Home > Top News > सुशांत सिंह प्रकरण : कट कारस्थानाच्या थिएरीमागे भाजपचा हात?

सुशांत सिंह प्रकरण : कट कारस्थानाच्या थिएरीमागे भाजपचा हात?

सुशांत सिंह प्रकरण : कट कारस्थानाच्या थिएरीमागे भाजपचा हात?
X

अभिनेता सुशांत सिंह याच्या आत्महत्येनंतर त्याची हत्या झाल्याची चर्चा इंटरनेट जगतात रंगली होती. सोशल मीडियावर सुशांतच्या मर्डर थिएरीच्या पोस्ट टाकणाऱ्यांनी त्या पोस्ट बातम्यांमध्ये चर्चेत राहतील याचीही खबरदारी घेतली होती. ही खबरादारी घेणारे भाजपचे लोक होते असा दावा मिशिगन युनिव्हर्सिटीने अभ्यासाअंती केला आहे.

सोशल मीडियातील ट्रेन्ड्स, हँडल्स तसेच राजकारणी, प्रभावशील व्यक्ती, पत्रकार आणि काही माध्यमांनी १४ जून ते १२ सप्टेंबर २०२० पर्यंत केलेल्या ट्विट्समधून भाजपच्या नेत्यांनी आणि भाजप समर्थक हँडल्सनी अफवांचे पेव सुरूच ठेवल्याचे आणि मुंबई पोलीस तसंच बॉलिवूडमधील काही अॅक्टर्सना ट्रोल केल्याचे उघड झाले आहे. दोन हजार पत्रकार आणि मीडिया हाऊसेसचे ट्विट्स तसेच ७ हजार ८१८ राजकारण्यांचे ट्विटस आणि मेनस्ट्रीम मीडियातील न्यूज चॅनेल्सच्या युट्यूब पेजेसचाही अभ्यास करण्यात आला.

या प्रकरणाबाबत भाजप आणि काँग्रेसच्या ७ हजार ८१८ राजकारण्यांनी १ लाख ३ हजार १२५ ट्विट्स केले. काँग्रेस आणि इतर पक्षांनी सुशांतची 'आत्महत्या' हा शब्द वापरला. तर भाजप नेत्यांनी आपल्या ट्विटमध्ये आत्महत्येऐवजी 'हत्या' हा शब्द वापरला.

या अभ्यासात Republic TV आणि Times Now या टीव्ही वृत्त वाहिन्यांनी दिलेल्या बातम्यांचाही अभ्यास करण्यात आला. या वृत्तवाहिन्यांनी केलेल्या आक्रमक कव्हरेजमुळे त्यांना गेल्या काही महिन्यात चांगला टीआरपीही मिळाला. तोपर्यंत १ हजार ९३० पत्रकार आणि २३९ मीडिया हाऊसेसच्या ट्विटचेही विश्लेषण करण्यात आले होते.

"या माहितीमधून एक बाब पुढे आली ती म्हणजे राजकारण्यांनी आणि तेही भाजपच्या राजकारण्यांनी आत्महत्येच्या थिएरीला हत्या दाखवण्यासंदर्भात महत्त्वाची भूमिका बजावली. सुरूवातीला मानसिक आरोग्य आणि नैराश्य या मुद्द्यांवर वृत्त माध्यमांमध्ये चर्चेची संधी होती. पण बातम्या येत गेल्या आणि ही चर्चा मागे पडली" अशी माहिती या रिपोर्टमध्ये देण्यात आली आहे.

"सातत्याने या बातमीचा पाठपुरावा करणाऱ्या वृत्तवाहिन्यांना प्रेक्षकांचा प्रतिसादही चांगला लाभला. यात अधिक आक्रमकपणे रिपोर्टिंग करणाऱ्या रिपब्लिक टीव्हीला तर काही काळातच चांगले रेटिंग मिळाले. या नेटवर्कने तर एवढी आक्रमक रिपोर्टिंग केली की त्यांना यातून लोकांचा सहभागच बाजूला काढून टाकला. " अनेक अभिनेते, राजकारणी, मीडिया हाऊसेस आणि पत्रकारांनी या घटनेशी संबंधित आपापली कथानकं तयार करुन टाकली. यामध्ये वैयक्तिक पक्षपातीपणा, समज, उद्देश आणि लाभांना प्राधान्य देण्यात आले होते. "

14 जून रोजी सुशांत सिंह याच्या आत्महत्येची बातमी आली आणि पोलिसांनी ती आत्महत्या असल्याचे सांगितल्याने बहुतांश वृत्त माध्यमांनी मानसिक आरोग्याच्या विषयावर लक्ष केंद्रित केले होते. पण लगेचच सुशांत सिंह याची हत्या करण्यात आल्याची अफवा पसरली आणि मीडियामध्ये खुनाच्या कटाची चर्चा रंगत असताना सुशांत हा बॉलिवूड बाहेरचा होता आणि बॉलिवूडमधील घराणेशाहीचा बळी ठरल्याच्या चर्चेवर मीडियाने लक्ष केंद्रीत केले.

