श्रीरामपूर तालुक्यातील मोरगे वस्तीत भरदिवसा बिबट्याचा धुमाकूळ ; बिबट्याच्या हल्ल्यात 8 जण जखमी

Update: 2021-12-05 13:22 GMT

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील मोरगे वस्तीमध्ये भरदिवसा बिबट्याने धुमाकूळ घातला. अखेर या बिबट्याला पकडण्यात वनरक्षकांना यश आलं आहे. भर लोकवस्तीत घुसलेल्या या बिबट्याने तब्बल तीन तास धुमाकूळ घालत 8 जणांवर हल्ला केला. संगमनेर येथील वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी शर्थीच्या प्रयत्नांनी या बिबट्याला जेरबंद केलं. भरवस्तीत हा प्रकार घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण पाहायला मिळत आहे. सकाळी सुमारे दहा वाजता बिबट्या लोकवस्तीत घुसला, वनविभागही सकाळपासून चिंतेत होता. पण वनरक्षकांनी जीवाची बाजी लावून अखेर बिबट्याला जेरबंद केलं आहे. बिबट्याच्या हल्ल्यात एका वनरक्षकासह 7 जण जखमी झाले आहेत. हल्ल्यात जखमी झालेल्यांना तात्काळ जवळच्या रुग्णालयात दाखल केले गेले. मात्र, आवश्यक ती औषधे त्याठिकाणी उपलब्ध नसल्याने जखमींना अहमदनगर येथे हलविण्यात आल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान या भागात आणखी एक बिबट्या असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. या भागात उसाची शेती मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे बिबट्याला लपण्यासाठी जागा असल्याने या भागात मोठ्या बिबट्याचा वावर पाहायला मिळतो. मात्र, सध्या गळीत हंगाम सुरू असल्याने अनेक ठिकाणी ऊसतोड झाली आहे. त्यामुळे असे बिबटे लोकवस्तीत येत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान हा बिबट्या वस्तीत शिरल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरल्याने नागरिकांनी गर्दी करत एकच गोंधळ केला. त्यामुळे लोकवस्तीतून बाहेर पडण्याचा प्रयत्नात असलेल्या या बिबट्याने नागरिकांवर हल्ला केला.

Similar News