...म्हणूनही सुनेत्रा पवार राजकारणात..!!
कितीही प्रतिकूल परिस्थितीत सामान्य जनतेची कामं थांबायला नको, विकासाला खीळ बसायला नको असं दादा नेहमी म्हणायचे आणि म्हणूनच दादांच्या अंत्यविधीचे सगळे सोपस्कार पार पाडण्याआधीच राज्याची पहिली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घ्यायचं ठरवलं असावं. वाचा ज्येष्ठ पत्रकार गोविंद वाकडे यांचा लेख
X
(अजित पवारांच्या अंत्यविधी नंतर लगेचच सुनेत्रा अजित पवार यांचा होणारा शपथविधी म्हणजे दादांनी आणि शरद पवारांनी घेतलेली शपथ मोडणारा ठरतोय? अशी चर्चा सुरू झालीय खरी. मात्र ........)
ज्यांना ज्यांना स्व.अजित पवारांचा स्वभाव आणि राजकीय ताकद माहिती आहे, त्या सगळ्यांना अजित पवारांच्या पत्नी म्हणजेच सुनेत्रा पवार अर्थात वहिनी देखील माहिती आहेत. अजित पवार नावाच्या वादळाला चार दशकं या माऊलीने भरकटू दिलं नाही. तेव्हा विचार करा त्यांची ताकद काय असेल.
मराठवाड्यातील धाराशिव जिल्ह्यातल्या "तेर" गावातील कुलीन आणि गर्भश्रीमंत घराण्यातील उच्चशिक्षित (B.com) असलेल्या सुनेत्रा वहिनींनी, स्वातंत्र्य सैनिक असलेल्या बाजीराव पाटलांच्या माध्यमातून देशाच्या स्वातंत्र्य संग्राम आणि मराठवाडा मुक्तिसंग्राम अनुभवला, तर राज्याचे माजी मंत्री आणि ताकदवान नेते पद्मसिंह पाटील यांच्या माध्यमातून त्यांनी राज्य आणि देशाची राजधानी दिल्लीच्या राजकारणाचा सारीपाट आपल्या घरातच होतांना बघितला आणि तोही लग्नाआधीच. त्यामुळे लग्नाआधीच त्यांना राजकीय वारसा घरातूनच मिळालेला. मग डिसेंबर 1985 मध्ये त्यांचा विवाह अजित पवारांसोबत झाला आणि तेव्हा पासूनच त्या अजित दादांची सावली म्हणून वावरू लागल्या.
जसजसे दिवसं जात होती तसतसा अजित पवारांचा व्याप वाढत होता. चाळीस वर्षाच्या सहजीवनात त्यांनी अजित पवार आधी खासदार, मग सलग 8 वेळा आमदार आणि 6 वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री होतांना पाहिलं किंबहुना प्रत्येकवेळी त्यांनीच अजित पवारांचा राजतिलक सोहळा साजरा केला. एवढा कर्तुत्ववान कर्तबगार पती मिळाल्यानंतर कोणतीही स्त्री स्वतःला भाग्यवानच समजणार नाही का.
पण, सुनेत्रा वहिनींच्या आयुष्यात येणारा असा प्रत्येक सोहळा त्याचे वैयक्तिक क्षण हिरावून घेणारा ठरत होता पण दादांची जनतेप्रती असलेली तळमळ बघून हा त्यागही त्यांनी स्वीकारला, खरंतर आपल्या खासगी आयुष्य बाबत त्या कधीच, कुठेच बोलल्या नाहीत पण नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत त्या जेव्हा पिंपरी चिंचवडमध्ये प्रचारासाठी आल्या होत्या तेव्हा त्यांची मुलाखत घेण्याचा योग आला आणि पहिल्याच प्रश्नाचं उत्तरं देताना त्या म्हणाल्या की,
"अजित दादांनी त्यांच्या आयुष्यातील खूप महत्वाचां वेळ देऊन पिंपरी चिंचवड शहर घडवलं". त्यांच हे एक वाक्य उभयतांच्या सेंवादेना मांडणारं होतं.
तर... अजित पवारांचा व्याप वाढला तसा वहिनींनी देखील स्वतःला l सामाजिक कार्यात झोकून दिलं. दादा राज्याचा डोलारा सांभाळत असतांना वाहिनी काटेवाडी ते बारामती असा गावोगावी प्रवास करून दादांची स्वप्न घरोघरी पेरत होत्या. शेती, शिक्षण आणि खासकरून पर्यावरण त्यांचे आवडते विषय, स्वच्छते बाबत दादांची शिस्त अवघ्या महाराष्ट्राने अनुभवली मात्र स्वच्छतेची आवड किंवा नीटनेटकेपणाची जाणीव त्यांना वहिनीच्या सहवासात झाली असावी.
