Valentine's Day : प्रेम : वासनेपासून दिव्यतेकडे जाणारा प्रवास !
X
१४ फेब्रुवारी म्हणजे प्रेमाचा दिवस...valentine's day हा दिवस अनेक प्रेमी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करतात. प्रत्येकाची प्रेमाची व्याख्या वेगवेगळी असते. प्रेम म्हणजे काय? प्रेम म्हणजे केवळ शारीरिक आकर्षण नव्हे. प्रेमाची किमान तीन पातळी आपण पाहू शकतो.
१) शारीरिक प्रेम
२) उदात्त प्रेम
३) दैवी प्रेम
मानवी स्वभाव जसा सत्त्व, रज आणि तम या तीन गुणांनी बनलेला आहे, तसाच प्रेमाचाही विकास या तीन पायऱ्यांतून होत जातो. प्रारंभी ते आकर्षणाच्या स्वरूपात असते; पुढे त्यात उदात्तता येते; आणि शेवटी ते दैवीतेकडे झेपावते. Sigmund Freud या महान मानसशास्त्रज्ञाने ‘लिबिडो’ किंवा कामशक्ती ही मानवी वर्तनामागील प्रभावी शक्ती असल्याचे सांगितले. तारुण्यातील बहुतांश प्रेमभावना मेंदूतील रासायनिक प्रक्रियांमुळे निर्माण होतात. आकर्षणाचे केंद्र मन नसून मेंदू आहे. असे मत मांडणे अतिशयोक्ती ठरणार नाही. भूतकाळातील अनुभव, स्मृती, कल्पना आणि भावनिक साठा यांचा स्फोट झाला की शारीरिक आकर्षणाची ठिणगी पडते.
परंतु हीच कामशक्ती जर योग, साधना, समाजकार्य आणि निसर्गसंगती यामध्ये रूपांतरित केली, तर तिचे रूपांतर उदात्त प्रेमात होऊ शकते. जसे पाण्याला उष्णता दिली की ते वाफ होते, आणि त्या वाफेवर रेल्वे इंजिन धावते. तसेच वासनेची ऊर्जा रूपांतरित केली तर ती सृजनशक्तीत परिवर्तित होते. इतिहासात आपण पाहतो की अनेक साधू-संत, कलाकार, कवी यांनाही वासनेच्या आकर्षणापासून पूर्णपणे अलिप्त राहणे कठीण गेले आहे. मानवी स्वभावातील ही शक्ती अत्यंत प्रबळ आहे. म्हणूनच संयम हीच खरी साधना आहे.
मिराबाई यांनी मेवाडच्या राजवैभवाचा त्याग करून संत मार्ग स्वीकारला. कबीर यांच्यातील संतत्व त्यांनी ओळखले. त्याचप्रमाणे गौतम बुद्ध राजपुत्र असूनही वैभवाचा त्याग करून दुःखनिवारणाचा मार्ग शोधण्यासाठी निघाले. त्यांच्या मते अज्ञान हे दुःखाचे मूळ आहे, आणि ज्ञानातूनच मुक्ती प्राप्त होते.
वासना हे पाप नाही; परंतु अनैतिक मार्गाने तिची पूर्ती केली तर जीवन उध्वस्त होऊ शकते. साहित्य, चित्रपट किंवा समाजातील विकृत प्रतिमा जर चुकीचे आदर्श निर्माण करीत असतील, तर त्याला बळी न पडता आपण नीतिमूल्यांची कास धरली पाहिजे. लहान मुलांपासून ते प्रौढांपर्यंत सर्वांनी संयम, विवेक आणि नैतिकता यांचा मार्ग स्वीकारला तर वासनेचे रूपांतर दिव्य प्रेमात होऊ शकते. लैला–मजनूचे प्रेम असो किंवा राधा–कृष्णाची भक्तीभावपूर्ण अनुभूती प्रेमाचा अंतिम टप्पा हा शुद्धता आणि समर्पण यांच्यात आहे. या प्रेमदिनाच्या निमित्ताने आपण सर्वांनी शारीरिक आकर्षणाच्या पलीकडे जाऊन उदात्त आणि दिव्य प्रेमाचा अनुभव घ्यावा हीच सदिच्छा
डॉ. सुभाष के देसाई
Love Journey, Lust to Divinity, Types of Love, Spiritual Love, Divine Love

डॉ. सुभाष के देसाई
वयाच्या 19व्या वर्षापासून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, पर्यटक, गिर्यारोहक, संशोधक, धर्म आणि विज्ञान विषयातील तज्ञ अशा विविध भूमिकेतून कार्यरत असणारे डॉक्टर सुभाष के देसाई हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. गुलमोहर आर्ट गॅलरी येथे संस्थापक आहेत दैनिक सिंहवाणीचे संस्थापक संपादक, पीटीआय, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, सकाळ, पुढारी अशा विविध वृत्तपत्रात लिखाण केले अकॅडमी ऑफ रिलीज युनिटी या विविध धर्मांना एकत्र आणणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात त्यांनी 25 वर्षे योगदान केलेले आहे. जवळजवळ 30 देशांमध्ये, साऱ्या हिमालयात त्यांनी भ्रमंती केली आहे. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले जगातील आणि देशातील अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला याशिवाय स्वामी विवेकानंद या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर आजन्म प्रभाव राहिला ते अविवाहित असून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे त्यांनी जीवनाचे ध्येय ठेवले.





