विराट कोहलीचे कर्णधारपद 'शाहजादे' मुळे गेले? नितीन राऊत यांचे सूचक ट्विट

Update: 2021-12-10 09:24 GMT

विराट कोहलीला (Virat kohali) कर्णधार पदावरुन बाजूला करण्याच्या BCCIच्या निर्णयावरुन सध्या भारतीय क्रिकेटमध्ये मोठा वाद निर्माण झाला आहे. विराट कोहलीने T-20 वर्ल्ड कपआधी टीमचे नेतृत्व सोडणार असल्याचे जाहीर केले होते. पण आता विराटकडून वन डे टीमचेही नेतृत्व काढून घेण्यात आले आहे. रोहित शर्माकडे सध्या टीमची धुरा देण्यात आली आहे. त्यामुळे विराट कोहलीच्या फॅन्सने संताप व्यक्त केला आहे. BCCI ने विराट कोहलीशी चर्चा न करता त्याला कर्णधार पदावरुन काढून टाकण्यात आल्याची चर्चा सुरू आहे. या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी एक ट्विट करत गंभीर आरोप केला आहे.

"पाकिस्तानकडून पराभव झाल्यानंतर ज्या खंबीरपणे विराट कोहली महंमद शमीच्या पाठीशी उभा राहिला होता, तेव्हाच अंदाज यायला हवा होता की त्याचं कर्णधारपद जाणार. क्रिकेट नियामक मंडळात सध्या 'शाहजादे' राज्य करतायत ना!"

असे त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. याचाच अर्थ नितीन राऊत यांनी कोहलीला पदावरुन हटवण्यामागे बीबीसीआयचे सचिव जय शाह असल्याचा सूचकपणे नमूद केले आहे. जय शाह हे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे पुत्र आहेत.


टी-२० वर्ल्डकपमध्ये पहिल्याच मॅचमध्ये पाकिस्तानने भारताला हरवले होते. या पराभवानंतर भारतीय टीमवर फॅन्सने टीका केली होती. तसेच भारतीय बॉलर मोहम्मद शमी याच्या बॉलिंगमुळे भारताचा पराभव झाल्याचा आरोप करत काहींनी शमीला त्याच्या धर्मावरून ट्रोलही केले होते. पण त्या वादात विराट कोहलीने शमीच्या बाजूने उभे राहून त्याच्यावर टीका करणाऱ्यांना फटकारले होते.

Similar News