कुटुंबातील व्यक्ती गंभीर आजारी असल्यावर कुटुंबातील व्यक्ती ज्या प्रकारे रुग्णाला वाचवण्यासाठी धडपड करत असतात. तीच धडपड शेतकरी द्राक्षांच्या बागा वाचवण्यासाठी करतान दिसत आहे. सांगली जिल्हा द्राक्षाच्या उत्पन्नात अग्रेसर आहे. मात्र, सध्या बरसत असणाऱ्या परतीच्या पावसानं या जिल्ह्याला मोठा तडाखा बसला आहे. जिल्ह्यात पडलेल्या अवकाळी पावसाचं सर्वात मोठा फटका द्राक्षबागांना बसला आहे.
तासगाव हे द्राक्ष उत्पन्नाचे केंद्र आहे. दर वर्षी येथून मोठ्या प्रमाणात द्राक्षे आणि बेदाण्याचे उत्पादन होते. मात्र, यंदा हे उत्पादन पुर्णपणे घटण्याची चिन्हं आहेत.
पावसामुळे बागांमध्ये गुडघ्याच्या वर पाणी साचले आहे. ढगाळ वातावरणात द्राक्षांच्या बागेवर डाऊनी सारखा आजार मोठ्या प्रमाणात पसरतो. यावर वेगवेगळी रसायने फवारून शेतकरी ती आटोक्यात आणतो. मात्र, सध्या हा रोग नियंत्रणाबाहेर जात आहे. त्यात बागांमध्ये पाणी साचल्यामुळे फवारणीसाठी ट्रॅक्टर आत जाऊच शकत नाही.