गावातील व्यर्थ जाणाऱ्या पाण्याचे नियोजन करून शेतात घेतले उत्पन्न....
गत तीन वर्षांपासून संपूर्ण महाराष्ट्रासह बुलडाणा जिल्ह्यात देखील अत्यल्प पावसामुळे शेतकऱ्यांना नापिकी ला सामोरे जावे लागत आहे मात्र या सर्व परिस्थितीवर मात बुलडाणा जिल्ह्यातील शेतकऱ्याने गावातील व्यर्थ जाणाऱ्या सांडपाण्यावर शेती करत एक वेगळा प्रयोग केला आहे
खामगाव तालुक्यातील बोरी अडगाव येथील गजानन टिकार या शेतकऱ्याकडे दहा एकर शेती आहे पैकी तिन एकर शेती बागायती व बाकी कोरडवाहू आहे मात्र गेल्या तीन वर्षांच्या अत्यल्प पावसामुळे विहिरी कोरड्या ठक्क पडल्या आणि त्यांच्या कुटुंबाची उपजीविका भागवण्यासाठी शेती हाच एकमेव उत्पन्नाचा स्रोत असल्याने गजानन टिकार हे चिंतेत पडले, विचार करत असताना त्यांनी आपल्या दारा समोरून सांडपाण्याची वाहणारी नाली पाहिली आणि त्यात त्यांना आशेचा किरण दिसला.
गजानन टिकार यांनी ते वाहणारे सांडपाणी आपल्या दाराजवळ अडवून बाजूला एक छोटा पाच फूट खोलीचा खड्डा खोदला आणि त्यामध्ये सर्व सांडपाणी साठवणे सुरू केले , आणि त्या खड्ड्यामधून जवळच असलेल्या शेतात पाईपलाईन द्वारे विहिरीत पाणी घेतले आणि त्या पाण्यापासून शेतातील तुरी ला पाणी देण्यास सुरुवात केली आधी पाण्याच्या कामतरतेमुळे वाळलेली तूर पुन्हा एकदा बहरली आणि याच सांडपाण्याच्या जोरावर त्यांनी तीन एकर मध्ये तुरीचे एक लाख वीस हजार रुपयांचे उत्पन्न घेतले, सोबतच ते अंतर्गत पीक म्हणून मका , मोहरी , हे देखील पीक घेण्याचा प्रयोग करत आहेत.टिकार यांनी हा साधा प्रयोग केला आणि तो यशस्वी झाला त्यामुळे ते आता सांडपाण्याचे योग्य नियोजन करणार असून खोदलेला खड्डा हा मोठा करणार आहेत आणि त्यापासून विविध पिके घेणार आहेत.एकंदरीत आपण जर का विचार केला तर शेतीसाठी पाणी नसल्याने हताश न होता पाण्याचे योग्य नियोजन आणि असे प्रयोग केल्यास नक्कीच शेतकऱ्याला आत्महत्त्या करण्याची वेळ येणार नाही हे नक्की.