Home > Top News > War Effects on India's Dairy Industry : दूध संकट येणार? डेअऱ्यांकडे फक्त 10 दिवसांचा साठा !

War Effects on India's Dairy Industry : दूध संकट येणार? डेअऱ्यांकडे फक्त 10 दिवसांचा साठा !

गॅस टंचाईचा पॅकेजिंग उद्योग आणि दुग्ध व्यवसायाला कसा फटका बसतोय? युद्धामुळे संकटामुळे भारतातील दुग्धव्यवसायावर काय परिणाम होतोय? दुग्धव्यावसायिक काय सांगतात? जाणून घेण्यासाठी वाचा रेणुका कड यांचा लेख

War Effects on Indias Dairy Industry : दूध संकट येणार? डेअऱ्यांकडे फक्त 10 दिवसांचा साठा !
X

India dairy industry crisis भारतातील शेतकर्‍यांकडून, दूध उत्पादकांकडून दुधाचे सर्वात जास्त वार्षिक उत्पादन 230 दशलक्ष टन घेतले जाते. त्या खालोखाल भात 129 दशलक्ष टन, गहू 110 दशलक्ष टन, मका 35.91 दशलक्ष टन, साखर 34 दशलक्ष टन इत्यादी उत्पादने आहेत. India stands as the world's largest milk-producing nation जगातील एकूण दूध उत्पादनापैकी 24 टक्के उत्पादन करणारा भारत हा जगातील सर्वात मोठा दूध उत्पादक देश आहे. 2014 सालापासून युरोपीय महासंघ आणि अमेरिकेला मागे सारुन भारत दुग्धोत्पादनात प्रथम क्रमांकाचा देश बनला. दुग्ध व्यवसायाचा एकूणच भारतीय अर्थकारणाला हातभार लागला आहे. सहकारी तत्त्वावर गावोगावी सुरु झालेल्या या व्यवसायाला आता मोठ्या उद्योगाचे स्वरुप प्राप्त झाले आहे. वार्षिक 15.04 दशलक्ष टन उत्पादनासह महाराष्ट्र दुग्धोत्पादनात भारतात पाचव्या क्रमांकावर आहे. पण पश्चिम आशियातील वाढत्या संघर्षामुळे भारताच्या कृषी आणि अन्न निर्यातीवर गंभीर परिणाम होत असल्याचे दिसून येत आहे. भारताने 2025 साली सुमारे 11.8 अब्ज डॉलर (जवळपास ₹98,000 कोटी) किमतीची कृषी उत्पादने या प्रदेशात निर्यात केली होती. हा आकडा भारताच्या एकूण कृषी निर्यातीपैकी सुमारे 21–22 टक्के आहे. त्यामुळे या भागातील अस्थिरता भारतासाठी केवळ आंतरराष्ट्रीय प्रश्न नसून थेट शेतकरी, मत्स्यव्यवसाय आणि अन्न प्रक्रिया उद्योगाशी संबंधित आर्थिक संकट ठरू शकते.

पश्चिम आशिया हा भारतासाठी अत्यंत महत्त्वाचा बाजार आहे. दुग्धजन्य पदार्थ, तांदूळ, गहू, साखर, मसाले, फळे, भाजीपाला, आणि मांस यासारख्या उत्पादनांची मोठ्या प्रमाणावर निर्यात या भागात होते. विशेषतः तांदळाच्या निर्यातीमध्ये या प्रदेशाचा मोठा वाटा आहे. भारताच्या एकूण तांदूळ निर्यातीपैकी सुमारे 35 ते 37 टक्के हिस्सा पश्चिम आशियात जातो. त्यामुळे या संघर्षाचा थेट परिणाम पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांतील शेतकऱ्यांवर होण्याची शक्यता आहे.

दुग्ध व्यवसायाबाबत स्थिती पाहिली असता मुंबईसह महाराष्ट्रातील दुग्धव्यवसायावर सध्या सुरू असलेल्या एलपीजी संकटाचा गंभीर परिणाम होत असून, येत्या काही दिवसांत दुधाच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दुग्ध व्यवसायिकांच्या मते, प्लास्टिक दूध पिशव्यांचा साठा केवळ १० दिवसांसाठीच उरला आहे, ज्यामुळे संपूर्ण पुरवठा साखळी विस्कळीत होण्याचा धोका निर्माण झाला आहे. या संकटाचे मूळ कारण म्हणजे एलपीजीचा तुटवडा आहे. दूध प्रक्रिया (pasteurisation) आणि प्लास्टिक पिशव्यांचे उत्पादन या दोन्ही प्रक्रियांमध्ये एलपीजीचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. सध्या गॅस पुरवठा कमी झाल्यामुळे पॅकेजिंग उद्योग अडचणीत आला आहे. त्यामुळे दूध पिशव्या तयार करणाऱ्या कारखान्यांचे उत्पादन घटले आहे.

