Home > मॅक्स रिपोर्ट > महिला सरपंचाचा लढा यशस्वी : मॅक्स महाराष्ट्र इम्पॅक्ट

महिला सरपंचाचा लढा यशस्वी : मॅक्स महाराष्ट्र इम्पॅक्ट

महिला सरपंचाचा लढा यशस्वी :  मॅक्स महाराष्ट्र इम्पॅक्ट
X

कोरोनाच्या संकटामुळे ग्रामीण भागातील आरोग्य व्यवस्थेमध्ये किती अमुलाग्र बदल करण्याची गरज आहे, हे आता सिद्ध झाले आहे. याचे कारण म्हणजे अजूनही राज्यात ग्रामीण आरोग्य व्यवस्थेबाबत शासकीय पातळीवर हलगर्जीपणा होत असल्याचे दिसते आहे. याचे जिवंत उदाहरण सांगली जिल्ह्यात दिसून आले. इथल्या जवळपास २० ग्रामपंचायतींनी प्राथमिक आरोग्य केंद्र जवळच्या एका गावात व्हावे अशी मागणी करुन नेक वर्षे लोटली. पण सरकारी पातळीवर मात्र काहीही हालचाल झाली नाही.

त्यामुळे या गावातील लोकांना सांगली इथे असलेल्या आऱोग्य केंद्रात जावे लागत होते. त्यामुळे तातडीच्या वैद्यकीय गरजेच्या वेळी रुग्णांना गाडीतून नेण्याचा पर्याय या लोकांपुढे असतो. पण त्यात वेळेवर उपचार न मिळाल्याने जीवाला धोका असल्याचे इथले लोक वांरवार सांगत होते. पण कोर्टाने आदेश देऊनही सरकारी हत्ती मात्र हलत नव्हता. पण मॅक्स महाराष्ट्रचे प्रतिनिधी सागर गोतपागर यांनी या लोकांच्या व्यथा आपल्या वृत्तामधून मांडल्या आणि त्यानंतर यंत्रणा हलली. पाहूया नेमका हा संघर्ष काय होता.

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात ग्रामीण रुग्णालय झाल्यानंतर तिथले प्राथमिक आरोग्य केंद्र खानापूर तालुक्यातील आळसंद इथे हलवण्यात यावे अशी मागणी आसपासच्या जवळपास २० गावांमधून होत होती. पण त्याची दखल शासकीय पातळीवर घेतली गेली नव्हती. मॅक्स महाराष्ट्रने दोन दिवसांपूर्वी "एका महिला सरपंचाचा प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी लढा" या शीर्षकाखाली बातमी प्रसारीत केल्यानंतर त्याची दखल सांगली जिल्हा परिषदेने घेतली आहे. बुधवारी दिनांक १८ नोव्हेंबर रोजी जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने पत्रक जारी करत विटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद इथे स्थलांतरीत करण्याचे पंचायत समितीच्या गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्या गावात प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी जागेची पाहणी करण्याची सूचना देण्यात करण्यात आली आहे.

काय आहे प्रकरण?

सांगली जिल्ह्यातील विटा शहरात आधी ग्रामीण रुग्णालय नव्हते. त्यामुळे इथे प्राथमिक आरोग्य केंद्र सुरू करण्यात आले. आसपासच्या परिसरातील गावांमधील अनेक लोक याच प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी येतात. कालांतराने विटा शहरात ग्रामीण रुग्णालय सुरू करण्यात आले. त्यामुळे हे प्राथमिक आरोग्य केंद्र जवळच असलेल्या आळसंद इथे हलवावे अशी मागणी पुढे आली. आळसंद हे ठिकाणी आसपासच्या जवळपास २० गावांमधील लोकांना सोयीचे आहे.

अखेर हे प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंद येथे व्हावे यासाठी सामाजिक कार्यकर्ते नितीन जाधव यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. यानंतर हे आरोग्य केंद्र आळसंद येथे व्हावे असा आदेश कोर्टाने दिला होता. तरीदेखील प्रशासनाकडून यावर कोणतेही पाऊल उचलले जात नव्हते.

२०१७-२०१८ या वर्षात सरपंच इंदुमती जाधव यांनी पुन्हा उच्च न्यायालयात याचिका दाखल केली. कोर्टाने हे आरोग्य केंद्र आळसंद येथे स्थलांतरित करावे असा आदेश दिला. यानंतर शासनाचाही अध्यादेश निघाला. या अध्यादेशातील अटी आणि शर्थीचे पालन ग्रामपंचायतीने केले आहे, असे सरपंच इंदुमती जाधव सांगत आहेत. तरी देखील प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप त्या करत आहेत.

विटामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र असल्याने लोकांना १५ ते २० किलोमीटरचा प्रवास करावा लागतो. कधी कधी तातडीची वैद्यकीय परिस्थिती निर्माण झाली तर एवढ्या लांब रुग्णाला नेणे धोक्याचे ठरते. त्यामुळे आळसंदला हे रुग्णालय यावे असा इथल्या लोकांचा प्रयत्न आहे.

यासंदर्भात नितीन जाधव सांगतात की कोर्टाने आदेश दिला आहे, अध्यादेश निघाला आहे, ग्रामपंचायत जागा देण्यासही तयार आहे. तरीही प्रशासन टाळाटाळ करत आहे, असा आरोप ते करतात. त्यामुळे आरोग्य केंद्र स्थलांतरीत न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

या संदर्भात आम्ही स्थानिक आमदार अनिल बाबर यांच्याशी संपर्क केला असता ते याबाबत सांगतात की, " ग्रामपंचायतीने दिलेली जागा ही स्मशानभूमी शेजारी असल्याने आरोग्य विभागास ती जागा पसंत नाही. जागा मिळाल्यास हे रुग्णालय स्थलांतरीत होईल." पण स्मशानभूमी शेजारी नसलेली जागा शोधेपर्यंत अनेक नागरिकांना स्मशानभूमी जवळ करण्याची वेळ आली. तरी देखील आरोग्य विभाग डोळे उघडायला तयार नाही. या संदर्भात आम्ही सांगली जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी यांची प्रतिक्रिया घेतली ते याबाबत सांगतात की "ग्रामपंचायतीने आम्हाला भाडेतत्त्वावर जागा दिली तरी आम्ही तात्काळ त्या ठिकाणी आरोग्य केंद्र स्थलांतरीत करू."

पण आरोग्य अधिकाऱ्यांच्या या दाव्याला गावकऱ्यांचा आक्षेप आहे. ग्रामपंचायतीने याबाबत अनेकवेळा पत्रव्यवहार केले आहेत. जागाही शोधून दिली आहे. तरीही अधिकारी जागा दिल्यास आम्ही आरोग्य केंद्र सुरू करू असे सांगून टाळाटाळ करत असल्याचा आरोप हे गावकरी करत आहेत.

या परिसरातील अठरापैकी पंधरा गावांनी प्राथमिक आरोग्य केंद्र आळसंदला हलवण्याबाबत ठराव मंजूर केला आहे. पंचायत समितीनेही याबाबत ठराव केला आहे. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेतही ठराव झाला आहे. इतकंच नव्हे तर जिल्हा नियोजन समितीचा ठराव देखील झाला आहे. असे असतानाही ग्रामीण भागाच्या हक्काचे असलेले हे आरोग्य केंद्र प्रशासनाकडून स्थलांतरीत केले जात नाही.

आळसंद हे गाव सदर अठरा गावांचे मध्यवर्ती ठिकाण आहे. यातील बहुतांश गावे ही खानापुर, आटपाडी, पलूस आणि कडेगांव या मतदारसंघाच्या सीमेवर आहेत. एखाद्या रुग्णास सर्पदंश झाला अथवा अपघात झाला तर त्याला २० किमी अंतरावर असलेल्या विटा शहरात पोहोचवावे लागते. अनेकदा रस्त्यातच रुग्ण दगावण्याचे प्रसंग घडले आहेत.

राजकीय अनिच्छा आणि प्रशासकीय गोंधळामुळे ग्रामीण नागरिकांची ससेहोलपट सुरू आहे. स्थानिकांनी आता आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. सांगली जिल्ह्चा नेतृत्व करणारे जयंत पाटील सध्या पुन्हा सत्तेत आहेत. त्यामुळे जयंत पाटील यांनी स्वत: यामध्ये लक्ष घातले तर २० गावांमधील हजारो लोकांच्या आरोग्याचा प्रश्न मिटू शकतो, असे इथल्या नागरिकांना वाटते. कोरोनाच्या संकटामुळे सरकारी आरोग्य व्यवस्थेचे महत्त्व सगळ्यांसमोर आले आहे. ग्रामीण भागात तर सरकार आरोग्य सेवेमुळे अनेकांचा प्राण वाचले आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने आता तरी डोळे उघडून तातडीने आरोग्य केंद्र आळसंद या गावात सुरू करून लोकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे.

प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी महिला सरपंचाचा संघर्ष


Updated : 3 Dec 2020 4:35 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top