झाडांना पाय नसतात, झाडांना हात नसतात, झाडांना मेंदू नसतो, झाडे विचार करत नाहीत, झाडे बोलत नाहीत, झाडांना वस्त्रांची गरज नसते, झाडे आजारी पडली की दवाखान्यात जात नाहीत, झाडांची मुले शाळेत जात नाहीत, अ,ब,क,ड शिकत नाहीत, झाडांच स्वत:च घर नसत, झाडे स्वत:वर येणारा प्रत्येक वार निमुटपणे सहन करतात. झाडे दुष्काळाविरोधात आंदोलन करत नाहीत, पाउस पडला नाही अशी तक्रार करत नाहीत. झाडांना कोणत्या रस्त्यांची गरज नसते. अशा समान वैशिष्ट्य असणाऱ्या अनेक झाडांच मिळून जंगल बनतं अशा या समान वैशिष्ट्य असणाऱ्या जंगलाचा माणसाच्या जीवनावर सुधा परीणाम होतो.
रात्री अपरात्री एखादा माणूस आजारी पडला तर त्याला बैलगाडीतून जवळच्या रस्त्यावर न्यावं लागतं. अॅम्ब्युलन्सला फोन करण्यासाठी फोन सेल्फी काढायला चेहऱ्यासमोर धरल्याप्रमाणे धरावा लागतो. तेथुन मग तालुका ग्रामीण रुग्णालयात पोहोचवावं लागतं. इथं अत्याधुनीक उपचार मिळतील अथवा नाही हा देखील मोठा प्रश्नच आहे. हे सांगताना स्थानिक महिला सांगत होती.
“बैलबंडीतून माणसाला दवाखान्यात पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. या सगळ्यात तो जगला तर जगला न्हायतर देवावर बोल”
गावातील शाळा जास्तीत जास्त वेळा बंद असते. शाळेच्या अनियमिततेमुळे पालकांनी आपली मुलं जवळच्या निवासी शाळांमध्ये दाखल केली आहेत. आता शाळेत केवळ दोनच मुले असून शाळा बंद पडन्याच्या मार्गावर आहे.
गावात रोडिओ सुद्धा नाही
गावात मनोरंजनाची साधने उपलब्ध नाहीत. गावात अजून रेडीयो सुद्धा पोहचला नाही. हे सगळ लोकं निमुटपने सहन करतात. आदीवाशी नृत्यावर ताल धरणारी, गोटुलमध्ये जमणारी ही दोन पायाची झाडं या समस्यांची कुठेच तक्रार करत नाहीत. हे सगळ निमुटपणे सहन करतात. असेल त्या परीस्थितीत जगण्याचं जंगलाच वैशिष्ट्य या हसणाऱ्या बोलणाऱ्या झाडांनी धारण केलंय.
सागर गोतपागर, गडचिरोली