दोन दिवसांपूर्वी नाणार रिफायनरीच्या समर्थनासाठी रत्नागिरी मध्ये मोर्चा निघाला. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर रिफायनरी पर्यावरणासाठी किती घातक आहेत हे सांगणारा पर्यावरणविषयक अभ्यासक गिरीश राऊत यांचा लेख
रिफायनरीतून प्रक्रिया झालेले सुमारे ८५- ९०% तेल ( पेट्रोल व डिझेल ) मोटारी वापरतात. मोटारींच्या उत्सर्जनाचा जगातील 'कार्बन डाय ऑक्साईड' वायूच्या एकूण उत्सर्जनात सुमारे ४०% (१५२० कोटी टन - सन २०१८) वाटा आहे. रिफायनरी चालताना, या वायूचे काही लाख वा कोटी टन उत्सर्जन प्रतिवर्षी, तिच्या क्षमतेप्रमाणे स्थानिक पातळीवर होते. तापमानवाढीमुळे मानवजात व जीवसृष्टी नष्ट होणे ही काल्पनिक गोष्ट नसून तसे घडत आहे. कार्बन डाय ऑक्साईड' वायू हा सूर्याची उष्णता शोषून तापमान वाढवण्यास प्रमुख्याने कारण आहे.
मोटारीकरणामुळे होणारे रस्ते, प्रत्यक्ष मोटार बनवण्यासाठी खाणकाम व इतर गोष्टी यासह मोटार चालताना होणाऱ्या उत्सर्जनाचा एकत्र विचार केला तर या वायूच्या पृथ्वीवरील सुमारे ७५ % ( सन २०१८ मधे २८५० कोटी टन) उत्सर्जनास मोटार व पर्यायाने रिफायनरी जबाबदार आहे.
मानवजात वाचवण्यासाठी, सूर्याची उष्णता शोषून धरणा-या 'कार्बन डाय ऑक्साईड' व इतर वायूंचे उत्सर्जन कमी करण्यासाठी, डिसेंबर २०१५ मधे पॅरिस येथे झालेल्या ऐतिहासिक करारावर पंतप्रधान मोदींनी स्वाक्षरी केली आहे. मात्र त्याप्रमाणे भारतासह चीन रशिया अमेरिका इ. देशांचे वर्तन न झाल्याने कार्बनचे उत्सर्जन वाढत गेले. दहा वर्षांपूर्वी या वायूचे उत्सर्जन सुमारे १००० कोटी टन प्रतिवर्षी होते. मात्र गेल्या वर्षी जगात या वायूचे सुमारे ३८०० कोटी टन उत्सर्जन झाले. यापैकी वर म्हटल्याप्रमाणे २८५० कोटी टन उत्सर्जनास मोटार व अर्थातच रिफायनऱ्या जबाबदार आहेत.
मोटारीचे अनेकांगी दुष्परिणाम दाखवणार्या जर्मनीतील संशोधनाने हे स्पष्ट केले आहे की मोटार हे पृथ्वीसाठी अरिष्ट आहे. एक अपघातच घ्या. दरवर्षी रस्ते अपघातात होणार्याो सुमारे साडेचार लाख मृत्यूंना प्रामुख्याने मोटारीकरण जबाबदार आहे. तीन दिवसांपूर्वी शनीवारी एकाच दिवशी महाराष्ट्रात १२ तरूणांचा मोटार अपघातात मृत्यू झाला.
सावित्री पुलाच्या दुर्घटनेमुळे लाखो वृक्ष तोडणारे गोवा मुंबई महामार्ग रूंदीकरण रेटले गेले. पण मुळात सावित्री पूल दुर्घटना तापमानवाढीमुळे सह्याद्रीच्या महाबळेश्वर परिसरात झालेल्या ढगफुटींचा परिणाम होता. ढगफुटीच्या अतिवृष्टीस व महापूरास तापमानवाढ जबाबदार होती. त्यासाठी पुन्हा प्रामुख्याने मोटारीचे उत्सर्जन व तिच्या रस्त्यांसाठी केलेली डोंगर व जंगलांची महापूर आणणारी तोड व त्यातून झालेला कार्बन शोषणाऱ्या हरितद्रव्याचा नाश कारण आहे. अज्ञानामुळे व त्याला स्वार्थाची जोड मिळाल्याने विकासाचा मुखवटा घालून गोवा मुंबई महामार्गाचे रूंदीकरण करून एका दुष्टचक्राला गती दिली गेली आहे.