पर्यावरण संवर्धन आणि जनजागृतीसाठी
"एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया"ही त्यांनी स्थापन केलेली महत्त्वपूर्ण सामाजिक संस्था आहे. आज "हरित बारामती" दिसतय ते याच संस्थेच्या माध्यमातून राबवलेल्या उपक्रमामुळे.
मात्र.. अजित पवार आणि सुनेत्रा वहिनीचा ह्या अशा प्रवासाला नियतीची नजर लागलीच.आणि सगळं काही उध्वस्त करणारी 28 जानेवारीची सकाळ उजाडली, विमानाने प्रवास करणं टाळा असं अनेक वेळा वहिनी दादांना सांगायच्या. मात्र, भविष्यवाणीवरून केल्या जाणाऱ्या अशा काळजीचं कधीच दादांना कौतुक वाटलं नाही, आणि शेवटी व्हायचं तेचं झालं.. दादा सगळ्यांना सोडून गेले. अर्थातच त्यांच्या अशा अकाली जाण्याचं दुःख सुनेत्रा वहिनीपेक्षा अधिक कुणालाही असू शकत नाही.
पण.. या दुःखातून सावरून त्यांना आता दादांच्या असंख्य चाहत्यांना कार्यकर्त्यांना विश्वास देणं गरजेचं होतं. किंबहुना ते त्यांचं कर्तव्यच आहे. कारण कितीही कठीण प्रसंग आला की तो मागे टाकून एकटा पुढे निघायची धमक अजित पवारांमध्ये होती.
कदाचित दादा हयात असतांना असा काही प्रसंग आला असता तर दादांनी देखील हेच केलं असतं, कारण कितीही प्रतिकूल परिस्थितीत सामान्य जनतेची कामं थांबायला नको, विकासाला खीळ बसायला नको असं दादा नेहमी म्हणायचे आणि म्हणूनच दादांच्या अंत्यविधीचे सगळे सोपस्कार पार पाडण्याआधीच राज्याची पहिली उपमुख्यमंत्री म्हणून त्यांनी शपथ घ्यायचं ठरवलं असावं.
पण... याहीपेक्षा ज्या व्यवस्थेने आपलं सर्वस्व हिरावून घेतलं त्या व्यवस्थेची व्यवस्थित व्यवस्था लावायला देखील वहिनी राजकारणाच्या रणांगणात उतरल्या असाव्यात असं मला वाटंत. यासाठी त्यांच्यावर होणाऱ्या असंख्य टीका पेक्षा आपल्या मुलांचं उघडं पडलेलं आणि उध्वस्त होऊ शकणारं उद्याचं भविष्य देखील त्यांनी पंखाखाली घेतलं असावं.
दुसरं कारण म्हणजे सध्याची ही सगळी राजकीय व्यवस्था ज्यांनी कुणी उभी केलीय त्यांनी आपल्या प्रत्येकासाठी विकासाऐवजी जन्मला घातलीय ती भिती.... अशी भीती जिच्याकडे भल्याभल्यांच्या कुंडल्या आहेत, अशी भीती जी महाराष्ट्र धर्माच्या कणखर विचारांना सुरुंग लावतीय आणि अशी भिती जी परतीचे सगळे दोर कापून टाकते. या भीती पुढे भलेभले झुकले, वाकले आणि मोडलेही तर भीतीच्या अशा चक्रव्युहात वाहिनी तरी किती काळ आणि कुणाच्या भरवशावर टिकणार होत्या?
खरतर, अशा कैक भीतीला मातीत गाडण्यांची धमक ज्यांच्यात होती ते अजित दादा राहिले नाहीत तर पवार साहेब आता सर्वाबाजूनीच खचलेयेत. मग अशा परिस्थिती वहिनी सत्तेत स्वखुशीने सहभागी होतं असतील का तर मुळीच नाही.. संपूर्ण पवार कुटुंबाची प्रतिष्ठा पणाला लावून आणि मनातल्या असंख्य वेदना मनातच ठेवून एक धगधगता निखारा बनून ते या रणांगणात उतरल्या आहेत. आणि म्हणूनच त्यांच्या स्वभावातील शांतता आणि संयम त्यांचे गुण वजा शस्त्रे आहेत असं वाटते. अर्थातच चवताळलेली वाघिणही अशीच असते...!
दादांचा वारसा, बाणा आणि राज्य हेच आपलं कुटुंब आहे हा त्यांचा विश्वास जपण्याचं सामर्थ्य तुम्हास मिळो
वहिनी आपणास खूप शुभेच्छा .






