Home > Top News > War affects Common People : युद्ध झळा - युद्धाची किंमत गरिबांच्या जीवावर ?

War affects Common People : युद्ध झळा - युद्धाची किंमत गरिबांच्या जीवावर ?

War affects Common People : युद्ध झळा - युद्धाची किंमत गरिबांच्या जीवावर ?
X

पश्चिम आशियामधील युद्धाला आज ४० दिवस झाले आहेत. सध्याच्या बातम्यांनुसार हे युद्ध २ आठवड्यांसाठी थांबवलं असलं तरी ह्या ४० दिवसात सत्ताधार्‍यांनी युद्ध करून काय कमावलं? आणि याची किंमत कोण चुकवत आहे हे रोज माध्यमातून समोर येणार्‍या विनाशाच्या बातम्यातून दिसत आहे. युद्ध करणार्‍यांना कदाचित वाटतं असेल की युद्ध फक्त सीमांवर होतं, पण वास्तव वेगळं आहे. युद्ध तुमच्या आमच्या घरातल्या स्वयंपाकघरात केव्हाच पोहोचलं आहे. या युद्धाची किंमत आता गरिबांच्या कष्टातून ही लुटली जात आहे. छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणावर शेअरिंग ऑटो चालतात. जिथे कष्टकरी वर्ग दहा रुपये देऊन एका चिकलठाणा ते सिडको किंवा सिडको ते रेल्वेस्टेशन तीस रुपये देऊन प्रवास करत होता. पण आता युद्ध सुरू झाले तेव्हा पासून याची झळ ह्या गरीब वर्गाला प्रचंड मोठ्या प्रमाणात बसत आहे. शेअरिंग ऑटोचालकांनी प्रत्येक ठिकाणचे भाडे दुप्पट केले आहे. दहा रूपयाच्या ऐवजी वीस रुपये, तीस रूपयाच्या ऐवजी पन्नास रुपये गरिबांच्या खिशातून लुटले जात आहे. अंबडमधून एक आजी नातेवाईकांना भेटण्यासाठी संभाजीनगरच्या हॉस्पिटलमध्ये आल्या. पण मोजकेच पैसे सोबत असल्यामुळे कडक उन्हाच्या तडाख्यात आजीने धूत हॉस्पिटल ते सिडको बसस्टँडचा प्रवास चालत केला. ऑटोवाल्यांना जास्तीचे भाडे घेण्याबद्दल कोणी बोलले तर गॅस महाग झाला, पेट्रोल-डिझेल मिळत नाही यामुळे भाडेवाढ झाली असे सांगितले जाते. यावर एका महिलेने मार्मिक प्रतिक्रिया दिली, ’ युद्ध करणारे युद्धं करून आरामात बसले आहे, इकडे एक गरीब दुसर्‍या गरिबाला लुटत आहे’ आधी कोरोनामुळे हाल झाले आता गॅसमुळे होत आहे. गरिबांनी जगायचं कस? दुसरी महिला म्हणाली, आम्ही गावाकडं निघालो, तिकडं कट्याकुट्या जमून चूलतरी मांडता येईल इथ तेही करता येईना? किती दिवस उपाशी बसायच.

देशाची आर्थिक राजधानी असलेले मुंबई शहर फोर्टमध्ये अनेक छोटी छोटी चहाची टपरीवजा हॉटेल्स होती, ही सगळी हॉटेल्स गॅस मिळत नाही म्हणून बंद झाली आहेत. एखाद दुसर हॉटेल सुरू आहे तर तिथे दहा रूपयाचा कटिंग चहा आता वीस रुपयाला मिळत आहे. त्यामुळे रोज सकाळी जोकष्टकरी वर्ग, सफाई कामगार एक कटिंग चहा आणि पाव खाऊन कामाची सुरुवात करत होते त्यांच्यासाठी रोज वीस रुपयाचा चहा महाग आहे. बहुतांशी मजूर वर्ग पुन्हा आपल्या गावी परत जात आहे. मिळेल ती ट्रेन पकडून जस जमेल तर तस गाव गाठत आहे. इथ उपाशी मरण्यापेक्षा गावी गेलेलं बर असे लोकांचं मत आहे.

