परम बीर सिंहांच्या गृहमंत्र्यांवरील आरोपांवर राष्ट्रवादीची पहिली प्रतिक्रिया
परम बीर सिंह यांच्या पत्र प्रकरणात राष्ट्रवादी काँग्रेसने आपली भूमिका आता स्पष्ट केली आहे.
मुंबईच्या पोलीस आयुक्तपदावरुन हटवण्यात आलेल्या परम बीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या आरोपाने खळबळ उडालेली आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते सांगलीमध्ये पत्रकारांशी बोलत होते. या प्रकरणाचा राज्य सरकारच्या स्थिरतेवर कोणताही परिणाम होणार नाही असे जयंत पाटील यांनी म्हटले आहे. गृहमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीवर विरोधकांचे ते कामच असते, असे सांगत तूर्तास अनिल देशमुख यांच्यावर कारवाई करण्याबाबत त्यांनी काहीही स्पष्ट केले नाही. तसेच परम बीर सिंह यांच्या त्या पत्राबाबत अनेक शंका आहेत, मूळ प्रकरणातील आरोपी सुटू नये हाच सरकारचा प्रयत्न आहे. तसेच सरकार खंबीर आहे आणि 5 वर्ष टिकेल असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. अंबानी यांच्या घराबाहेरील स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन प्रकरणात मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी खंबीरपणे कारवाई सुरू केली असताना जे अडचणीत येऊ शकतात त्यांनीच हे केले आहे. त्यामुळे मूळ मुद्द्यावरुन लक्ष विचलित करण्याचा हा प्रकार असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.
मुकेश अंबानी प्रकरणावरुन जनतेचे लक्ष इतरत्र हलवण्याचा हेतू असल्याचे परमवीर सिंह यांच्या पत्रावरून जाणवत आहे, पत्रात कुणाची सहानुभूती मिळवण्यासाठी काही लिहिले आहे का, हेसुद्धा तपासावे लागेल, असे त्यांनी सांगितले. या परिस्थितीमध्येसुद्धा सरकार खंबीर आहे, कोणतीही अडचण सरकारला येणार नाही, असेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले आहे. मुकेश अंबानी यांच्या घरासमोर ठेवलेले वाहन आणि मनसुख हिरेन यांचा खून यामागे कितीही मोठा अधिकारी असला तरी त्याच्यावर कारावई होईल असेही त्यांनी सांगितले.