तळोदा तालुक्यातील गावे जलयुक्त शिवार योजनेत घ्यावी अशी मागणी सातत्याने करूनही प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, आता याच हलगर्जीपणामुळे तालुक्यातील ग्रामस्थांना दुष्काळाचे चांगलेच चटके बसताना दिसून येत आहेत.
शेतशिवारातील पाण्याचे स्रोत कोरडे झाल्याने शेतीची कामे पूर्ण बंद आहेत. तालुक्यात प्रथमच निर्माण झालेल्या या दुष्काळामुळे शेतकरी भांबावून गेले आहे. मे महिन्यात लागवड होणारा कापूस व इतर फळपिके पाऊस पडल्याशिवाय लागवड न करण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी नाईलाजास्तव घेतला आहे. तालुक्यात गेल्यावर्षी 8 हजार हेक्टरवर कापूस लागवड करण्यात आली होती. यातून बऱ्याच शेतकऱ्यांचे पावसाअभावी नुकसान झाले. यातून शेतकऱ्यांना मिळालेल्या कर्जमाफीचाही लाभ अद्याप पूर्णपणे शेतकऱ्यांना झालेला नाही.