इराणवरील युद्ध केवळ मध्यपूर्वेपुरते मर्यादित नाही. ते जागतिक अर्थव्यवस्था आणि सामान्य नागरिकांच्या जीवनावर थेट परिणाम करत आहे. जगभरात लाखो लोक आजही दारिद्र्याशी झुंज देत असताना, जागतिक राजकारणाचा केंद्रबिंदू मात्र युद्ध, स्पर्धा आणि सत्तासंघर्ष याभोवती फिरत आहे, त्यामुळे गरिबांनी कसे जगायचे हा गंभीर प्रश्न उभा राहतो. जगातील सुमारे ७३६ दशलक्ष लोक अजूनही अत्यंत गरिबीत जगत आहेत. तरीही जागतिक संसाधने मोठ्या प्रमाणावर युद्ध, शस्त्रसाठा आणि संरक्षण खर्चावर खर्च होत आहेत. गरीबी, असमानता आणि बेरोजगारी हे मानवी विकासासाठी सर्वात मोठे धोके आहेत. पण या समस्यांवर एकत्रितपणे लढण्याऐवजी राष्ट्रे एकमेकांविरुद्ध लढत आहेत. आज मानवतेसमोर खरी लढाई ही गरीबीविरुद्ध , भूक आणि अन्नसुरक्षेविरुद्ध , हवामान बदलांविरुद्ध आणि असमानतेविरुद्ध पण या समस्यांवर जागतिक एकजूट दिसत नाही. उलट, युद्धामुळे संसाधने वाया जात आहे आणि विकासाचा वेग मंदावतो.

इराणविरोधातील संघर्ष फक्त सुरक्षेचा किंवा अणुशस्त्रांचा प्रश्न नाही; तो सत्तासंतुलन, तेलसंपत्ती आणि भू-राजकीय वर्चस्वाचा भाग आहे. अमेरिका आणि त्याचे मित्र राष्ट्र इराणवर दबाव आणून त्याची राजकीय व्यवस्था बदलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण हा दृष्टिकोन नवीन नाही. अफगाणिस्तान, इराक, लिबिया यांसारख्या देशांमध्येही तोच प्रयोग झाला आणि परिणाम आपल्यासमोर आहेत ते म्हणजे अस्थिरता, यादवी संघर्ष आणि मानवी संकट. युद्धाला “लोकशाही स्थापनेचे साधन” म्हणून सादर करणे ही एक राजकीय कथा आहे; प्रत्यक्षात युद्ध हा आर्थिक आणि राजकीय हितसंबंधांचा विस्तार असतो. या प्रक्रियेत सर्वात मोठा बळी ठरतो तो सामान्य गरीब नागरिक.

इराणविरोधातील संघर्षाला अनेकदा “जागतिक सुरक्षा” म्हणून सादर केले जाते. परंतु प्रश्न असा आहे की, ही सुरक्षा नेमकी कोणासाठी? सामान्य नागरिकांसाठी की जागतिक शक्तींच्या आर्थिक व राजकीय हितासाठी? तेल, व्यापारमार्ग आणि प्रादेशिक वर्चस्व यावर नियंत्रण ठेवण्याची स्पर्धा ही या संघर्षाची खरी पार्श्वभूमी आहे. हा संघर्ष “सुरक्षेचा” नाही तो नियंत्रणाचा आहे. तेलसंपत्तीवर पकड , मध्यपूर्वेतील वर्चस्व आणि जागतिक शक्ती संतुलन हेच खरे कारण आहेत. त्यामुळे “सुरक्षा” हा शब्द अनेकदा एक राजकीय मुखवटा ठरतो. यांचे मानवी जीवनावर होणारे परिणाम हे शिक्षण आणि आरोग्य व्यवस्था कोलमडते , स्थलांतर आणि निर्वासितांचे प्रश्न वाढतात , महिलांवर आणि मुलांवर सर्वाधिक परिणाम होतो , विकास प्रकल्प ठप्प होतात परिणामी यामुळे एक संपूर्ण पिढी विकासाच्या मुख्य प्रवाहापासून दूर जाते.

या युद्धामुळे एक धोकादायक ट्रेंड दिसून येत आहे, तो म्हणजे “Militarisation over Welfare”

क्षेत्र प्राधान्य, संरक्षण वाढते, आरोग्य स्थिर / कमी, शिक्षण अपुरे, गरीबी निर्मूलन दुर्लक्षित येणार्‍या काळात हा ट्रेंड बदलला नाही, तर युद्धाच्या खर्चाची किंमत गरीबांना चुकवावी लागणार आहे. युद्ध रणांगणावर सुरू होतं पण त्याची झळ प्रत्येक गरिबांच्या खिशाला बसते.


Who benefits from war, War vs humanity debate, Militarization vs welfare, Global inequality and war, Political economy of war, War and capitalism analysis, Iran War Impact on Economy, Middle East War Impact on Common People, War and Inflation India, Oil Price Impact on Poor, Global Conflict Economic Impact, War vs Poverty Debate, Cost of War on Citizens, Fuel Price Hike India News, Inflation Due to War 2026, Economic Impact of Iran Conflic

Updated : 8 April 2026 9:21 AM IST
Next Story
Share it
Top