सचिन वाझे यांनी आपल्या अधिकारांचा गैरवापर करत केलेल्या कृत्यांमुळे आणि परमबीर सिंग यांनी गृहमंत्र्यांवर केलेल्या आरोपांमुळे राज्य सरकारची बदनामी झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर गृहखात्याने मंगळवारी रात्री उशिरा मुंबई पोलीस दलात बदल्यांचा मोठा निर्णय घेतला आहे. यामध्ये गुन्हे शाखेतील तब्बल ६५ पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. यामध्ये पोलीस निरीक्षक, सहाय्यक पोलीस निरीश आणि पोलीस उपनिरीक्षक दर्जाच्या पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. एखूण ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहे. पोलीस सहआयुक्त राजकुमार व्हटकर यांनी यासंदर्भातले कार्यालयीन आदेश काढले आहेत.
परमबीर सिंग यांची बदली करण्यात आल्यानंतर त्यांच्या जादगी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी हेमंत नगराळे यांची नियुक्ती करण्यात आली. नगराळे यांची नियुक्ती झाल्यानंतर पहिल्यांदाच तब्बल ८६ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. सचिन वाझेने गुन्हे गुप्तवार्ता विभागात काम करताना बेकायदा कामे केल्याने त्याला निलंबित करण्यात आले आहे. मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर स्फोटकं असलेली गाडी सापडल्यानंतर सचिन वाझे यांचा त्याच्यासी संबंध आल्याचा आरोप झाला, त्यानंतर गाडीचा मालक मनसुख हिरेन य़ाचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सचिन वाझेला एनआयएने अटक केली आहे. यानंतर एटीएसनेही मनुसख हिरेन यांची हत्या सचिन वाझेने केली असा ठपका ठेवलेला आहे.
तर दुसरीकडे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी सकाळी पोलीस दलात बदल्यांचे मोठे रॅकेट असल्याचे उघड झाले होते, पण मुख्यमंत्र्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही, असा आरोप करत केंद्र सरकारकडे याप्रकरणाच्या चौकशीची मागणी केली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पोलिसांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत.