चंद्रूपर : पुरोगामी महाराष्ट्राला लाजवेल अशी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील वणी खूर्द या गावात घडली आहे. जिवतीपासून १२ किमी अंतरावर दुर्गम भागात वणी खूर्द हे गाव आहे. या गावात जादूटोणा केल्याच्या संशयावरून गावकऱ्यांनी दलित वस्तीमधील महिला, वयोवृद्धांना मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे. या महिला आणि वृद्धांना भरचौकात हातपाय बांधून जबर मारहाण कऱण्यात आली आहे. या मारहाणीत ७ जण जखमी झाले आहेत. यापैकी पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. या जखमींवर चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
राज्याला हादरवून टाकणारी ही घटना शनिवारी घडली आहे. याप्रकरणात पोलिसांनी काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र तरीही या घटनेबाबत गोपनीयता पाळण्यात येत आहे. त्यामुळे चोवीस तास उलटल्यानंतरही या गंभीर प्रकारणाची वाच्यता कुठेही झाली. किती लोकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, कुणाला अटक करण्यात आली आहे का, याबाबत स्थानिक पोलिस कोणतीही माहिती देत नाहीयेत.
या घटनेची समजल्यानंतर काही माध्यम प्रतिनिधींनी गावात जाण्यात प्रयत्न केला, पण गावाबाहेर पोलिसांनी कडक बंदोवस्त ठेवला आहे. बाहेरच्या कोणत्याही व्यक्तीला गावात येऊ दिल जात नाहीये.
गावातील लोकांशी संवाद साधता येत नाहीये, पण या प्रकाराबाबत जी चर्चा सुरू आहे, त्यानुसार गावातील एक दोन महिलांच्या अंगात देवी आली आणि त्यांनी दलित समाजातील आठ-दहा वयोवृद्ध लोकांनी भानामती केल्याचे तिने सांगितले. त्या महिलेच्या सांगण्याला खरे मानून गावातील लोकांनी दलित वस्तीमधील त्या लोकांना भरचौकात खांबाला बांधून बेदम मारहाण केली.