केमिकलयुक्त रद्दीच्या ढिगाऱ्यामुळे भात शेतीचे नुकसान ,शेतकरी हवालदिल
केमिकलयुक्त रद्दीच्या ढिगाऱ्यामुळे कल्याण नजीकच्या आंबिवली गावातील भात शेतीचे नुकसान होत असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.
कल्याण : केमिकलयुक्त रद्दीच्या ढिगाऱ्यामुळे कल्याण नजीकच्या आंबिवली गावातील भात शेतीचे नुकसान होत असून यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. आंबिवली गावातील बाळकृष्ण पेपर मिल या कारखान्यातील टाकाऊ कचऱ्याच्या ढिगाऱ्यातुन केमिकल मिश्रित पाण्याने शेतात शिरकाव केल्याने शेतजमिनीचे नुकसान झाले आहे असं तेथील शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे शेतीवर उदरनिर्वाह करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर आता उपजीविकेचा प्रश्न उभा ठाकला आहे .या कंपणीवर कारवाईसाठी शेतकऱ्याने ठाणे जिल्हाधिकारी, कल्याण तहसीलदार ,प्रदूषण नियंत्रण मंडळाला साकडे घातले आहे. तर याबाबत शेतकऱ्याची तक्रार प्राप्त झाली असून पंचनामा करून अहवाल कारवाईंसाठी संबंधित विभागाकडे पाठवण्यात येईल असं संबंधित विभागाने सांगितले असल्याचे शेतकऱ्याने म्हंटले आहे.
वाढत्या नागरिकरणामुळे कल्याण मधील शेतजमिनीवर आता मोठं मोठे टॉवर उभे ठाकले आहे . बहुतांश शेतजमिनी स्थानिक शेतकऱ्यांनी बिल्डर कंपन्यांना विकल्या असल्या तरी आजही कल्याण जवळच्या ग्रामीण भागात काही गावांमध्ये शेती केली जाते .सिमेंटच्या जंगलात आजही काही शेतकरी आपलं अस्तित्व टिकवून आहे .शेतीमध्ये भात ,भाजीपाला उत्पन्न काढून या शेतीवरच शेतकरी आपला उदरनिर्वाह करतोय.कल्याण नजीक असलेल्या आंबिवली गावात देखील आता काही मोजक्या शेतकऱ्यांच्या जमिनी उरले आहेत. त्यातल्या हरिश्चंद्र पाटील हे एक शेतकरी आहे, त्यांच्या शेतीच्या बाजूलाच असलेल्या बाळकृष्ण पेपर मिलमुळे ते शेतकरी देखील हवालदिल झाले आहे. या पेपर मिल कारखान्यामधील टाकाउ रद्दी व केमिकल मिश्रित सांडपाणी पाटील यांच्या शेतात शिरले आहे.
त्यामुळे आता ही जमीन नापीक होण्याची भीती पाटील यांनी व्यक्त केली आहे.आधीच शेतीच्या काही भागावर गेल्या अनेक वर्षांपासून टाकाऊ रद्दीचा ढिगारा साचला होता. याबाबत अनेकदा तक्रारी करूनही कुणीच दाद दिली नाही यंदाच्या पावसात आलेल्या पुरामुळे टाकाउ रद्दी व केमिकल मिश्रित सांडपाणी पाटील यांच्या संपूर्ण शेतात शिरले आहे. या कंपनीवर कारवाई करण्याची मागणी पाटील यांनी केली असून हा याबाबत जिल्हाधिकारी तहसीलदार प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच संबंधित मंत्र्याकडे देखील त्यांनी तक्रारी करत उंबरठे झिजवले. मात्र अद्यापही या कंपनीविरोधात काहीच कारवाई झालेले नसल्याचे पाटील यांनी सांगितले. सदर कंपनीवर लवकरात लवकर कारवाई करून आपल्याला नुकसान भरपाई द्यावी अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या शेतकऱ्याने दिला आहे.