परदेशी पक्षांचं माहेरघर असलेलं जायकवाडीचं आंतरराष्ट्रीय पक्षी अभयारण्यं, धरणाच्या पाणथळ जमिनीवर झालेल्या शेतीच्या अतिक्रमणामुळे संकटात सापडलंय. दरवर्षी लाखोंच्या संख्येनं येणाऱ्या परदेशी पक्षांनी यावर्षी मात्र जायकवाडीकडे पाठ फिरवलीय. शेतीचं अतिक्रमण, वृक्षतोड, रासायनिक खतांचा वापर, अनावश्यक पाण्याचा उपसा आणि बेसुमार मासेमारी या कारणांमुळे जायकवाडीचं पक्षी अभयारण्य आता नामशेष होतं की काय, अशी भीती निर्माण झालीय.
हा आहे जायकवाडीच्या पाणथळ जमिनीचा परिसर...ज्या पाण्याच्या उथळ परिसरात
जायकवाडी परिसरातील असंख्य शेतकऱ्यांनी, बॅक वॉटर परिसरात शेकडो एकर जमिनीवर अतिक्रमण करून शेती सुरु केलीय. परिणामी पक्षांची हक्काची जमीन हिरावली गेलीय. पाणथळ जमिनीवर सूर्यकिरणं जमिनीपर्यंत पोचतात. त्यातून शेवाळ निर्मिती होते. त्याला खाण्यासाठी माश्यांची दाटी आणि पर्यायायने पक्षांची गर्दी होते. पण, इथे मात्र ऊस उभा असल्याने, पक्षांची ही अन्नशृंखलाच मोडीत निघालीय.
शेतीच्या अतिक्रमणाबरोबरच इथे आणखी एक संकट घोंगावतंय ते रासायनिक खतं आणि किटकनाशकांचं. ऊसाचं भरमसाठ उत्पादन घेण्यासाठी इथल्या जमिनीवर शेकडो क्विंटल खतं आणि किटकनाशकांचा मारा केला जातोय. ज्याचे विषारी घटक पाण्यात मिसळून जैवविविधेचा नाश करत आहेत. किटकनाशकांचा तर इथे अक्षरशः पाऊस पाडला जातोय. शेतातलं तन जाळण्यासाठी राऊंडप सारखं अत्यंत विषारी रासायनही फवारलं जातंय. ज्यामुळे फक्त तणच नाही तर सूक्ष्म जीवांचे असंख्य बीजकोश सुद्धा नष्ट होताय आहेत. ज्याचा विपरीत परिणाम पक्ष्यांवर होतोय.
परदेशी पक्षी हे लाखो किलोमीटरचा प्रवास करत भारतात येतात, यात त्यांचा प्रमुख उद्देश असतो तो म्हणजे प्रजननाचा. जायकवाडी धरणावर मात्र या पक्षांना प्रजनन करता येईल, अशी परिस्थितीच दिसत नाहीय. कारण, पाणथळ जमिनीवर शेतीचं अतिक्रमण झाल्यामुळे अंडी घालण्यासाठी आवश्यक असणारी झाडं झुडपं तोडली गेलीयेत. मानवी वावर वाढलाय. त्यामुळे पक्षी या भागात थांबतच नसल्याचं समोर येतय. गेल्यावर्षापर्यंत याठिकाणी येणाऱ्या पक्षांची संख्या ही अडीच लाखांच्या आसपास होती. यंदा मात्र ती ८० ते १ लाखापर्यंत खाली रोडावल्याचं अभ्यासक सांगत आहेत.
इथं होणारी बेसुमार मासेमारी सुद्धा आहे त्या पक्षांच्या मुळावर उठलीय. जायकवाडीच्या बॅकवाटर परिसरात फिरताना इथं पारंपरिक मासेमारी करणाऱ्या "कहार" समाजाच्या असंख्य वस्त्या पाहायला मिळतात. जे लोक रोज मोठ्याप्रमाणात मासेमारी करतात. जायकवाडी धरणाचे नियमित निरीक्षक दिलीप भगत सांगतात “जयकवाडीतून रोज ट्रकच्या ट्रक झिंगे विक्रीसाठी जातात. झिंगे हेच तर पक्ष्यांचं प्रमुख खाद्य असतं आणि त्याचीच जर अशी लूट होत असेल तर, हे अभयारण्य कस काय टिकेल?”
हे असंच सुरू राहीलं तर मात्र जायकवाडी पक्षी अभयारण्याच्या कथा पुढच्या पिढीला पुस्तकातूनच वाचाव्या लागतील.
- दत्ता कानवटे