पाकिस्तानला मदत करणाऱ्या सौदी राजपूत्राच्या गळाभेटीवरून मोदींवर टीका

Update: 2019-02-20 13:44 GMT

पुलवामा इथल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तानच्या संबंधामध्ये वितुष्ट आलंय. त्यामुळं पाकिस्तानला मदत करणाऱ्यांना शत्रूच्या नजरेतूनच पाहणं अपेक्षित आहे. मात्र, या सर्व घडामोडींवर सौदी अरेबियाचे राजपुत्र महमद बिन सलमान यांनी पाकिस्तानला नुकतीच २० अब्ज डॉलर्सची मदत जाहीर केली आहे. त्याच सलमान यांची आज मोदींनी दिल्लीत गळाभेट घेतली. या सर्व घटनाक्रमाविरोधात संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. भारतातील प्रमुख राजकीय पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी संसदेत सर्वांसमोर पंतप्रधान नरेंद्र मोदींची गळाभेट घेतली होती. मात्र, त्यावरही टीका झाली होती.

पाकिस्तानचा दौरा करून सलमान हे भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. पाकिस्तानवर दबाव टाकण्यासाठी या दौऱ्याचा उपयोग भारताकडून केला जात असल्याचं म्हटलं जातंय. मात्र, सौदी अरब हा पाकिस्तान आणि भारत दोघांशीही समान अंतरावरचे संबंध ठेवून असल्याचं दिसतंय. पाकिस्तानला २० अब्ज डॉलर्सच्या आर्थिक मदतीची घोषणा केल्यानंतर सौदीकडून आता भारतातही मोठ्या गुंतवणूकीचे करार होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

पुलवामा इथल्या घटनेला अवघा एक आठवडाच झाला आहे. त्यापार्श्वभूमीवर या घडणाऱ्या घडामोडी आहेत. त्यावरून नेटिझन्सनी मोदींवर टीका करायला सुरूवात केलीय. त्यात काँग्रेसनंही दिल्ली विमानतळावर जाऊन मोदींनी सौदीचा राजपुत्र सलमान याच्या गळाभेटीवरूनही टीका सुरू केलीय.

दरम्यान, पाकिस्तानचं नाव न घेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दहशतवादाला समर्थन देणाऱ्या देशांवर दबाव आणण्यासाठी आणि त्यांचं नेटवर्कच उद्धवस्त कऱण्यासाठी त्या देशांवर दबाव आणण्यासंदर्भात सौदी अरब आणि भारताचं एकमत असल्याचं मोदी यांनी सांगितलं. दहशतवाद आणि कट्टरतावाद हे दोन्ही देशांसाठी समान धोक्याचे आहेत. अशाप्रकारचे कृत्य रोखण्यासाठी रियाध आणि नवी दिल्ली एकमेकांच्या संपर्कात राहतील, आणि शक्य ते इंटलिजन्स इनुपट परस्परांशी शेअऱ करतील, असं सौदी चे राजपुत्र सलमान यांनी यावेळी स्पष्ट केलं.

Similar News