Home > Top News > Politicization of History : टिपू सुलतानचे राजकारण !

Politicization of History : टिपू सुलतानचे राजकारण !

टिपू चांगला की वाईट? सतत टिपू सुलतानच्या नावे राजकारण का केले जाते? इतिहासाचा वापर “समजून घेण्यासाठी” होत नाही, तर “भडकवण्यासाठी” होतोय. इतिहास हा राजकीय पक्षांसाठी एक प्रकारचे शस्त्र बनला आहे का? इतिहास शिक्षणाचा नाही तर राजकारणाचा विषय झाला आहे का? वाचा जगदीश काबरे यांचा विशेष लेख

Politicization of History  : टिपू सुलतानचे राजकारण !
X

History become weapon for political parties टिपू सुलतान या एका ऐतिहासिक व्यक्तिमत्त्वाभोवती आज महाराष्ट्रात जे काही राजकारण पेटले आहे, ते केवळ “टिपू चांगला की वाईट?” या प्रश्नापुरते मर्यादित नाही. ही लढाई वस्तुतः इतिहासाची नाहीच; तर ही लढाई इतिहासाच्या मालकीची आहे. कोणाला कोणता इतिहास हवा आहे, कोणाला कोणाच्या भावना भडकवायच्या आहेत, कोणाला कोणत्या निवडणुकीसाठी कोणत्या समाजाला एकत्र आणायचे आहे, या सर्व गोष्टींचे मिश्रण म्हणजे टिपू सुलतानवरची आजची चर्चा. म्हणूनच ती चर्चा इतिहासाची कमी, आणि राजकीय हेतूंशी जास्त जोडलेली दिसतेय. अशा वेळी एखाद्या नेत्याच्या विधानावरून कार्यकर्त्यांमध्ये झटापट होणे, प्रतिमेला जोडे मारणे, जीभ छाटण्याची भाषा करणे, इनाम जाहीर करणे, हे सर्व प्रकार इतिहासाच्या प्रेमातून घडत नाहीत. हे प्रकार इतिहासाच्या नावावर उन्माद निर्माण करून सत्ता टिकवण्याच्या मानसिकतेतून घडतात. कारण ज्यांना खरा इतिहास हवा असतो, ते पुस्तक हातात घेतात; आणि ज्यांना राजकीय आग पेटवायची असते, ते हातात दगड घेतात.

हर्षवर्धन सपकाळ यांच्या विधानानंतर जी प्रतिक्रिया उमटली, ती पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते की, आताशा आपल्या देशात अभिव्यक्ती स्वातंत्र्याची व्याख्यासुद्धा राजकीय सोयीप्रमाणे बदलली जायला लागली आहे. एखाद्या व्यक्तीने इतिहासाबद्दल मत व्यक्त केले, तर त्यावर वैचारिक प्रतिवाद करणे हा लोकशाहीचा मार्ग आहे. पण त्याऐवजी त्याला मारण्याची भाषा करणे, जीभ छाटण्यासाठी बक्षीस जाहीर करणे, त्याची प्रतिमा जाळणे किंवा जोडे मारणे, हे कोणत्याही सभ्य समाजाचे लक्षण नाही. हा सरळसरळ दहशतवादाचाच प्रकार आहे. हा धार्मिक आणि राजकीय दहशतवाद आहे. अशा प्रकाराला जर “भावना दुखावल्या” या नावाखाली समर्थन मिळत असेल, तर मग या देशात सत्य, विवेक आणि इतिहास या तिघांनाही जमिनीत गाडले जाईल.

