Home > News Update > "मी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेलो होतो" : पंतप्रधान नरेंद्र मोदी

"मी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेलो होतो" : पंतप्रधान नरेंद्र मोदी

पंधरा महीन्यांच्या खंडानंतर परदेश दौर्यावर गेलेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अजब दावा केला असून त्यामुळे सोशल मिडीयावर मीम्सचा पाऊस पडत आहे. बांगलादेशला स्वातंत्र्य मिळावं म्हणून मी सुद्धा लढ्यात उतरलेलो, मला अटकही झाली होती अदा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बांगलादेशाच्या ५० व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होताना केला आहे.

मी बांगलादेशाच्या स्वातंत्र्यासाठी तुरुंगात गेलो होतो : पंतप्रधान नरेंद्र मोदी
X

पंतप्रधान झाल्यापासून जगभरातील ६० देशांचे १०८ परदेश दौरे करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी गेली कोरोनामुळे सलग १५ महीने भारतातच होते. आज सकाळी त्यांनी दिल्लीतून बांगलादेशासाठी उड्डान केलं होतं. पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसीय बांगलादेश दौऱ्यावर बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या ५० वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी पोहचले आहेत.

बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी विमानतळावर त्यांचे स्वागत केले. मोदींना तिथे गार्ड ऑफ ऑनर देखील दिला गेला आहे. या ठिकाणी पोहचल्यानंतर सर्वप्रथम पंतप्रधान मोदी यांनी ढाकामधील सावर येथील शहीद स्मारकास भेट दिली. या ठिकाणी त्यांनी वृक्षारोपण केलं व तेथील व्हिजिटर्स बुकमध्ये संदेश लिहून स्वाक्षरी केली.

यानंतर ढाका येथील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले, "मी बांगलादेशातील बंधू व भगिनींना आणि येथील तरूण पिढीला अभिमानाने आठवण करून देऊ इच्छितो की, बांगलादेशच्या स्वातंत्र्यलढ्यात भाग घेणे, हे माझ्या आयुष्यातील पहिल्या आंदोलनांपैकी एक होतं. माझे वय २०-२२ वर्ष असेल जेव्हा मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी बांगलादेशच्या लोकांच्या स्वातंत्र्यासाठी सत्याग्रह केला होता. तेव्हा मला अटकही झाली होती व तुरूंगात जाण्याचीही वेळ आली होती."

तसेच, "मी आज भारताच्या शूर सैनिकांना सॅल्यूट करतो, जे मुक्तीयुध्दामध्ये बांगलादेशच्या बंधू-भगिनींसोबत उभे राहिले. मला आनंद आहे की, बांगलादेश मुक्तीसंग्रमात भाग घेतलेले अनेक भारतीय सैनिक आज या कार्यक्रमास उपस्थित आहेत." असं देखील मोदींनी यावेळी म्हटलं आहे.

यावेळी पंतप्रधान मोदी यांनी शेख मुजीबुर रहमान यांना मरणोत्तर गांधी शांती पुरस्काराने सन्मानित केलं आहे. त्यांनी पंतप्रधान शेख हसीना यांच्याकडे हा पुरस्कार सपूर्द करून शेख मुजीबुर रहमान यांच्या आठवणींना उजाळा दिला. पंतप्रधान मोदी म्हणाले, दोन्ही देशांचे संबंध घट्ट होत आहेत. हा सन्मान देताना मला अत्यंत आनंद होत आहे. बांगलादेशचे राष्ट्रपती अब्दुल हामिद, पंतप्रधान शेख हसीना आणि येथील नागरिकांचे मी आभार व्यक्त करतो.

तुम्ही या गौरवशाली क्षणांमध्ये, या उत्सवात सहभागी होण्यासाठी भारताल सप्रेम निमंत्रण दिलं. मी सर्व भारतीयांच्यावतीने शेख मुजीबुर रहमान यांना श्रद्धांजली अपर्ण करतो. ज्यांनी बांगलादेशच्या जनतेसाठी आपल्या जीवनाचा त्याग केला. पंतप्रधान यांच्या दाव्यावरुन आता सोशल मिडीयावर मीम्सचा महापुर आला आहे.


Updated : 26 March 2021 3:58 PM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top