मोबाईलमग्न बहुजन नाटक आणि ग्रंथांकडे का वळत नाहीत?- प्रा.हरी नरके

Update: 2019-10-23 12:45 GMT

आज बहुजन समाज शिकून सवरून महत्वाच्या पदांवर पोहोचलाय. काहींचे पगार इतके मुबलक आहेत की, त्या पैशांचं काय करावं? असा त्यांना प्रश्न पडतो. शिक्षक, प्राध्यापक, सरकारी अधिकारी, खाजगी क्षेत्रातील पगारदार अशा बहुजनांची राज्यातली संख्या किमान १ कोटी असावी.

हा समाज शिकला सवरला पण पुस्तकांकडे वळला नाही. यातल्या ९९% लोकांच्या घरी एकही पुस्तक आढळणार नाही. ही माणसं मॉलमध्ये जाऊन भरमसाठ खरेदी करतील. पण एकही दिवाळी अंक विकत घेणार नाहीत.

उथळ, भंपक, कंगालीकरण आणि सुमारीकरण असलेल्या हिन्दी, मराठी टिव्ही कार्यक्रमात संपुर्ण बुडालेला हा समाज नाटकं बघायला मात्र कधीही फिरकत नाही.

बहुजनांचा ज्ञाननिर्मितीशी असा उभा दावा का?

सत्ताधारी झाले, श्रीमंत झाले, शिक्षण संस्थांचे मालक झाले, अधिकारी बनले पण हे बहुजन वाचनाकडे का वळले नसावेत? व्हॉटसॲपवर २४ तास रमणारा हा स्त्री पुरूष जमाव झुंडीत लवकर शिरतो, मग त्याला ग्रंथसंग्रहाचे वावडे का?

१% पेक्षा जास्त बहुजन वाचन-लेखन, संशोधन, ओपनियन मेकींग यांच्या फंदात पडत नाहीत. बहुजन प्राध्यापक,शिक्षक, अधिकारी,पत्रकार वाचन, वैचारिक चर्चा,व्यासंग, सर्जन/निर्मितीच्या क्षेत्रात दिसतात असा आरोप मी करणार नाही. कुठे चुकले? काय चुकले? हे असे का? कोणी सांगेल ?

Similar News