खरे तर जीभ छाटण्याची धमकी देणाऱ्या वर एफ आय आर व्हायला पाहिजे होती; पण तो भाजपचा काय तथागतीत कार्यकर्ता आहे म्हणून सरकारचे मिंधे झालेल्या पोलिसांनी सपकाळ यांच्यावरच एफआयआर दाखल केली. हा प्रकार अत्यंत निंदनीय असून त्यातून एक असा धोकादायक संदेश सुचित होतो की “तुम्ही धमकी द्या, हिंसा भडकवा, लोकांना मारण्याची भाषा करा, तरी तुमच्यावर कारवाई होणार नाही; पण कोणी इतिहासावर हिंदुत्ववाद्यांच्या मनाविरुद्ध आणि मताविरुद्ध व्यक्त झाले तर त्याच्यावर गुन्हा दाखल होईल.” अशा प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था जर राजकीय पक्षाच्या हातातील खेळणे झाली, तर लोकशाहीतील न्याय ही संकल्पनाच हळूहळू संपते. शिवाजी महाराजांचे नाव घेऊन जर अशा प्रकारचा अन्याय समर्थित केला जात असेल, तर तो शिवाजी महाराजांचा अपमानच ठरतो. कारण शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले ते दहशतीवर नाही, तर लोकांच्या विश्वासावर. त्यांनी राज्य चालवले ते भावनिक उन्मादावर नाही, तर व्यवहारज्ञानावर आणि प्रशासनाच्या शिस्तीवर.

इथेच एक मोठा विरोधाभास दिसतो. जे लोक शिवाजी महाराजांचा अपमान झाला म्हणून पेटून उठतात, तेच लोक जेव्हा कोश्यारीसारखे नेते शिवाजी महाराजांबद्दल अपमानास्पद वक्तव्य करतात तेव्हा मात्र शांत राहतात. जेव्हा सतत खोटा इतिहास उगाळणाऱ्या आणि रेटून खोटे बोलणाऱ्या नरेंद्र मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करून “आजके शिवाजी” नावाचे पुस्तक काढले जाते, तेव्हा त्यांना शिवाजी राजांचा अपमान झाला असे वाटत नाही. म्हणजे शिवाजी महाराजांचे नाव हे त्यांच्यासाठी श्रद्धेचे नाही, तर फक्त राजकीय हत्याराचे साधन बनते. शिवाजी महाराजांचा वापर हा केवळ मतदारांना भावनिक करून सत्तेची मांडणी मजबूत करण्यासाठी केला जातो. आणि यामुळेच टिपू सुलतानसारख्या व्यक्तिमत्त्वाची चर्चा इतिहासकारांच्या टेबलावर नाही, तर राजकीय मैदानात राडा घालण्यासाठी केली जाते.

टिपू सुलतान हा इतिहासातील अत्यंत गुंतागुंतीचा शासक होता. तो ना पूर्ण देवदूत होता, ना पूर्ण राक्षस. तो एकाच वेळी अनेक रंगांनी रंगलेला होता. धर्माभिमानी मुस्लीम शासक, शिस्तप्रिय प्रशासक, इंग्रजांविरुद्ध झुंज देणारा लढवय्या, आधुनिक शस्त्रतंत्र स्वीकारणारा सुधारक आणि युद्धाच्या रणांगणात कठोर निर्णय घेणारा सेनापती. अशा व्यक्तीला एका वाक्यात “हिंदूद्वेष्टा” ठरवणे हे इतिहासाचे सुलभीकरण करणे झाले. कारण जेव्हा एखादी व्यक्ती एका चौकटीत बंदिस्त केली जाते, तेव्हा तिच्या आयुष्याचा बहुरंगी संदर्भ नष्ट होतो आणि लोकांच्या मनात फक्त द्वेष किंवा देवत्व देणे इतकेच उरते.

टिपू सुलतानच्या प्रशासनाबद्दल अनेक ऐतिहासिक नोंदी सांगतात की त्याने न्यायव्यवस्थेत हिंदू आणि मुस्लीम समाजासाठी स्वतंत्र न्यायाधीश नेमले होते. मुस्लिमांसाठी काझी आणि हिंदूंसाठी पंडित अशी रचना ही त्या काळातील सामाजिक वास्तव लक्षात घेऊन निर्माण केलेली प्रशासकीय पद्धत होती. आजच्या आधुनिक लोकशाही व्यवस्थेत न्याय हा धर्मावर आधारित नसावा, हे योग्य आहे. पण अठराव्या शतकात समाजाची रचना धर्म आणि जातीच्या आधारावरच चालत होती. त्या समाजाला विश्वास देण्यासाठी आणि प्रशासन अधिक प्रभावी करण्यासाठी राज्यकर्त्यांनी धार्मिक परंपरांचा विचार करून व्यवस्था उभी करणे हे त्या काळात अपरिहार्य मानले जायचे. त्यामुळे टिपूची ही व्यवस्था “समतावादी” होती का नाही हा मुद्दा इथे उपस्थित होत नाही. पण ती व्यवस्था स्थैर्य निर्माण करणारी आणि त्या काळातील परिस्थितीत व्यवहार्य ठरणारी होती, हे नाकारता येत नाही.

