औरंगाबाद : मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती बिकट बनली आहे. तर मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ८५३३ गावांपैकी ७२८१ गावांची यंदाच्या खरिपाची अंतिम पैसेवारी ही ५० पैशाच्या आत आली आहे, तर १२५२ गावांची पैसेवारी ५० पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ मराठवाड्यात १०० टक्के दुष्काळ आहे. विभागीय आयुक्तालयाने नुकतीच यासंदर्भातील आकडेवारी जाहीर केली असून तसा अहवाल शासनाच्या मदत व पुनर्वसन विभागाकडे पाठवण्यात आला आहे. मराठवाड्यातील सुमारे ४८ लाख हेक्टर क्षेत्र दुष्काळामुळे बाधित झालंय. तर बीड जिल्ह्यातील बीड, पाटोदा व शिरूर कासार तालुक्यांतील खरीप हंगामाची अंतिम पैसेवारी ४० पैशाच्या आत आली आहे.
मराठवाड्यात हिवाळ्यातच दुष्काळाचे चटके जाणवू लागले आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात परिस्थिती किती बिकट असेल याचा अंदाज जाणवत आहे . मराठवाडा व विभागातील अनेक जिल्ह्यात सध्या टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. जिथे पाण्याचा स्त्रोत आहे तेथून टॅंकरद्वारे पिण्याच्या पाण्याचं नियोजन केलं जात आहे . मात्र दोन महिन्यानंतर हे स्त्रोत हे आटले जाऊ शकतात त्यामुळे भर उन्हाळ्यात पाण्याची भीषण टंचाई मराठवाड्यात निर्माण होऊ शकते.ज्या लातूरला दोन वर्षभरापूर्वी रेल्वेने पिण्याचे पाणी पाठवण्यात आलं त्यात लातूर मध्ये आता दहा दिवसात एकदा पिण्याचे पाणी येत आहे.वरील परिस्थिती बघता शेतकऱ्यांना तातडीने मदतीची गरज आहे.