"या प्रकरणातील कटाची चर्चा दोन मुद्द्यांभोवती फिरवली गेली. ती म्हणजे स्थानिक पोलीस अकार्यक्षम आहेत आणि चांडाळ चौकडीने हे सगळे घडवून आणले आहे. तसेच बाहेरुन आलेल्या गरीब कलाकारांना राज्य सरकार शत्रूसारखे वागवते आणि घराणेशाही जपणारे आहे, असे चित्र रंगवण्यात आले" असे या अभ्यासात सांगण्यात आले आहे.

त्या काही दिवसांमध्ये मुंबई पोलिसांना अत्यंत जोरदारपणे ट्रोल करण्यात आले. "यामध्ये अनेकजण असले तरी विशेषत: भाजपच्या नेत्यांचा सहभाग जास्त होता" असेही या अभ्यासात आढळले आहे.

त्याचबरोबर महाराष्ट्र सरकारवरही जोरदार हल्लाबोल करण्यात आला.

"पोलिसांवरील आरोप हे राज्य मंत्रिमंडळावर आरोप करण्यासाठीचे माध्यम म्हणून वापरले गेले. सुरुवात "#AnilDeshmukhSavingSSRKillers(गृहमंत्री) #MahaGovtExposed आदित्य ठाकरे जे आधीच भारतातील सर्वाधिक ट्रोल झालेल्या नेत्यांपैकी एक आहेत, असे ट्रेन्ड्स चालवले गेले" अशी माहितीही या अभ्यासातून पुढे आली आहे.

बिहारच्या येत्या निवडणुकीत सुशांत सिंहचा फोटो असलेला बॅनर वापरुन Justice For Rajput अशी हाक देत भाजपने हा राजकीय मुद्दा बनवल्याचा आरोपही करण्यात आला. जुलैमध्ये बिहारमध्ये याची सर्वाधिक चर्चा होती पण त्यानंतर हळूहळू बिहारमधील राजकारण्यांनी यावर बोलणे कमी केले.

या अभ्यासातील तपशीलांवरुन आणखी एक गोष्ट स्पष्ट झाली की सुशात सिंह राजपूतची हत्या झाली आहे हे आक्रमकपणे सांगणाऱ्यांमध्ये काँग्रेसपेक्षा भाजपचे लोक जास्त होते.

सोशल मीडियाचा विचार केला तर टाईम्स नाऊपेक्षा रिपब्लिक टीव्हीला रिट्विट्स आणि रिचच्या बाबतीत जास्त फायदा झाला. पण टाईम्स नाऊने सर्वाधिक टि्वट्स केले होते. एकूणच या बातमीवर सर्वाधिक ट्विट्स आणि पोस्ट होत्या. " तसेच इतर विषयांवरील रिट्विटपेक्षा यावरचे रिट्विट जास्त होते. "

लोक कोरोना संकटाच्या बातम्यांबद्दल कंटाळले होते, लॉकडाऊन वाढत चालले होते आणि कोरोनाच्या रुग्णांची संख्याही वाढत होती, अशा काळात ही बातमी आली असे निरीक्षण या अभ्यासात नोंदवण्यात आले आहे. "या बातमीमुळे वेगळा विषय चर्चेत आला. " सुशांत सिंहच्या निधनानंतर रिलीज झालेल्या त्याच्या सिनेमाला चांगला प्रतिसादही मिळाला.

आठवड्या मागून आठवडे उलटत गेले आणि चुकीच्या माहितीचा प्रसार वाढत गेला. अनेक बॉलिवूड कलाकारांची चौकशी झाली आणि सोशल मीडियामुळे या कथानकात खलनायकांची भर पडत गेली. मिशिगन विद्यापीठाच्या या रिपोर्टसाठी सईदा झैनाब अकबर, अंकुर शर्मा, हिमानी नेगी, अनमोल पांडा आणि जोयोजीत पाल यांनी काम केले. त्यांच्या अभ्यासात पुरूषसत्ताक पद्दती अजून जिवंत असल्याचे सिद्ध झाले. कारण पुरूष अभिनेत्याच्या मृत्यूने ऑनलाईन काहुर माजवलं. पण याआधी काही अभिनेत्रींनी केलेल्या आत्महत्यांबाबत असा संताप कधी दिसला नाही, उलट त्यांनाच त्यांच्या आत्महत्येसाठी जबाबदार ठरवले गेले आहे.

"या प्रकरणातील बहुतांश बळी या महिलाच ठरल्या आहेत. रिया चक्रवर्तीला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे केले गेले, तिची निंदा केली गेली, वाईच वागणूक दिली गेली आणि अखेर तिला जामीन न मिळाल्याने तुरुंगात जावे लागले. हे प्रकरण मग ड्रग्जकडे वळल्यानंतर नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने ४ अभिनेत्रींना चौकशीसाठी बोलावले. यात दीपिका पदुकोण, सारा अली खान, श्रद्धा कपूर आणि राकुल प्रीत सिंग या सर्वच महिला होत्या. ज्यावेळी हा अभ्यास सुरू होता तेव्हा या सगळ्यांना लक्ष्य केले गेले आणि मेनस्ट्रिम मीडियाने ऑनलाईन अंदाज वर्तवणे सुरूच ठेवले." असेही या रिपोर्टमध्ये सांगण्यात आले आहे.

News First Published on The Wire Website

https://thewire.in/media/sushant-singh-rajput-bjp-murder-conspiracy-social-media

Updated : 28 Oct 2020 6:56 AM GMT
Tags:    
Next Story
Share it
Top