टिपूच्या शासनातील आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याने सामाजिक शिस्तीवर भर दिला. दारूबंदी, वेश्याव्यवसायावर निर्बंध आणि गांजा यासारख्या पदार्थांवर कडक कारवाई, या काही गोष्टी त्याच्या कारभारात ठळकपणे दिसतात. त्या काळात सतत युद्धे होत होती आणि राज्य टिकवण्यासाठी मनुष्यबळ, महसूल आणि शिस्त या तिन्ही गोष्टींची गरज होती. शिवाजी महाराजांनीही स्वराज्य उभारताना काही ठिकाणी कडक शिस्त आणली होती. त्यामुळे “शिस्तप्रिय कारभार” हा केवळ एका धर्माचा गुण नाही, तो राजकारणाचा आणि युद्धकालीन गरजेचा भाग असतो.

टिपू सुलतानच्या सामाजिक सुधारणांबद्दलही अनेक संदर्भ चर्चेत येतात. केरळमधील बहुपत्नीत्वावर बंदी, स्त्रियांच्या सन्मानरक्षणासाठी घेतलेले निर्णय, या गोष्टी त्याच्या कारभाराची एक सुधारकी बाजू दर्शवतात. स्त्रियांचे स्तन न झाकण्याच्या कुप्रथेवर बंदी आणण्याच्या मागे त्याचा हाच उद्देश होता. टिपूने काही सामाजिक प्रश्नांमध्ये हस्तक्षेप केला कारण त्यामागे राज्यशिस्त व सामाजिक नियंत्रण हा हेतू होता. म्हणजे तो केवळ तलवारीच्या जोरावर राज्य चालवणारा नव्हता, तर समाजाच्या रचनेत हस्तक्षेप करणारा शासकही होता. त्यामुळे “तो फक्त अत्याचारी होता” असे एकसुरी चित्र उभे करणे अपुरे ठरते. टिपू सुलतानच्या धार्मिक धोरणाबद्दलचा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे त्याने अनेक हिंदू मंदिरांना देणग्या दिल्या, जमिनी दिल्या आणि संरक्षण दिले, हे कसे नाकारता येईल? श्रीरंगपट्टणच्या रंगनाथस्वामी मंदिराला दिलेल्या देणग्यांचा उल्लेख वारंवार येतो. प्रशासनात अनेक हिंदू अधिकाऱ्यांना महत्त्वाची पदे देणे हीही त्याच्या कारभारातील महत्त्वाची बाब आहे. एखादा शासक जर खरोखरच “हिंदूंचा शत्रू” म्हणून संपूर्ण राज्य चालवत असेल, तर त्याच्या प्रशासनात हिंदूंना इतके स्थान मिळाले असते का? हा प्रश्न उपस्थित होतो. अर्थात याचा अर्थ असा नाही की टिपूच्या काळात कोणत्याही हिंदूंवर अत्याचार झाले नाहीत. पण याचा अर्थ एवढाच की त्याचे धोरण केवळ धार्मिक द्वेषावर आधारित होते असे म्हणणे वस्तुनिष्ठ नाही.