दुग्ध व्यवसायिकांचे म्हणणे आहे की, “जर ही परिस्थिती अशीच राहिली तर १० दिवसांत दूध पॅकेजिंग पूर्णपणे थांबू शकते,” आणि याचा थेट परिणाम शहरांतील दैनंदिन दूध वितरणावर होईल. भारतात बहुतांश दूध प्लास्टिक पिशव्यांमध्येच विकले जाते, त्यामुळे पॅकेजिंगची कमतरता म्हणजे प्रत्यक्षात दूध उपलब्धतेवर परिणाम होणे होय. या संकटाचा आणखी एक पैलू म्हणजे दूध प्रक्रिया. दूध सुरक्षित ठेवण्यासाठी त्याचे पाश्चरीकरण (pasteurisation) करणे आवश्यक असते, आणि ही प्रक्रिया मोठ्या प्रमाणावर LPG एलपीजीवर अवलंबून आहे. गॅस कमी पडल्यामुळे विशेषतः लहान आणि मध्यम डेअऱ्यांना दूध प्रक्रिया करणे कठीण होत आहे, ज्यामुळे दूध खराब होण्याचा धोका वाढला आहे. मुंबईतील अनेक दूध डेअऱ्यांनी सांगितले की, प्लॅस्टिक पिशव्या आणि पॉलिथिनची कमतरता आधीच जाणवू लागली आहे. काही डेअऱ्यांकडे केवळ १० दिवसांचा साठा उरला असून, त्यानंतर मोठे संकट निर्माण होऊ शकते. या एलपीजी संकटामागे जागतिक कारणेही आहेत. पश्चिम आशियातील संघर्षामुळे ऊर्जा पुरवठा साखळी विस्कळीत झाली आहे. विशेषतः होर्मुज तणावामुळे भारतासारख्या आयात-आधारित देशांमध्ये LPG, कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूचा पुरवठा कमी झाला आहे. या परिस्थितीचा परिणाम फक्त दुग्ध व्यवसायापुरता मर्यादित राहणार नाही, तर सामान्य ग्राहकांनाही त्याचा फटका बसू शकतो. दुधाच्या किंमती वाढणे, पुरवठा कमी होणे आणि दुग्धजन्य पदार्थांची टंचाई निर्माण होणे अशी शक्यता आहे. तज्ञांच्या मते, या संकटावर तातडीने उपाययोजना करणे आवश्यक आहे. सरकारने पॅकेजिंग उद्योग आणि दुग्ध व्यवसायाला प्राधान्याने एलपीजी पुरवठा करणे, पर्यायी ऊर्जा स्रोतांचा वापर वाढवणे आणि लॉजिस्टिक साखळी मजबूत करणे गरजेचे आहे.

एकूणच, एलपीजी संकटामुळे निर्माण झालेली ही परिस्थिती केवळ तात्पुरती अडचण नसून, भारताच्या अन्नसुरक्षेशी संबंधित गंभीर इशारा आहे. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर येत्या काही दिवसांत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम दिसू शकतो. भारतातील बहुतांश शेतकरी शेतीला पूरक व्यवसाय म्हणून छोट्या मोठ्या स्वरूपाचा दूध व्यवसाय करतात युद्धाची ही परिस्थिती अशीच राहिली तर याचा थेट परिणाम शेतकरी आणि दुग्ध व्यवसाय करणार्‍या लहान मोठ्या व्यवसायिकांवर मोठ्या प्रमाणात होईल. निर्यात कमी झाल्यास देशांतर्गत बाजारात उत्पादनांची अधिकता निर्माण होऊन भाव घसरण्याची शक्यता आहे. यामुळे आधीच आर्थिक अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांचे उत्पन्न आणखी घटू शकते. दुग्धजन्य पदार्थ, कांदा, केळी, द्राक्षे आणि मसाले यांसारख्या उत्पादनांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो. जर तातडीने उपाययोजना केल्या नाहीत, तर येत्या काही दिवसांत दूध आणि दुग्धजन्य पदार्थांच्या पुरवठ्यावर मोठा परिणाम दिसू शकतो.

Updated : 31 March 2026 5:14 AM IST
Next Story
Share it
Top