पेगॅसस प्रकरणी न्यायालयाने चौकशी समिती नेमणे ही मोदी सरकारला मोठी चपराकच - नाना पटोले

Update: 2021-10-28 01:38 GMT

पेगॅसस स्पाअवेअरप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल अत्यंत महत्वाचा असून, या निर्णयाचे काँग्रेसने स्वागत केले आहे. लोकांच्या खासगी आयुष्यात हेरगिरी करणे हा घटनेने दिलेल्या व्यक्ती स्वातंत्र्यावर घाला आहे, केंद्रातील भाजपा सरकारने हे काम केले आहे का नाही, याची चौकशी झाली पाहिजे ही काँग्रेस पक्षाची मागणी होती. ती न्यायालयाने उचलून धरली, आता यामागचे खरे सूत्रधार जनतेसमोर आले पाहिजेत, असं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटले.

सुप्रीम कोर्टाने पेगॅसस हेरगिरीप्रकरणी चौकशी लावल्यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, सुप्रीम या चौकशीतून पेगॅसस वापरून लोकांवर पाळत ठेवणाऱ्या आणि व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणाऱ्या मोदी-शाहांनी सत्तेचा केलेला गैरवापर बाहेर येणार आहे. केंद्र सरकारने या प्रकरणातही टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय सुरक्षेचा बाऊ करत माहिती देण्यास टाळाटाळ केली, मात्र, केंद्र सरकारच्या कोणत्याच नौटंकीला न जुमानता सुप्रीम कोर्टाने तज्ज्ञांची चौकशी समिती नेमली.

केंद्र सरकारला राष्ट्रीय सुरक्षेचे कारण पुढे करत अशा प्रकारे सामान्य नागरिकांच्या मूलभूत हक्कावर गदा आणता येणार नाही हेच न्यायालयाने बजावले. खासदार राहुल गांधी यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारला जाब विचारला होता. पण, हुकूमशाही पद्धतीने राज्यकारभार करणाऱ्या मोदींनी त्याकडे नेहमीप्रमाणे दुर्लक्ष केले, मात्र न्यायालयाने या हुकूमशाहीवृत्तीला जुमानले नाही. न्यायालयाने चौकशी समिती नेमणे ही मोदी सरकारला मोठी चपराकच आहे.

Tags:    

Similar News