शृंगेरी मठाचा प्रसंग हा तर या वादातील अत्यंत महत्त्वाचा संदर्भ आहे. पेशव्यांनी शृंगेरी मठाची लूट केली होती. पण त्या लुटीनंतर त्या मठाच्या पुनर्बांधणीसाठी टिपूने मदत केली. इथे एक धक्कादायक वास्तव समोर येते, ते म्हणजे हिंदू पेशव्यांनी हिंदू शंकराचार्यांच्या मठालाच लुटले. म्हणजे अत्याचार हा नेहमी धर्मावर आधारित असतो असे नाही, तर तो सत्ता, स्वार्थ आणि युद्धनीतीवर आधारित असतो. हे समजून घेतले तर “मुस्लीम म्हणजे हिंदूंचा शत्रू” आणि “हिंदू म्हणजे हिंदूंचा रक्षक” अशा सरळसोट कल्पना कोसळून पडतात. पण राजकारणाला अशी सरळसोट विभागणीच हवी असते. कारण विभागणी जितकी सोपी तितके धृवीकरण अधिक तीव्र. याच कारणामुळे आज हिंदुत्ववादी विचारसरणीला टिपू सुलतानला हिंदूंचा शत्रू म्हणून उभे करणे राजकीयदृष्ट्या सोयीचे वाटते. कारण टिपू हा मुस्लीम शासक होता. पण तो इंग्रजांशी लढला. जर टिपूचा हा गौरव लोकांच्या मनावर ठसला तर मुस्लीम शासकही देशभक्त होते, हे सत्य लोकांच्या मनात रुजेल. जर मुस्लीम शासक देशभक्त ठरला, तर मग “हिंदू विरुद्ध मुस्लिम” हा राजकीय खेळ कमकुवत होईल. म्हणून टिपूला केवळ अत्याचारी दाखवणे आणि त्याच्या आधुनिकतेच्या, राष्ट्रविरोधी इंग्रजांविरुद्धच्या लढ्याच्या, प्रशासनातील सुधारणांच्या गोष्टी दुर्लक्षित करणे, हा राजकीय रणनीतीचा भाग बनतो.

शिवाजी महाराज हे महाराष्ट्रासाठी केवळ इतिहासातील शासक नाहीत; ते सांस्कृतिक आत्मसन्मानाचे प्रतीक आहेत. शिवाजी महाराजांच्या संघर्षाचे स्वरूप, त्यांची स्वराज्यकल्पना, त्यांची प्रशासनपद्धती, लोककल्याणाचा दृष्टिकोन, या गोष्टींचे ऐतिहासिक महत्त्व फार वेगळे आहे. टिपू सुलतान हा दक्षिण भारतातील महत्त्वाचा शासक होता, त्याने इंग्रजांशी लढा दिला, तो रणांगणात लढतालढता मेला, हे सर्व मान्य आहे. पण शिवाजी महाराजांच्या समकक्ष म्हणून त्याला उभे करणे यामागे देखील राजकीय हेतू असू शकतो. म्हणजे एका बाजूला भाजप टिपूला “हिंदूद्वेष्टा” बनवते, तर दुसऱ्या बाजूला काही लोक टिपूला “दक्षिणेचा शिवाजी” बनवतात. या दोन्ही बाजूंमध्ये इतिहास हरवतो आणि राजकीय प्रतीक उभे राहते. खरा मुद्दा असा की, इतिहास हा आरसा आहे. त्या आरशात आपण राज्यकर्त्यांच्या गुणदोषांसह त्या काळातील सामाजिक-राजकीय वास्तव पाहतो. टिपू सुलतानच्या बाबतीतही हेच लागू होते. त्याच्या काळात युद्धे होती, सत्तासंघर्ष होता, इंग्रजांचा विस्तारवाद होता आणि स्थानिक राजे आपापल्या स्वार्थासाठी परकीयांशी हातमिळवणी करत होते. त्यामुळे टिपूचा संघर्ष हा केवळ धर्माचा संघर्ष नव्हता, तो साम्राज्यवादाचा विरोधातील संघर्ष होता.

