ऋचा भारती उर्फ ऋचा पटेल हे नाव भारतभर गेलं. ऋचा सद्या चांगलीच चर्चेत आहे. कदाचित, येत्या काही दिवसांत ती भारतीय जनता पार्टीचं नेतृत्व करताना दिसू शकेल. तिचं कर्तृत्वच तितकं जबरदस्त आहे. कुराणाच्या प्रती दान करण्याच्या न्यायालयीन आदेशाचं पालन करण्यास तिने स्पष्ट नकार दिला. सद्यस्थितीत देशात ही कृती प्रचंड हिंदू धर्माभिमानाची म्हणून समजली गेली नसती, तरच नवल होतं. न्यायालयाच्या आदेशामुळे माझ्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या, असा पवित्रा ऋचाने घेतला. तसा तो घेतल्याचा तिला स्वत:ला काही नैतिक अधिकार होता का, हे तपासणेसुध्दा आवश्यक आहे.
मूळात, ऋचा विरोधात गुन्हा दाखल झालाय, तोच मुस्लिम समाजाविरोधात आपत्तीजनक टीपणी केल्याबद्दल. मुस्लिम समाज संपवला पाहिजे, अशा आशयाची ती पोस्ट होती.
ऋचाने स्वत: ती लिहिलेली नव्हती, तर शेअर केलेली होती. वास्तविक, मुस्लिम समाज संपवला पाहिजे, हे केंद्रात व अनेक राज्यांत सत्तेवर असलेल्या भाजपा व त्यांच्या बंधूभगिनी संघटनातले कित्येक जण या ना त्या मार्गाने बोलत असतात. एक प्रकारे या विखारी मानसिकतेला राजमान्यताच प्राप्त झाली आहे. ट्वीटर, फेसबुक, व्हॉट्सएपवर अशा आशयाचा मजकूर वाचायला मिळणं ही आता भारतात एक सर्वसाधारण गोष्ट झाली आहे. तरीही, अपवादात्मक बाब ही की काही मुस्लिमांच्या तक्रारीवरून ऋचाविरोधात गुन्हा दाखल झाला व तिला अटकही झाली.