसंख्या पहिली तर त्यासाठी तेथील राज्य सरकारे जबाबदार आहेत, असं ते म्हणणार का?

एखादा चोर तुरुंगात गेल्यावर तिथं इतर चोरांकडून नवनवीन कौशल्ये शिकून अजून सराईत चोर बनण्याची शक्यता असते त्याप्रमाणे कोव्हीडचा प्रसार जितका जास्त होईल तितके म्युटेशन्स जास्त वाढून हा व्हायरस अजूनच वेगवेगळी रूपे धारण करण्याची शक्यता वाढते. जिनोम सिक्वेन्सिंग या तंत्राचा वापर करून शास्त्रज्ञांना व्हायरस मधील हे बदल ओळखता येतात. हे बदल दरवेळेस हानिकारक असतातच असं नाही. मात्र काही वेळेस या बदलांमुळे (म्युटेशन्स मुळे) व्हायरस जास्त घातक किंवा जास्त वेगाने प्रसार करणारा बनतो.

जगभरात कोरोनाचे नवे स्ट्रेन्स, व्हेरियंट आढळत असताना आपणही काळजी घ्यायला हवी होती, संशोधन करायला हवं होतं, परंतु दुर्दैवाने तसं झालं नाही. आपल्या देशात Genome sequencing साठी डिसेंबर अखेरीस हालचाली सुरु झाल्या. प्रत्येक राज्यातील किमान ५% नमुन्यांचे तर विदेशातून येणाऱ्या नागरिकांच्या सर्वच नमुन्यांची Genome sequencing करण्यास केंद्राने सांगितलं परंतु आतापर्यंत केवळ १२ ते १३ हजार नमुन्यांची sequencing करण्यात आली आहे. नवे स्ट्रेन्स, व्हेरियंट ओळखण्यात आपण अपयशी ठरलो ही वस्तुस्थिती आहे. असो, परंतु येणाऱ्या काळात याबाबतीत असं निष्काळजी राहून चालणार नाही, अन्यथा त्याची मोठी किंमत चुकवावी लागेल.

आरोग्य हा जरी राज्यांचा विषय असला तरी कोरोनाचे जागतिक संकट बघता केंद्र सरकारने नेतृत्व स्वीकारत राज्यांना आवश्यक ते सहकार्य करणं गरजेचं होतं. सुरवातीच्या काळात केंद्राने याबाबत नेतृत्व केलं पण जसजसी रुग्णसंख्या वाढून परिस्थिती हाताबाहेर जायला लागली, तेंव्हा मात्र केंद्र सरकारने पद्धतशीरपणे बाजूला होत राज्यांवर जबाबदारी ढकलून दिली. यंदाच्या जानेवारी महिन्यात रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर कमी झाली तेंव्हा केंद्र सरकार पुन्हा सक्रीय झाले आणि देशाने कोरोनावर विजय मिळवल्याचे आपल्या नेतृत्वाने जाहीर करून टाकले.

गुजरात सरकार कोरोना रुग्णांची देत असलेली आकडेवारी आणि प्रत्यक्षात असलेल्या रुग्णांची संख्या यात तफावत असल्याचं गुजरात उच्च न्यायालयाने कालच म्हटलंय. काही राज्यांमध्ये तर मृत्यूंची आकडेवारीही लपवली जात असल्याचं अनेक ठिकाणी निदर्शनास आलंय. महाराष्ट्रात रुग्णसंख्या जरी जास्त असली तरी आपली आकडेवारी मात्र पारदर्शक आहे आणि हीच पारदर्शकता आपल्याला या संकटावर मात करण्यास मदत करणार आहे. आज कोरोना विरुद्धच्या लढाईत आकडेवारीची पारदर्शकता तसेच संयमी आणि संकटाचे गांभीर्य असलेले नेतुत्व गरजेचं आहे. सुदैवाने या दोन्ही गोष्टी महाराष्ट्रात तरी आहेत.

कोरोनाचे नवे स्ट्रेन्स, व्हरियंट अत्यंत घातक असून त्यांचा प्रसाराचा वेग प्रचंड आहे. त्यामुळं नागरिकांनाही गांभीर्याने वागणं गरजेचं आहे. विनाकारण बाहेर न फिरणे, आरोग्य यंत्रणा, पोलीस यंत्रणा यांच्या सूचना पाळून स्वतःची काळजी घेणं गरजेचे आहे. सर्वांनी सहकार्य केलं तरंच कोरोनाची ही साखळी आपण तोडू शकतो, याचं भान सर्वानीच ठेवायला हवं.

Updated : 16 April 2021 10:25 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top