१७९० च्या सुमारास टिपू सुलतानची ताकद प्रचंड वाढली होती. “म्हैसूरचा वाघ” म्हणून तो ओळखला जाऊ लागला होता. इंग्रजांना भारतात पाय रोवण्यासाठी टिपू हा सर्वात मोठा अडथळा वाटत होता. याच वेळी पुण्यात शनिवारवाड्यात वेगळीच समीकरणे तयार होत होती. पेशव्यांच्या दरबारात नाना फडणवीस हे मुत्सद्दी होते, पण त्यांच्या मुत्सद्देगिरीचे स्वरूप नेमके कसे होते, तर इंग्रजांविरुद्ध एकत्र येण्याऐवजी, त्यांनी इंग्रजांशी मैत्री करून टिपूला संपवण्याचा मार्ग स्वीकारला होता. त्यातून १ जून १७९० रोजी पेशवे, हैदराबादचा निजाम आणि इंग्रज यांच्यात जो करार झाला, त्याला अनेक ठिकाणी “Triple Alliance” असे संबोधले जाते. या कराराचा मुख्य उद्देश टिपू सुलतानचा पराभव करणे आणि त्याचे राज्य आपापसात वाटून घेणे हा होता. ही घटना अत्यंत कटू सत्य समोर आणते. जे इंग्रज पुढे संपूर्ण भारताला गुलाम बनवणार होते, त्या इंग्रजांनाच पेशव्यांनी मदत केली. ही मदत करून पेशव्यांनी इंग्रजांना भारतातील राजकीय परिस्थिती समजून घेण्यासाठी, आपल्या शत्रूंना कमजोर करण्यासाठी आणि आपली सत्ता वाढवण्यासाठी अप्रत्यक्षपणे सहाय्यच केले होते. युद्धनीती आणि मुत्सद्देगिरी ही त्या काळाची गरज होती हे मान्य. पण परकीय शक्तीला भारतात बळकट करण्यासाठी मदत करणे ही पेशव्यांची रणनीती पुढे आत्मघातकी ठरली. कारण टिपू संपल्यानंतर इंग्रजांनी मराठ्यांचाही घास घेतला. म्हणजे पेशव्यांनी आपल्या शत्रूला संपवण्यासाठी ज्याला मदत केली, तोच मदत घेणारा परकीय शत्रू पुढे त्यांचाच घास घेता झाला. त्यामुळे इतिहास सांगतो की, स्वार्थासाठी केलेली तात्कालिक मुत्सद्देगिरी दीर्घकालीन गुलामगिरीला कारणीभूत ठरू शकते.

टिपू सुलतानने इंग्रजांशी शेवटच्या श्वासापर्यंत संघर्ष केला. तो इंग्रजांसमोर झुकला नाही. इंग्रजांनी अनेक भारतीय राजांना आपल्या बाजूला वळवले, काहींना लालूच दाखवून, काहींना धमकावून, काहींची आपसात फूट पाडून. पण टिपूचा इंग्रजांविरुद्धचा लढा सतत चालू राहिला. आणि म्हणूनच इंग्रजांना तो संपवणे आवश्यक वाटले. १७९९ मध्ये श्रीरंगपट्टणच्या युद्धात टिपूचा मृत्यू झाला, तेव्हा इंग्रजांनी केवळ एका राजाचा पराभव केला नव्हता; तर त्यांनी भारतातील एका मोठ्या प्रतिकारशक्तीचा कणा मोडला होता. कारण त्यामुळेच त्यानंतर इंग्रजांची वाट मोकळी झाली. जर मराठे आणि टिपू एकत्र आले असते तर काय झाले असते, हा प्रश्न इतिहासात “जर-तर” या स्वरूपाचा असला तरी एवढे मात्र नक्की म्हणता येईल की, भारतीय शक्तींची एकजूट जर झाली असती तर इंग्रजांना भारतात बळ वाढवणे इतके सोपे राहिले नसते. इंग्रजांची सर्वात मोठी ताकद ही त्यांच्या बंदूक किंवा तोफेपेक्षा भारतीयांमधील फूट पाडण्यात होती. आणि ही फूट कायम ठेवण्यासाठी त्यांनी कुशल राजकारण केले. दुर्दैवाने भारतीय राजांनीही आपापल्या स्वार्थासाठी ही फूट वाढवत नेली.

टिपू सुलतानच्या योगदानाबद्दल बोलताना त्याच्या आधुनिक युद्धतंत्राचा उल्लेख हमखास करावा लागतो. रॉकेट तंत्रज्ञानाच्या संदर्भात टिपू आणि हैदरअली यांच्या सैन्याने लोखंडी आवरणाचे रॉकेट्स वापरले होते, हे इतिहासात नमूद आहे. त्या काळात हे रॉकेट्सचे तंत्र इंग्रजांसाठी धक्कादायक ठरले होते. इंग्रजांनी त्याचा अभ्यास करून पुढे युरोपात रॉकेट तंत्रज्ञान विकसित केले, असा इतिहासात संदर्भ आढळतो. म्हणजे टिपूचे युद्धतंत्र हे त्या काळात आधुनिक होते आणि तो तंत्रज्ञान स्वीकारण्यात मागे नव्हता. हा त्याच्या व्यक्तिमत्त्वातील एक आगळावेगळा आणि महत्त्वाचा पैलू आहे. तो फक्त तलवारीवर अवलंबून राहिला नाही; त्याने नव्या तंत्रज्ञानाचा वापर केला. यामुळेच त्याला “म्हैसूरचा वाघ” म्हणून ओळख मिळाली.

