लाखो शेतकऱ्यांच्या आत्महत्या, करोडो तरुणांची बेरोजगारी ही कशाची लक्षणं आहेत?

Update: 2019-12-25 05:21 GMT

एखादा शेतकरी आत्महत्या करतो. त्यावेळी ती व्यक्तिगत / कौटुंबिक शोकांतिका नक्कीच असते; पण दरवर्षी काही हजार शेतकरी आत्महत्या करत असतील तर ? रस्त्यावरच्या अपघातात व्यक्तीचा मृत्यू व्यक्तिगत / कौटुंबिक शोकांतिका असते नक्कीच; पण दरवर्षी काही हजार व्यक्ती आणि त्यात देखील दुचाकीस्वार तरुण अपघातात मरत असतील तर ?

अविचाराने एखादे कुटूंब अति कर्जबाजारी झाल्यामुळे त्यांना राहणीमान खालावले तर ती त्या कुटुंबाची शोकांतिका असते नक्कीच पण अशी लाखो कुटुंबे कर्जबाजारीपणामुळे पीडित झालेली असतील तर ? एखाद्या तरुणाला उच्च शिक्षण घेऊन देखील नोकरी न मिळून तो वैफल्यग्रस्त झाला तर ती त्याची शोकांतिका असते नक्कीच पण समाजात असे लाखो शिक्षित तरुण बेरोजगार राहिल्यामुळे वैफल्यग्रस्त असतील तर ?

कॅन्सरचा फैलाव, हृदयविकार, मुलांनी मध्येच शाळा सोडणे, महिलांचे आरोग्य, अकाली वार्धक्य केव्हडी मोठी यादी करता येईल ! माणसाच्या आयुष्यातील दुःखाचे मूळ त्या व्यक्तीच्या दुर्दैवात शोधायचे का विशिष्ट सामाजिक वा आर्थिक प्रणालीत शोधायचे ?

या प्रश्नाचे उत्तर ती दुर्दैवी घटना अपवादात्मक आहे का? त्यात एक पॅटर्न / साचा दिसत आहे यावर ठरणार असते. तशाच दुर्दैवी घटना मोठ्याप्रमाणावर व वर्षानुवर्षे घडत असतील तर त्याची मुळे सामाजिक / आर्थिक सिस्टीमम्सध्ये आहेत हे नक्की

पण अंधश्रद्धा, भौतिक प्रश्नांना अधिभौतिक उत्तरे शोधण्याचा पगडा कोट्यवधी नागरिकांवर असल्यामुळे त्यांना हा पॅटर्न/ साचा दिसत नाही, सर्वदूर पसरलेला हा पॅटर्न / साचा त्यांना दिसायला लागला की नागरिक त्याला कारणीभूत असणारी सामाजिक / आर्थिक प्रणाली बदलायला घेतील; ती क्रांतीची सुरुवात असेल आणि त्यामुळे प्रस्थापितांचे धाबे दणाणेल.

माणसाच्या आयुष्यात घडणारी प्रत्येक घटना व्यक्तीगत शोकांतीका म्हणून बघण्याची कोट्यवधी नागरिकांची सवय बदलू नये. म्हणून हजारो बाबा, बुवाची फौज प्रस्थापित व्यवस्था पदरी बाळगते !

 

Similar News