Home > Top News > Kumbh Mela : श्रमदानाला गुणदान? शिक्षणाची दिशा नेमकी कुठे?

Kumbh Mela : श्रमदानाला गुणदान? शिक्षणाची दिशा नेमकी कुठे?

कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणदान देण्याच्या निर्णयासंदर्भात ॲड. कुलदीप आंबेकर यांचा लेख

Kumbh Mela : श्रमदानाला गुणदान? शिक्षणाची दिशा नेमकी कुठे?
X

Savitribai Phule Pune University कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक गुणदान देण्याचा निर्णय समोर येत आहे. हा निर्णय ‘विद्येचे माहेरघर’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाशी संबंधित असल्याचे समजते. नव्या शैक्षणिक धोरणाच्या अंमलबजावणीच्या नावाखाली शिक्षण व्यवस्थेला नेमकी कुठल्या दिशेने नेले जात आहे, याचा गांभीर्याने विचार करण्याची ही वेळ आहे.

कुंभमेळा असो वा अन्य कोणतीही धार्मिक परंपरा त्याला विरोध करण्याचा प्रश्नच नाही. श्रद्धा आणि आस्थेला संविधानानेही स्वातंत्र्य दिले आहे. मात्र प्रश्न श्रद्धेचा नसून शिक्षणातील मूल्यांकन प्रक्रियेचा आहे. शैक्षणिक गुणदान हे ज्ञान, कौशल्य, संशोधन, समाजोपयोगी कार्य आणि बौद्धिक योगदानाच्या आधारे असते; धार्मिक कार्यक्रमातील सहभागाच्या आधारे नव्हे. विद्यार्थ्यांनी स्वयंसेवक म्हणून कुंभमेळ्यात काम करणे हा त्यांचा वैयक्तिक निर्णय असू शकतो. त्यातून सामाजिक जबाबदारी, सेवाभाव आणि शिस्त यांचे धडे मिळू शकतात. मात्र त्यासाठी थेट शैक्षणिक गुण देणे म्हणजे शिक्षण आणि श्रद्धा यांची सरमिसळ करण्यासारखे आहे.

आज हे कुंभमेळ्यापुरते मर्यादित राहील, याची कोणतीही खात्री नाही. उद्या हा निकष लागू झाला, तर पंढरपूरची वारीचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. तेथे लाखो वारकरी दरवर्षी सेवाभावाने सहभागी होतात; त्यांनाही गुणदान दिले जाणार आहे का? चैत्यभूमीवर शिस्तप्रिय भीम अनुयायी वर्षानुवर्षे एकत्र येतात; त्या सामाजिक शिस्तीला आणि व्यवस्थापनाला गुणांकनाच्या चौकटीत बसवले जाणार आहे का?

अशा प्रश्नांची उत्तरे टाळून चालणार नाहीत. कारण एकदा धार्मिक कार्यक्रमांना गुणदानाची वाट मोकळी झाली, की शैक्षणिक क्षेत्रात धार्मिककरणाचा पायंडा पडेल. शिक्षणसंस्था या सर्वसमावेशक, वैज्ञानिक आणि विवेकाधिष्ठित असाव्यात; त्या कोणत्याही एका धार्मिक-सांस्कृतिक प्रवाहाच्या प्रभावाखाली जाणे लोकशाही आणि संविधानिक मूल्यांना धरून नाही. सावित्रीबाई फुले यांचे नाव धारण करणाऱ्या विद्यापीठाकडून समाजसुधारक विचार, विवेकवाद आणि समतेची भूमिका अपेक्षित आहे. शिक्षणाने प्रश्न विचारायला शिकवले पाहिजे, अंधानुकरणाला प्रोत्साहन देऊ नये. गुणदानाच्या निर्णयातून जर सामाजिक सेवेचे महत्त्व अधोरेखित करायचे असेल, तर त्यासाठी धर्मनिरपेक्ष आणि सर्वांना समान संधी देणारे निकष ठरवले गेले पाहिजेत.

आज घेतलेले निर्णय उद्याच्या पिढीचे विचार घडवत असतात. त्यामुळे विद्यापीठाने या निर्णयाचा पुनर्विचार करावा, हीच अपेक्षा. शिक्षण हे श्रद्धेपेक्षा विवेकाचे, आणि परंपरेपेक्षा प्रगतीचे माध्यम राहिले पाहिजे.

ॲड. कुलदीप आंबेकर

संस्थापक स्टुडंट हेल्पिंग हँडस

Updated : 5 Feb 2026 4:20 PM IST
author-thhumb

ॲड. कुलदीप आंबेकर

संस्थापक, स्टुडंट हेल्पिंग हॅंडस


Next Story
Share it
Top