कोरोनाचा 55 सरपंचांना फटका ; लसीकरणात निरुत्साह दाखवल्याप्रकरणी सरपंचांना अपात्रतेची नोटीस

Update: 2021-12-11 13:15 GMT

सोलापूर :  देशातील कोरोनाची दुसरी लाट काहीशी कमी झाली असली तरी अद्यापही तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. त्यातच नव्याने आढळून आलेल्या ओमायक्रॉन या घातक व्हेरिएंटने देशात पाऊल ठेवलं आहे. महाराष्ट्रात तर या व्हायरसचे आतापर्यंत तब्बल 17 रुग्ण आढळून आलेत. हा व्हायरस कोरोनाच्या डेल्टा व्हेरिएंटपेक्षा कित्येक पटीने घातक असल्याचे बोलले जात आहे, त्यामुळे आरोग्य यंत्रण अलर्ट झाली आहे. या नवीन व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी राज्यभरात लसीकरण मोहिमेवर भर दिला जातोय.

अशावेळी काही नागरिक लसीकरण करून घेण्यास विलंब करत असल्याने प्रशासनाने आता कठोर पाऊलं उचलण्यास सुरूवात केली आहे. कोरोना लसीचे दोन डोस न घेणाऱ्यांविरोधात आता कठोर नियम केले जात आहेत. याचाच एक प्रत्यय सोलापूरातून आला आहे. सोलापूर जिल्ह्यातील तब्बल 55 सरपंचांना प्रशासनाकडून एकाच वेळी नोटीस बजावण्यात आल्याचे वृत्त आहे.

सरपंचांना ग्रामपंचायत अधिनियम कलम 39 अ नुसार कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी ही नोटीस पाठवण्यात आल्याचे समजते. लसीकरणात निरुत्साह दाखवल्याप्रकरणी या सरपंचांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. 3 दिवसांत उत्तर द्या अन्यथा सरपंच पद रद्द करण्यात येईल असा इशारा या नोटीसीतून देण्यात आला आहे.

एकीकडे लसीकरणाचा टक्क वाढवण्यासाठी प्रशासनाकडून वेगवेगळ्या पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र , यामध्ये 55 सरपंचांनी निरुत्साह दाखवला आहे. या निरुत्साही सरपंचांना अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली आहे. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी यांनी कोरोना लसीकरणासाठी कठोर पाऊलं उचलली आहेत. त्यामुळे आता 55 सरपंचांना आता नोटीसला उत्तर देणं बंधनकारक आहे. अन्यथा त्यांचं पद जाण्याची शक्यता असल्याचे बोलले जात आहे.

Tags:    

Similar News