आता तरी सरकार राजा शेतकऱ्याला पावशील का?  कर्जमाफी ज्याला म्हणत्यात ते दावशील का? 

Update: 2018-12-15 12:49 GMT

ग्रामीण भागात जत्रेमध्ये व्हईक (भाकनुक) सांगितलं जातं या व्हईकामध्ये व्हईक (भविष्य़) सांगणारा व्यक्ती पाऊस पडलं का? राज्यात सुख शांतता नांदेल का? अशा प्रश्नांची उत्तर देत असतो… यामध्ये एक ठरलेलं उत्तर असते. ते म्हणजे काही हसतील काही रडतील. राज्य सरकारच्या कर्जमाफीने देखील शेतकऱ्यांची अशीच अवस्था झाली आहे. राज्य सरकारने देशातील सर्वात मोठी कर्जमाफी म्हणून छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली. मात्र, यामध्ये काही लोकांना कर्जमाफी मिळाली तर काही लोकांना कर्जमाफीचे रात्री अर्ज भरुनही अद्यापर्यंत कर्जमाफी मिळाली नाही. आता कर्जमाफी होऊन वर्ष उलटून गेले आहे. शेतकऱ्यांचे खात्यात अद्यापर्यंत पैसा आलेला नाही. त्यामुळे आत्ताच झालेल्या पाच राज्यात ज्या पद्धतीने विद्यमान भाजप सरकारला मोठा फटका बसला तसाच फटका महाराष्ट्रात बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

ही आहेत कर्जमाफी फसण्याची प्रमुख कारण...

कर्जमाफी करताना ऑनलाईन पद्धतीच्या अटी लागू केल्या- ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरण्यास सांगितल्यामुळे शेतकऱ्यांची मोठी तारांबळ उडाली.

ऑनलाईन पद्धतीत आलेल्या त्रुटी-

  • ऑनलाईन अर्ज भरण्यास अनिर्वाय केल्यानं सर्वांत प्रथम मुद्दा येतो तो इंटरनेटचा, गावात नेटवर्कचा मोठा प्रश्न आहे, यामुळे रात्रंदिवस शेतकऱ्यांना लाईनमध्ये उभे रहावे लागले.
  • वेबसाईट सुरुच होत नाही.
  • शेतकऱ्यांना इंग्रजीत अर्ज भरणे कठीण होते.
  • अनेक शेतकऱ्यांकडे आधारकार्ड नसल्यामुळे अडचणी वाढल्या.
  • अर्ज भरण्यास सरकारी केंद्र गावात उपलब्ध नव्हते
  • कागदपत्र नसल्याने अनेक शेतकरी अर्ज भरण्यापासून वंचित राहिले.

कर्जमाफीची अंमलबजावणी करताना बँकांच्या याद्या आणि ऑनलाईन अर्ज यांच्यात तफावत.

कर्जमाफीचा खरा आकडा सरकारला कळलाच नाही.

कर्जमाफी दिली परंतु बँकेत पैसाचं आला नाही.

शेतकऱ्यांना कर्जमाफीची प्रमाणपत्र दिली परंतु त्यावर कर्जमाफीच्या रक्कमेचा आकडा नाही.

बँकांना सरकाने कर्जमाफी लाभार्थ्यांची यादी आणि पैसे पाठवले नाही.

महाऑनलाइन, राष्ट्रीयकृत बॅंका आणि सहकार विभाग यांच्यात सुरवातीपासून आतापर्यंत एकवाक्‍यता नसल्याने या योजनेबद्दल गोंधळाची स्थिती बघायला मिळत आहे.

यादीत नावांचा मोठा घोळ

या सर्व कारणांमुळे शेतकऱ्यांना गेल्या १ वर्षापासून कर्ज काढता येत नसून आज ना उद्या कर्जमाफी होईल अशी आशा करत माय बाप सरकारला आज ना उद्या जाग येईल अशी प्रार्थना शेतकरी करत आहे. त्यामुळे ५ राज्यात मोठा फटका बसलेला भाजप आत्ता तरी शेतकऱ्यांकडे लक्ष देऊन कर्जमाफी प्रक्रियेला वेग देईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.

Full View

Similar News