• पेरणीच्या वेळी कायदेशीर मार्गाने पीक कर्ज उपलब्ध झाले नाही तर शेतकरी नाईलाजाने खाजगी सावकारांकडे वळतात. शेतकरी त्यांना जमीनदार म्हणतात.
• एखाद्या शेतक-याने सावकाराकडून १ लाख रुपये कर्ज घेतले तर त्याला त्यावर ३६००० ते १,२०,००० रुपये इतके प्रचंड व्याज भरावे लागते.
• लातूरमध्ये खरीप हंगामासाठी पीक कर्ज वितरणाचे उद्दिष्ट जवळपास १९०० कोटी रुपये होते. या पैकी ५५ टक्के उद्दिष्ट गाठण्यात आलं आहे. मराठवाड्यात हा आकडा ३१ टक्के आहे.
• २०१४ च्या सावकारी नियंत्रण(नियमन) कायद्यानुसार सावकारांना परवाना घेणे बंधनकारक असून वर्षाला कमाल १२ टक्के व्याज दर आकारण्याची मुभा आहे. पण या तरतुदी फक्त कागदावरच अस्तित्वात आहेत.
एका टुमदार आयताकृती खोलीमध्ये भिंतींवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांची पूर्णाकृती तैलचित्रे लावलेली आहेत. दोन लोडांवर हात टेकून बसलेला, कडक इस्त्रीचा पांढरा कुर्ता आणि गांधी टोपी घातलेला सद्गृहस्थ सरकारच्या शेतक-यांविषयी असलेल्या संवेदनशीलतेवर तोंडसुख घेतोय. तो म्हणतो, "राज्य सरकारची फक्त बोलाची कढी आहे! खरंच कर्जमाफी झाली का? बँका शेतकऱ्यांना पीक कर्ज देत आहेत का ?"
पण तो हे सांगायला विसरतोय की पीक कर्ज वितरणातल्या सरकारच्या अकार्यक्षमतेचा सरळसरळ संबंध त्याच्या वाढत्या दौलतीशी आहे. तो एक खाजगी सावकार आहे. शेतकरी त्याला जमीनदार म्हणतात. जर पेरणीपूर्वी पीक कर्ज मिळाले नाही तर शेतक-यांना यांच्यापुढे नाक घासावे लागते.
शेतकऱ्याच्या जमीनीचा तुकडा गहाण घेऊन ताबडतोब पैसे देताना याच्या चेहऱ्यावरची एक सुरकुतीही हलत नाही. प्रस्तुत पत्रकाराची लातूरमध्ये ज्या सावकाराची भेट झाली त्याच्याकडे १०० एकर जमीन आहे. तो म्हणतो. "ही माझ्या पूर्वजांच्या काळापासून आहे." त्यांचे वडीलही सावकार होते आणि हा फक्त त्यांच्याच पावलावर पाऊल ठेउन चालतोय. पण त्याचं हे ढोंग म्हणजे गावक-यांसाठी उघड गुपित आहे, आणि त्याला ढोंग करण्याची परवानगी आहे आणि आमचे बोलणे पुढे सुरु राहते.
"पण सावकार महिन्याला १५ टक्के व्याज लावत नाहीत का?” आपला स्मार्टफोन बाहेर काढून आणि हायवेवरील हॉटेलमधून कॉफीच मागवताना तो पटकन दुरुस्ती करतो. "नाही ते बहुदा ३ ते १० टक्क्यांच्या दरम्यान असते,"
पण मासिक तीन ते दहा टक्के म्हणजे दरसाल दरशेकडा ३६ ते १२० टक्के व्याज! एखाद्या शेतक-याने सावकाराकडून एक लाख रुपये कर्ज घेतले तर त्याच्याकडून दरसाल ३६००० ते १.२ लाख रुपयांपर्यंत व्याज वसूल केले जाते. लातूरच्या निलंगा तालुक्यातील हलगारा गावचे ४८ वर्षांचे धोंडराव गि-हाणे सांगतात, “आम्ही नुस्तं व्याजाच भरतोय आणि मूळ मुद्दल जसे आहे तसेच बाकी राहिले आहे.” त्यांनी दरमहा ३ टक्के दराने एक लाख रुपये कर्ज उचलले आहे.