टिपूने महसूल व्यवस्था आणि शेती सुधारणा यावरही भर दिला. राज्य टिकवण्यासाठी आर्थिक व्यवस्था मजबूत असणे आवश्यक होते. युद्धासाठी पैसा हवा, सैन्यासाठी अन्नधान्य हवे, आणि लोक समाधानी ठेवण्यासाठी उत्पादन वाढवावे लागते. म्हणूनच त्याच्या प्रशासनात काही ठिकाणी शेती सुधारणा, महसूल पद्धतीचे नियोजन, जलसंधारणाचे प्रयत्न या गोष्टी केलेल्या आढळतात. अर्थात त्या काळात शेतकऱ्यांवर कराचा भारही होता, आणि युद्धामुळे सामान्य जनतेला त्रासही झाला. पण “त्याने काहीच केले नाही” असे म्हणणे चुकीचे ठरेल. टिपूच्या व्यक्तिमत्त्वाबद्दल एक प्रसिद्ध वाक्य वारंवार उद्धृत केले जाते. “मेंढीसारखे शंभर वर्षे जगण्यापेक्षा वाघासारखे एक दिवस जगणे उत्तम.” हे वाक्य त्याच्या मानसिकतेचे प्रतीक मानले जाते. यामध्ये एक प्रकारचा बंडखोर आत्मसन्मान दिसतो. इंग्रजांशी लढताना तो माघार घेण्यास तयार नव्हता. त्याने आपल्या राज्याचा स्वाभिमान आणि स्वातंत्र्य टिकवण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे राष्ट्रवादाच्या चौकटीत पाहिले तर त्याचा इंग्रजविरोधी संघर्ष महत्त्वाचा ठरतो. त्याच वेळी त्याचे काही निर्णय कठोर आणि क्रूरही ठरले असतील, पण त्या काळातील युद्धनीती आजच्या मानवाधिकारांच्या निकषांवर तपासली तर मग अनेक हिंदू राजेही दोषी ठरतील. शिवाजी महाराजांच्या युद्धातही कठोर निर्णय झालेच, पण त्यांचे लोककल्याणाचे धोरण आणि प्रजेबद्दलचा दृष्टिकोन वेगळा होता. त्यामुळे तुलना करताना भावनिक उन्माद न करता इतिहासाचा संदर्भ समजून घेणे आवश्यक आहे.

आज टिपू सुलतानच्या नावाने महाराष्ट्रात जी चर्चा चालू आहे, ती पाहिली तर एक गोष्ट स्पष्ट दिसते इतिहासाचा वापर “समजून घेण्यासाठी” होत नाही, तर “भडकवण्यासाठी” होतोय. इतिहास हा राजकीय पक्षांसाठी एक प्रकारचे शस्त्र बनला आहे. हिंदू समाज एकत्र करण्यासाठी टिपूला हिंदूद्वेष्टा ठरवले जाते आहे. सामान्य जनतेला इतिहासातील सत्य माहीत असतेच असे नाही. पण जनतेला फक्त भावनिक घोषणा भावतात. म्हणूनच आजची गरज आहे ती इतिहासाचे विवेकी मूल्यमापन करण्याची. टिपू सुलतान हा एक महत्त्वाचा शासक होता. त्याने इंग्रजांविरुद्ध संघर्ष केला, आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारले, काही सुधारणा केल्या, काही ठिकाणी कठोर निर्णय घेतले, काही ठिकाणी धार्मिक व्यवहारही केले. तो गुण आणि दोषांनी युक्त असलेला एक माणूस होता. पण आज त्याला केवळ “हिंदूद्वेष्टा” ठरवणे हे इतिहासाशी प्रतरणा करणारे विधान आहे. इतिहास हा राजकीय गरजांवर आधारित लिहिला गेला तर समाज कायम भांडत राहील. पण इतिहास जर पुराव्यांवर आधारित अभ्यासला गेला तर समाजाला सत्य समजेल. आणि सत्य समजले की समाजाची परिपक्वता वाढते. पण सत्य हे नेहमीच कटू असते. पेशव्यांनी इंग्रजांशी हातमिळवणी केली हे सत्य कटू आहे. पण ते सत्य स्वीकारले नाही, तर आपण पुन्हा पुन्हा त्याच चुका करत रहाणार. त्यामुळे इतिहास हा केवळ भूतकाळ नाही; तर वर्तमान समाजाला परिपक्व आणि प्रगल्भ करणारा दस्तऐवज असतो.

