Home > Top News > Solapur Anjangaon : अंजनगावातील पुतळा वादावर अखेर तोडगा; आंदोलन मागे

Solapur Anjangaon : अंजनगावातील पुतळा वादावर अखेर तोडगा; आंदोलन मागे

Solapur Anjangaon : अंजनगावातील पुतळा वादावर अखेर तोडगा; आंदोलन मागे
X

Solapur Anjangaon Protest: सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव (खेलोबा) येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या ( Chhatrapati Shivaji Maharaj ) पुतळ्यावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर तोडगा निघाला आहे. या निर्णयानंतर खेलोबा मंदिराच्या ( Kheloba ) पुजाऱ्यांनी सुरू केलेले आंदोलन मागे घेतले असून तीन दिवसानंतर गावातील तणावाचं वातावणही निवळलं आहे.

अंजनगावातील खेलोबा मंदिराच्या आवारात अचानक छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आल्याने दोन समाजात मोठा वाद निर्माण झाला होता. ही जागा देवस्थानाची असल्याचा मुद्दा पुढे आल्याने दोन समाजांमध्ये तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.यामध्ये सन्मानपूर्वक पूतळा हटवण्यासाठी धनगर समाजाकडून ठिय्या आंदोलन सुरू होते, तर मंदिराचे पुजारी फरांडे महाराज यांनी आमरण उपोषण सुरू केले होते.

दरम्यान, या प्रकरणावर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी रात्री पालकमंत्री जयकुमार गोरे, (Jaykumar Gore ) कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारे, जिल्हाधिकारी कार्तिकेयन, पोलिस अधीक्षक अतुल कुलकर्णी ( IPS Atul Kulkarni ), माजी आमदार राजन पाटील तसेच दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींची बैठक झाली.या बैठकीत सकारात्मक निर्णय घेण्यात आला.

बैठकीनुसार, पुतळा बसवण्यात आलेली जागा ही खेलोबा देवस्थानची असल्याचे मान्य करण्यात आले. त्यामुळे आता छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अन्य योग्य ठिकाणी स्थलांतरित करण्यात येणार आहे. नव्या जागेची निवड दोन्ही समाजांच्या प्रतिनिधींच्या सहमतीने केली जाणार आहे.

तसेच, नव्या ठिकाणी पुतळा उभारणी व सुशोभीकरणासाठी एक कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर करण्याची घोषणा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केली आहे. जिल्हाधिकारी आणि पोलिस प्रशासन गावात पाहणी करून जागा निश्चित करणार आहेत.

तोडगा निघाल्यानंतर धनगर समाजाच्या ( Dhangar community )आंदोलकांनी आंदोलन मागे घेतले असून, मराठा समाजानेही ( Maratha community ) निर्णयाला संमती दर्शवली आहे. गेल्या तीन-चार दिवसांपासून सुरू असलेले आंदोलन आता संपुष्टात आले आहे. बाहेरून आलेले नेते आणि कार्यकर्तेही माघारी परतले आहेत.

सध्या अंजनगावात परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असून, कोणतेही आंदोलन सुरू नाही. मात्र, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस बंदोबस्त कायम ठेवण्यात आला आहे. दरम्यान, आज दिवसभरात नव्या जागेची पाहणी होऊन पुतळा स्थलांतराची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.

Updated : 4 April 2026 11:23 AM IST
Tags:    
Next Story
Share it
Top