मुंबईच्या पावसावर गडकरींचा शिवसेनेला टोला

Update: 2019-08-17 13:20 GMT

आमचं सगळं ठरलय असं शिवसेना आणि भाजप युती सर्वांना सांगतेय पण खरंच त्यांचं काही ठरलंय का? बोरिवली येथील कांदळवन उद्यान भूमिपूजनाच्या कार्यक्रमात केंद्रीय रस्ते-वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी मुंबई महानगरपालिकेच्या नावाने बँकेत ५८ हजार कोटींच्या ठेवी असूनही मुंबई बुडतेच कशी? असा प्रश्न करत शिवसेनेला टोला लगावला.

विधानसभा निवडणुक तोंडावर असताना गडकरींचा हा प्रश्न शिवसेनेला बोचणार तर नाही हा प्रश्न निर्माण होतो. “मुंबई महानगरपालिकेच्या नावे बँकेत ५८ हजार कोटींच्या ठेवी आहेत, मात्र दरवर्षी पावसाळ्यात आम्ही मुंबई पाण्यात बुडाल्याचे ऐकतो. पालिका त्या ठेवीचा उपयोग का करत नाही? त्या ठेवींचा उपयोग करून समुद्रात जाणाऱ्या घाण पाण्यावर प्रक्रिया करून ते पुनर्वापरात आणले पाहिजे” असा पर्याय नितीन गडकरी यांनी आपल्या मित्रपक्षाला सुचवला आहे.

मुंबईमध्ये इटलीतील व्हेनिस शहराप्रमाणे वॉटर टॅक्सी सुरू करण्याचा प्रकल्प मी तयार करुन ठेवला आहे. लवकरच निविदा मागवल्या जातील. भविष्यात वसई, विरार, कल्याण भागातील लोक हे मोटर किंवा टॅक्सीने नव्हे तर वॉटर टॅक्सीने प्रवास करतील असा विश्वास गडकरींनी व्यक्त केला आहे. मुंबईचा समुद्र मॉरिशस सारखा स्वच्छ व्हायला हवा आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

Similar News