सध्या महाराष्ट्र दुष्काळाने होरपळत आहे. अनेक गावांमध्ये पाण्यासाठी ग्रामस्थांना वणवण हिंडावं लागत आहे. राज्य सरकारने दुष्काळ जाहीर करुन शेतकऱ्यांना दिलासा दिला असला तरी शेतकऱ्यांसाठी आणखी काही विशेष पॅकेजची घोषणा होईल का? असा प्रश्न पडण्याचं कारण म्हणजे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तसेच माहिती मिळाल्यानुसार राज्यासाठी ४१ हजार कोटींच्या योजनांची घोषणा आज मोदी करणार आहेत. तर यात शेतकऱ्यांच्या पदरात काय पडणार? पंतप्रधान मोदी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणार का या कडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. आज महाराष्ट्रातील दौऱ्यात अनेक कार्यक्रमांना पंतप्रधान मोदी यांची विशेष उपस्थिती असणार आहे.
दुपारी एक वाजता कल्याणमधील फडके मैदानात कार्यक्रम होणार आहे. आघाडी सरकारच्या काळात ठाणे-भिवंडी-कल्याण मेट्रो रेल्वे प्रकल्पाची घोषणा झाली होती. तसेच दहिसर-मीरा-भाईंदर मेट्रो रेल्वेमार्गासह मेट्रो व सिडकोच्या गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन समारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यांच्या हस्ते होणार आहे. पंतप्रधान मोदी यांच्या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर राज्यपाल विद्यासागर राव, केंद्रीयमंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, शिक्षणमंत्री विनोद तावडे, खा. कपिल पाटील यांचा समावेश आहे.
असा आहे पंतप्रधान मोदींचा आजचा महाराष्ट्र दौरा
10 AM: मुंबई विमानतळावर आगमन
11.30 AM: राजभवन येथे ‘टाइमलेस लक्ष्मण’ या पुस्तकाचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते प्रकाशन
1.30 PM: कल्याणच्या फडके मैदानात मोदींच्या हस्ते मेट्रो आणि गृहनिर्माण प्रकल्पाचे भूमिपूजन
4.30 PM:पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात आयोजित सोहळ्यात मोदींच्या हस्ते पुणे मेट्रोच्या तिसऱ्या टप्प्याचे भूमिपूजन
6.30 PM: पुणे विमानतळावरून मोदी दिल्लीकडे रवाना