Home > Top News > Unity in Diversity India : आम्ही भारतीय !

Unity in Diversity India : आम्ही भारतीय !

हिंदूत्वाच्या नावाखाली सुरु असलेलं राजकारण आणि भारतात असलेली विविधतेतील एकता यावर डॉ. प्रदीप पाटील यांचा लेख

Unity in Diversity India : आम्ही भारतीय !
X

"एक देव, एक धर्म, एक समाज" ही भारतीय संकल्पना नाही. ती मुस्लीम व ख्रिश्चन संकल्पना आहे.

हिंदू हा भारतीय आहे. त्यामुळे भारतीय म्हणजे सर्व धर्म, जात, पंथ, संप्रदाय, चालीरीती, कर्मकांडे, यांची एकत्र येऊन एकमेकांचा आदर राखून, समान कष्टाचे भान राखून केलेली राष्ट्र उभारणी. जर हिंदू हा शब्द वापरायचा ठरवला तर खुद्द हिंदू हा वरील प्रमाणे अनेक पंथ, जाती आणि विचार धारेत विभागला आहे. तीच इथली संस्कृती आहे!

"सर्व हिंदू एक आहेत" असे म्हंटले तरीही ते एक नाहीत हे समाजातले वास्तव आपण नाकारत आहोत. कारण इथल्या हिंदू धर्मग्रंथांनीच जात मान्य करून ते वेगळे आहेत एक नाहीत असे घोषित केलंय!! एवढेच नव्हे तर हिंदूंनीच ब्राम्हण सर्वश्रेष्ठ आणि महार-मांग कनिष्ठ असे भेद केले आहेत. ते एक नाहीत. ही जात व पंथ व्यवस्था फक्त हिंदू मध्येच नाही. तर ती ख्रिश्चन, इस्लाम, इत्यादी सर्व धर्मात आहे. म्हणूनच जगातील कोणताच धर्म कधीही एक नव्हता व नाही! तो विविध पंथात विभागून विस्कळीत अवस्थेत आहे. जर या देशात हिंदू हा शब्द सर्व धर्मियांना लागू केला तर 'हिंदू ख्रिश्चन', 'हिंदू मुस्लिम', 'हिंदू सिख', 'हिंदू ज्यू', वगैरे हास्यास्पद वर्गीकरण होईल. दुसऱ्या राष्ट्रांमध्ये देखील तसेच घडेल. जसे की, ख्रिश्चन संस्कृती राष्ट्रात मग 'ख्रिश्चन हिंदू', 'ख्रिश्चन मुस्लीम', 'ख्रिश्चन बौद्ध', वगैरे राहतात असे म्हणावे लागेल! किंवा मुसलमान राष्ट्रात 'मुस्लीम हिंदू', 'मुस्लीम ख्रिश्चन', म्हणावे लागेल!! हा गोंधळ बिनडोकपणाचा आहे. यातूनच राष्ट्रातील बहुसंख्येने असणाऱ्या धर्माचे कायदे अल्पसंख्यांकांनी मान्य करावेत हे तत्व जागतिक पातळीवर शिल्लक राहत नाही. तेथे लोकशाही तत्व सर्वत्र जगभरात म्हणूनच आचरणात आणले गेले आहे.

सगळा धर्म एकत्र बांधून ठेवण्याचा अट्टाहास काल्पनिक व भ्रामक आहे. वास्तवास धरून नाही. प्रत्येक जातीला, पंथाला, विचारधारेला, स्वतःचे स्वतंत्र अस्तित्व टिकवायचे आहे. ते 'स्वतःचे सांस्कृतिक' मूल्य जपतात. ते हिंदू म्हणून नव्हे. तर पुर्वजांच्या चालीरिती म्हणून जपतात. वेगळे भक्तीमार्ग मानतात. भजन, पूजन, यात्रा, उत्सव, नृत्य, कला, गायन, वादन, आहार, वस्त्रे, ड्रेस, भाषा, हे सारे वर्षानुवर्षे पुर्वजांनी सांगितले म्हणून पाळतात. ४ हजार वर्षांपूर्वीचे पुर्वज हिंदू नव्हते. तर ते सेपियन्स म्हणून वाढले. आणि तेव्हाच ते वेगळेपण आले. मटण खाणारा आणि शाकाहारी दोघेही हिंदू असले तरी ते वेगवेगळे समजतात आणि जगतात. म्हणजे ते, "एक है तो सेफ है" असे केंव्हा समजतात ? तर, जेव्हा दोघेही हिंदू म्हणून नव्हे तर संविधानाने आहाराचे वैविध्य मान्य करून भारतीय म्हणून स्विकारले आहे तेंव्हा!! हे सर्व बाबतीत लागू आहे म्हणजे, पूजा पद्धती, आचार पद्धती, धर्म आचारण पद्धती, वगैरे. हे अधिकार हिदूंनी दिलेले नाहीत. ते संविधानाने दिले आहेत. लोकशाही राष्ट्राने दिले आहेत. लोकशाही ऐवजी हिंदू हा शब्द घुसडणे म्हणजे संविधान न मानणे होय.

