#Coronaeffect- कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 40 वर्षांत पहिल्यांदा घटले

Update: 2020-05-14 03:48 GMT

कोरोनाच्या संकटामुळे लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे आर्थिक अरिष्ट कोसळले आहे. पण पर्यावरणाच्या दृष्टीने हे लॉकडाऊन फायद्याचे ठरत असल्याचे सिद्ध झाले आहे. मार्चमध्ये संपलेल्या आर्थिक वर्षात देशातील कार्बन डायऑक्साईच्या उत्सर्जनाचे प्रमाण एक टक्क्याने कमी झाले आहे. गेल्या ४० वर्षात पहिल्यांदाच हे प्रमाण 1 टक्क्याने कमी झाले आहे. लॉकडाऊनमुळे सध्या वीजेची मागणी घटली आहे आणि कोळसा आणि खनिज तेलाचा वापरही कमी झाल्याने कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण घटले आहे.

हे घटले प्रमाण गेल्या वर्षभराततले असले तरी एकट्या मार्च महिन्यात कोरोनामुळे लागू केलेल्या लॉकडाऊनमुळे कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण 15 टक्क्यांनी घटले आहे तर एप्रिलमध्ये हे प्रमाण 30 टक्क्यांपर्यंत जाऊ शकते. गेल्या वर्षभरात वीजेची घटलेली मागणी आणि पुनर्वापर करता येणाऱ्या ऊर्जेच्या पर्यायामुळे औष्णिक वीजेची मागणी कमी झाल्याने विजेचे उत्पादन कमी करण्यात आले आहे. दरम्यान मार्च महिन्यात लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे खनिज तेलाचा वापरही सुमारे 18 टक्क्यांनी घटला आहे. त्यामुळे एकूणच प्रदुषणाचे प्रमाण कमी झाले आहे.

दुसरीकडे सरकारने आता कार्बन उत्सर्जनाचे प्रमाण कमी करण्यच्या दृष्टीने इथून पुढे ऊर्जेच्या इतर स्त्रोतांचा वापर करण्यासाठी पावलं उचलण्याची गरज आहे. दरम्यान वीजेची कमी झालेली मागणी, इंधनाचा कमी वापर आणि गॅसचा कमी झालेला वापर यामुळे कार्बन डायऑक्साईचे प्रमाण आणखी कमी होण्याची शक्यता आहे.

Similar News