काँग्रेस आमदारांची खदखद आज दिल्लीत बाहेर पडणार…

काँग्रेस चे आमदार का नाराज आहेत. राज्यातील कोणत्या नेत्यांविरोधात सोनिया गांधी यांच्याकडे तक्रार करणार आहेत? वाचा काँग्रेस च्या आमदारांची खदखद काय आहे?

Update: 2022-04-05 04:54 GMT


आज राजधानी दिल्लीत महाराष्ट्र विधीमंडळाच्यावतीने नवनिर्वाचित आमदारांसाठी लोकसभा सचिवालय आणि प्राईड संस्थेच्या संयुक्त विद्यमाने संसदीय प्रशिक्षण कृती कार्यक्रमाचे आयोजन केलं आहे. त्यामुळं सर्व पक्षीय आमदार दिल्ली येथे दाखल झाले आहेत.

या कार्यक्रमासाठी काँग्रेस चे आमदार देखील उपस्थित आहेत. या काँग्रेस च्या आमदारांनी काँग्रेस च्या अध्यक्ष सोनिया गांधी यांची भेट मागितली आहे. ती भेट आज होण्याची शक्यता आहे. यातील काही आमदारांनी काँग्रेस नेते के सी वेणूगोपाल आणि मल्लीकार्जून खर्गे यांची भेट घेऊन राज्यातील काँग्रेस ची परिस्थिती अवगत केली आहे.

एका आमदारांनी नाव न सांगण्याच्या अटीवर काँग्रेस ची परिस्थिती मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना व्यक्त केली.

सध्या राज्यातील काँग्रेस तीन गटात विभागली आहे.

1. नाना पटोले

2. बाळासाहेब थोरात

3. अशोक चव्हाण

आणि या तीन गटाव्यतिरिक्त एक गट आहे. जो या तिघांच्याही गटात न जाता थेट दिल्लीतील नेत्यांच्या संपर्कात असतो. या गटात पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.

नाना पटोले एकला चलोची भूमिका घेतात. कुठल्याही नेत्यांसोबत चर्चा करत नाही. कोणत्याही आंदोलनाची माहिती देत नाही. अशोक चव्हाण फक्त आपल्या समर्थकांचा विचार करतात. अमर राजुरकर यांनी गटनेता बनवलं. यात त्यांनी कोणाशी चर्चा केली. बाळासाहेब थोरात यांची गुळगुळीत भूमिका घेतात. थेट भूमिका घेत नाही. त्यामुळं राज्यात कोणाचाच कोणाला मेळ नाही.

या सर्व गटातील नेत्यांचा आपसात फारसं पटत नाही. राज्यात काँग्रेस वाढावी म्हणून हे नेते कोणीही प्रयत्न करत नाही. दिल्लीतून सांगण्यात आलेली आंदोलन फक्त प्रत्येकाच्या मतदार संघात फोटो पुरती केली जातात. काँग्रेस वाढावी अशी भावना या नेत्यांच्या मनात नसते. त्यामुळे जनतेच्या मनात काँग्रेस बाबत चांगली भावना निर्माण होणे हा दूरचा विषय झाला आहे. असं या नेत्यांचं मत आहे.

काॅग्रेस चं डीजिटल नोंदणी अभियान सुरू आहे. या अभियानात सुरूवातीला राज्यात फारसा प्रतिसाद नव्हता. त्यानंतर राज्याचे प्रभारी एच के पाटील यांनी आमदारांची भेट घेऊन हे अभियान वाढवण्यास सांगितले. आता ही नोंदणी २० लाखांपर्यंत गेली आहे.

राज्य प्रभारी एच के पाटील आणि नाना पटोले यांचे जमत नाही. त्यामुळं राज्यात काँग्रेस कोणी वाढावी? हा प्रश्न आहे. माध्यंमासमोर बाइट देऊन काॅग्रेस वाढणार नाही. आम्ही सत्तेत आहोत. मात्र, काँग्रेसच्याच आमदारांचे काम होत नाही. काँग्रेसचेच मंत्रीच काँग्रेस च्या आमदारांची काम करत नाही. बाकी शिवसेना आणि राष्ट्रवादीचे मंत्री काय करणार?

विधानसभा अध्यक्षपदाचा मुद्दा अजूनही प्रलंबित आहे. हे पद जर शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेसकडे असते. तर इतके दिवस प्रलंबित राहिलं असतं का? असा सवाल या काँग्रेस नेत्याने बोलताना उपस्थित केला आहे. महामंडळाच्या रखडलेल्या नियुक्त्या बाबत कोणी काही बोलत नाही.

हे सगळे मुद्दे आम्ही मॅडमला (सोनिया गांधी) यांना सांगणार असल्याचं या नेत्याने मॅक्समहाराष्ट्रशी बोलताना सांगितलं.

मात्र, या आमदारांना सोनिया गांधी यांनी अद्यापपर्यंत भेटीची वेळ दिली नसल्याचं समजतं. त्यामुळं आता ही भेट होणार का? हा मुद्दा या निमित्ताने उपस्थित होतो.

Tags:    

Similar News