सुशांत सिंह आत्महत्या प्रकरण, सुप्रीम कोर्टात आदित्य ठाकरेंचा उल्लेख

Update: 2020-08-11 11:53 GMT

अभिनेता सुशांत सिंग राजपूत हत्या प्रकरणी बिहारमध्ये दाखल झालेली तक्रार मुंबईत वर्ग करण्याच्या मागणीसाठी रिया चक्रवर्ती हिने केलेल्या याचिकेवरील निर्णय सुप्रीम कोर्टाने राखून ठेवला आहे. मंगळवारी या संदर्भातली सुनावणी कोर्टात झाली. या सुनावणीत महाराष्ट्र सरकार, बिहार सरकार आणि केंद्र सरकारतर्फे जोरदार युक्तीवाद करण्यात आला. सगळ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर कोर्टानं आता दोन्ही बाजूंनी आपले म्हणणे बुधवारपर्यंत लिखित स्वरुपात देण्यास सांगितले आहे. तसंच याप्रकऱणी आता १३ ऑगस्टला सुनावणी होणार आहे.

या सुनावणी दरम्यान सॉलिसिटर जनरल तुषार मेहता आणि बिहार सरकारच्या वकिलांना महाराष्ट्र सरकारवर गंभीर आरोप केले. बिहार आणि महाराष्ट्र सरकार यांनी ज्या पद्धतीने हे प्रकरण हाताळले ते पाहता याचा तपास सीबीआयनेच केला पाहिजे असा युक्तीवाद सॉलिसिटर जनरल तुषार मेहता यांनी केला.

तपास सीबीआयकडे देण्याची घाई पाहता यांचा हेतू काय आहे ते लक्षात येते असा युक्तिवाद अभिषेक मनु सिंघवी यांनी राज्य सरकारतर्फे केला. रिया चक्रवर्तीच्या वकिलांनी या प्रकरणात बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी दाखवलेल्या तत्परतेचा मुद्दा उपस्थित करत यामागे राजकीय हेतू असल्याचा युक्तीवाद केला.

तर बिहार सरकारचे वकील एडव्होकेट मणिंदर संग यांनी या प्रकऱणात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या मुलाचे नाव असल्याने पोलिसांवर राजकीय दबाव असल्याचा गंभीर आरोप केला आहे. आता याप्रकरणी सुप्रीम कोर्टा १३ ऑगस्ट रोजी काय निर्णय़ देते याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे.

Similar News