काँग्रेसमधील नाराज नेते घेणार प्रकाश आंबेडकर यांची भेट

Update: 2018-12-26 12:30 GMT

आगामी निवडणुकीत मोदी सरकारला पदच्युत करण्यासाठी देशात महाआघाडी निर्माण होत आहे. उत्तरेत सपा आणि बसपाने काँग्रेसला सोडून तिसरा पर्याय उभा केला आहे, तर महाराष्ट्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडीने सर्व प्रस्थापित पक्षांची झोप उडवली आहे.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, राज्यात बहुजन आघाडीच्या सभांना प्रचंड प्रतिसाद मिळतोय. अशात वंचित बहुजन आघाडीने काँग्रेसला १२ जागांचा प्रस्ताव दिला होता. मात्र, काँग्रेसने ही मागणी फेटाळून लावली होती. त्यावरून काँग्रेसमध्ये फूट पडल्याची चिन्हे आहेत. काँग्रेसमधील अनेक मातब्बर नेत्यांनी प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीसोबत काँग्रेसने युती न केल्यास राज्यात पुन्हा भाजपा सत्तेवर येईल अशी भीती व्यक्त केली आहे. काही नाराज नेते काँग्रेस सोडून आपला वेगळा गट स्थापन करायच्या प्रयत्नात आहेत.भारिप आणि एमआयएमसोबत काँग्रेसने युती न केल्यास निवडून येणे अशक्य वाटत असल्यामुळे, युती न झाल्यास आपण आपला गट तयार करून भारिप आणि एमआयएम या पक्षांसोबत युती करून निवडणुकांना सामोरे जावे असे या गटाचे म्हणणे आहे. भारिप, एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडिला पूर्ण महाराष्ट्रात मिळत असलेला प्रतिसाद पाहता २०१९ मधील निवडणुका जिंकण्यासाठी प्रकाश आंबेडकर आणि ओवेसी यांच्यासोबत युती करणे अत्यंत आवश्यक आहे असे देखील काँग्रेसमधील अनेकांना वाटत आहे.

पण काँग्रेस हायकमांड युतीसाठी कोणताही पुढाकार घेत नसल्यामुळे वंचित बहुजन आघाडी आणि काँग्रेसची युती होणार नाही अशी स्पष्ट चिन्हे दिसू लागली आहेत. काँग्रेसमधील नाराज नेते लवकरच यासंबंधी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेतील. या काँग्रेसमधील असंतुष्ट गटाचे नेतृत्व विदर्भातील मोठे नेते करीत असल्याची माहीती आहे. महाराष्ट्रात पुनरागमनाच्या तयारीत असलेल्या कॉंग्रेसपुढे या नेत्यांनी काँग्रेसच्या अडचणी वाढवल्या आहेत, यातून काँग्रेस कसा मार्ग काढेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.

Similar News