शिवाजी महाराजांचे खरे स्मरण हे त्यांच्या नावाने दुसऱ्यांना मारण्याची भाषा करण्यात नाही. शिवाजी महाराजांचे खरे स्मरण हे त्यांच्या लोककल्याणाच्या विचारात आहे, त्यांच्या प्रशासनाच्या शिस्तीत आहे, त्यांच्या न्यायप्रियतेत आहे, त्यांच्या स्वराज्याच्या संकल्पनेत आहे. जर आपल्याला शिवाजी महाराजांचा वारसा पुढे न्यायचा असेल, तर हिंसेची भाषा थांबवावी लागेल. कारण शिवाजी महाराजांनी शत्रूशी युद्ध केले, पण विरोधी मत व्यक्त करणाऱ्या प्रजेला शत्रू समजले नाही. त्यांनी धर्माच्या नावाने उन्माद माजवला नाही. उलट स्वराज्याच्या नावाने लोकांना संघटित केले.

टिपू सुलतानच्या संदर्भातील हा वाद मात्र आपल्याला सांगतोय की, आपल्या देशात इतिहास हा आता शिक्षणाचा विषय राहिला नाही; इतिहास हा राजकारणाचा विषय झाला आहे. जेव्हा इतिहास राजकारण्यांच्या हाती जातो, तेव्हा सत्य मरते, विवेक मरतो, आणि शेवटी समाजात दहशत निर्माण होते. जीभ छाटण्याची भाष करत इनाम जाहीर करणे, जोडे मारणे, या सगळ्या घटना इतिहासाशी संबंधित नसून समाजाच्या मानसिक अधःपतनाशी संबंधित आहेत. म्हणून आज आवश्यकता आहे ती एका विवेकवादी भूमिकेची. टिपू सुलतानवर चर्चा करा, पण पुराव्यांवर आधारित करा. त्याच्या दोषांवर बोला, पण सत्याच्या आधारावर बोला. त्याच्या गुणांवर बोला, पण अतिशयोक्ती न करता बोला. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, कोणत्याही ऐतिहासिक चर्चेत हिंसा, धमकी आणि दहशत यांना स्थान देऊ नका. कारण जेव्हा समाज विचार करणे सोडून मारणे शिकतो, तेव्हा तो समाज इतिहासालाच नष्ट करतो.

परकीय शत्रूला रोखण्यासाठी देशातील शक्तींची एकजूट आवश्यक असते, अन्यथा परकीय शक्ती फूट पाडून राज्य करते. इंग्रजांनी हेच केले. त्यांनी मराठे, निजाम, टिपू, राजपूत, बंगालचे नवाब, या सगळ्यांना वेगवेगळ्या पद्धतीने वापरले. आणि भारत गुलाम झाला. आज जर आपण पुन्हा इतिहासाच्या नावाने द्वेष वाढवला, तर आपण त्या गुलामगिरीच्या मानसिकतेलाच पुनर्जीवित करतोय. म्हणूनच इतिहास विसरून चालणार नाही, पण इतिहासाचा उन्मादी वापरही चालणार नाही. सत्य पचवण्याची ताकद ठेवणे हीच खरी देशभक्ती आहे, आणि विवेक टिकवणे हीच खरी देशाची सेवा आहे.

Updated : 22 Feb 2026 5:00 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top