याचा भयंकर परिणाम पहा. तापमानवाढ अपरिवर्तनीय झाली आहे. जगात सर्वत्र तापमान वाढत आहे. परवा दि. १९ जुलै रोजी मुंबईतील आतापर्यंतचे जुलै महिन्यातील विक्रमी तापमान नोंदले गेले. विदर्भ, नागपूर, मराठवाडा ऐन पावसाळ्यात भाजून निघत आहे. लोक गावे सोडत आहेत. हिंगोली तील 'सेनगाव' तालुक्यातील 'ताकतोडा' गाव ग्रामस्थांनी सलग चार वर्षे पाऊस पडला नाही, पाणी नाही, पिक येत नाही म्हणून विकायला काढले आहे. त्यांना जगण्यासाठी तेथे एम आय डिसी व औद्योगिक विकास करावा असे औद्योगिकरणाचे सूत्रधार, जनतेच्या मनात पेरतात. जनता त्याला बळी पडते. शेतकरी म्हणतो की, आता निसर्ग पण आम्हाला जगू देत नाही.
प्राचीन ऋषींनी डोंगर व पर्वतांना पृथ्वी मातेचे स्तन म्हटले. विज्ञानाचे नाव घेऊन प्रत्यक्षात अमानवी तंत्रज्ञानाचे शिक्षण घेतलेल्या काही पिढ्या झाल्या तरी यांना त्याचा अर्थ अजून कळत नाही. अरे, विकासाच्या नावाने एवढे डोंगर व त्यावरचे जंगल तोडता. बांधकामे, रस्ते करता. मग पाऊस, पाणी नाही, नदी वाहत नाही, भूजल नाही, विहिरी तळ्यांना पाणी नाही, म्हणून निसर्गालाच दोष देता? भूआवरण, जलावरण, वातावरण व जीवावरण, यापैकी एक तरी आवरण तुम्ही धड शिल्लक ठेवले आहे काय? हा बलात्कार, अत्याचार आधुनिकतेच्या नावाने तुम्ही राजरोस करता. करोडो वर्षे निसर्गाने तुम्हाला सर्व दिले. मग आताच ५०-६० वर्षांत ही परिस्थिती का? याचा साधा अर्थ तुम्हाला समजत नाही! या विकासाने देश व पृथ्वी प्रत्येक दिवशी उजाड होत चालली आहे. आणि तुम्ही, आम्हाला जगवायला उद्योग आणा, असे म्हणता! ज्यामुळे तुम्ही मृत्यूपंथाला लागला आहात त्यालाच आमंत्रण देता? काय म्हणावे या करंटेपणाला? कार, टीव्ही, काँप्युटर, फ्रीज, ए सी, वाॅशिंग मशिन, मोबाईल, प्लास्टिक, सीमेंट खाणार काय ? रसायनं पिऊन जगणार काय ? की नोटा खाणार?
जूनमधे युरोपात सुमारे ४५°से पेक्षा जास्त तापमानाच्या उष्णतेच्या लाटा आल्या. दक्षिण ध्रुवाजवळील ऑस्ट्रेलियात, जानेवारी महिन्यात ५०° से पर्यंत तापमानाच्या लाटा आल्या. हजारो प्राणी,
पक्षी व लाखो मासे मेले. सध्या, पूर्व अमेरिकेत ४०°से पर्यंत तापमान जाणारी अभूतपूर्व उष्णतेची लाट चालू आहे. लक्षात घ्या की, त्या देशांत लाखो वर्षे शून्याजवळ तापमान असे.