भारतात असे विविध संप्रदाय, जाती, पंथ, रहात होते ते सेफ नव्हते का? जर ते सेफ नसते तर ते नष्ट झाले असते. हिंदू संस्कृतीतील प्रत्येक जात ही भारतावर अनेक आक्रमणे झाली, राज्यकर्ते येऊन गेले, विविध धर्मिय येऊन गेले, तरीही चिवटपणे टिकून राहीलीय. तेंव्हा कुणी हिंदू किंवा सनातनी ते वाचवत नव्हता. प्रत्येक जातींनी आपला कडवेपणा आचार व व्यवहारात ठेवला म्हणून ते आजही टिकले. त्यासाठी कुणा संघाची गरज नव्हती व आजही नाही.

मुस्लीम व ख्रिश्चन हे एक देव, एक धर्म मानतात. पण गंमत म्हणजे त्यांच्यातही पंथ भेद, जातीभेद, विचार भेद, प्रचंड आहेत. सध्याचे हिंदू नेते म्हणवणारे हिंदूंचे इस्लामीकरण किंवा ख्रिश्चनीकरण करण्याच्या नादात आहेत. पण हे खुद्द इस्लाम, ख्रिश्चनांना जमलेले नाही व जमणार नाही. ते तसेच 'हिंदू' नावाखाली 'एक है तो सेफ है' असा नारा लगावत होईल हा विचार भ्रम आहे.

हजारो देव मानणाऱ्या या देशातील हिंदू लोक 'एकच देव माना' हे इस्लामी पद्धती प्रमाणे मानतील हे शक्य नाही. इथे शेताच्या बांध्यावरील एक साधा दगडही वेगळा देव म्हणून मानला जातो. ही प्राचीन समजूत मोडून हिंदूंचे इस्लामीकरण करणे म्हणजे त्यांची स्वतःची ओळख नष्ट करणे चालू आहे. म्हणूनच हिंदू खतरे मे नाही. हिंदूत्वाच्या नावाखाली राजकारण करणाऱ्यांमुळे प्रत्येक जात, पंथ व परधर्मीय खतरे में है. 'एकेश्वरवाद' र्किवा 'एकच देव माना' हे म्हणणे नॉन बायॉलॉजिकल आहे. म्हणजे प्रत्येकाच्या हाताचे ठसे वेगवेगळे असतात. याचा अर्थ प्रत्येक माणूस किंवा व्यक्ती इतरांहून वेगळी असते. युनिक असते. ती वेगळी नसून एकच आहे, तिच्यात वेगळेपण नाहीच, असे म्हणणे म्हणजे ईलॉजिकल आहे. ज्याला कॉनव्हर्स एरर म्हणतात. हे तर्कदोष सध्याचे 'एक है तो सेफ है' वाले बाळगतात.

एक राष्ट्र, एक समाज, एक संस्कृती हे भ्रमिष्टांचे स्वप्न ठरते.

वास्तव हे आहे की, या भारतात विविधतेत एकता आहे. ती एकजुट करून आहे. या विविधतेने एकजुट करून या देशावरील आक्रमणे व अन्याय परतवून लावली आहेत. त्यांचे धैर्य, त्यांचे राष्ट्रप्रेम व त्यांची समज ही मुलभूत सुरक्षिततेवर उभी आहे. ती हिंदू म्हणून नव्हे. तरीही 'हिंदू' नावाचा वापर करून 'तो खतरेमे है' असे खोटे सांगून राजकारणापोटी इथल्या विविधतेत एकता असलेल्या संस्कृतीचेच नुकसान हिंदुत्ववादी करत आहेत. हे धोकादायक आहे आणि खोटारडेपणाचे देखील आहे. असंविधानिक आहे व लोकशाही नष्ट करणारे आहे.

लोकांनी स्वतःच्या संरक्षणासाठी आणि प्रगतीसाठी लोकांनीच एकत्र येऊन चालवलेले लोकशाही राष्ट्र आहे. हे हिंदूनी चालवलेले नव्हे. म्हणूनच या देशातील प्रत्येक व्यक्ती हिंदू नसून भारतीय आहे. तीच खरी जागतिक आणि भारतीय व्यक्तीचा सन्मान करणारी ओळख आहे. हिंदूंचे इस्लामीकरण करणाऱ्या हिंदुत्ववाद्यांचा म्हणूनच असणारा धोका आपण सर्वांनी ओळखला पाहिजे.

-डॉ. प्रदीप पाटील


Unity in Diversity India, Unity in Diversity India, Indian Constitution, Democracy India, Secularism India, Hinduism Politics, Caste System India, Religious Pluralism, Cultural Diversity India, National Identity India, Hindutva Politics

Updated : 10 Feb 2026 1:47 PM IST
Next Story
Share it
Top