Home > Top News > कॅप्टन खरात हा पहिला नाही : सर्वधर्मीय भोंदू बुवांचे जाळे आणि राजकीय संरक्षण

कॅप्टन खरात हा पहिला नाही : सर्वधर्मीय भोंदू बुवांचे जाळे आणि राजकीय संरक्षण

कॅप्टन खरात हा पहिला नाही : सर्वधर्मीय भोंदू बुवांचे जाळे आणि राजकीय संरक्षण
X

Captain Kharat case Maharashtra कॅप्टन खरात हा काही पहिला भोंदू बुवा नाही. हजारो सर्वधर्मिय बुवा, महाराज, गुरु, मुल्ला, मुजावर, पाद्री, यांचे जाळे या देशात सर्वत्र पसरले आहे. १९८९ पासून अंधश्रद्धा निर्मूलनाचे कार्य मी करीत आहे. आज अखेर पर्यंत मी स्वतः अडीचशे पेक्षा जास्त बुवांच्या दरबारात जाऊन बसलेलो आहे व त्यांचा भांडाफोड केला आहे. या ठिकाणी एक गोष्ट नमूद करावीशी वाटते. जेव्हा मी दरबारात जाऊन बसतो तेव्हा तो मुसलमान आहे की नाही हे बघत नाही. फक्त हिंदूंच्या दरबारात जाऊन बसतो असेही मी केलेले नाही. आज अखेर मी अंनिसच्या आधारे पकडलेल्या बुवांपैकी २५% बुवा हे मुस्लीम धर्मीय आहेत. त्यांच्या दरबारात जाऊन मी स्वतः त्यांना आव्हान दिलेले आहे. माझ्याबरोबर असलेल्या सर्व अंनिसच्या कार्यकर्त्यांची मुस्लीम बुवांच्या दरबारात गेल्यावर आणि त्याला पोलीस स्टेशनला नेल्यावर 'फाटलेली' नाही. प्रचार असा केला जातो की 'मुसलमान बुवांच्या विरोधात बोलून दाखवा, बघा कशी फाटते'. पण वास्तवात आज अखेर कोणत्याही अंनिस कार्यकर्त्याची किंवा माझी फाटलेली नाही. आमचे फाटते असा खोटा प्रचार भोंदू प्रचारक करत असतात.

पकडलेल्या बुवांपैकी ज्या ज्या मुस्लीम बुवांना आम्ही पकडलेले आहे त्यांच्या समर्थनार्थ किंवा त्यांना वाचवायला हिंदूंमधील मूलतत्त्ववाद्यांप्रमाणेच, कट्टर वाद्यांप्रमाणेच, मुस्लिमांमधील मूलतत्त्ववादी किंवा कट्टर मुस्लीम पुढे सरसावलेले आम्हाला अनुभवास आलेले आहेत. इथे दोन्ही धर्माचे कट्टरतावादी समान लायकी वर येतात! आम्ही त्या लोकांचाही सामना केलेला आहे. त्यांनी आम्हाला दिलेल्या धमक्या आम्ही स्वीकारलेल्या आहेत आणि जसे हिंदुत्ववादी कार्यकर्ते आत्ता धमकी देत आहेत तसेच कट्टर मुस्लीम भक्त देखील धमकी देत असतात. नुकत्याच एका मुस्लीम बुवाला पकडलेल्या प्रकरणांमध्ये बुवाच्या भक्त असलेल्या मुस्लीम युवकाने भर पोलीस स्टेशनमध्ये, 'तुला बघून घेतो आणि ठेवणार नाही' अशी धमकी मला दिलेली होती. आणि ती मी त्याला साभार परतावून म्हटले होते की, मी त्यासाठी तयार आहे!

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते जात किंवा धर्म बघून बुवा पकडत नाहीत. किंवा अंधश्रद्धांचे निर्मूलन करत नाहीत. सातत्याने खोटा प्रचार करणारे भोंदू प्रचारक हे अंधश्रद्धा निर्मूलनवाले फक्त हिंदू धर्मातील अंधश्रद्धांचे निर्मूलन करतात असा फेक प्रचार करत आहेत. मुस्लीम दर्गे व प्रार्थनास्थळे या ठिकाणी जाऊन तेथे अंगात येणाऱ्या व भूत काढणाऱ्या मुल्ला-मुजावर यांना आम्ही बेड्या ठोकल्या आहेत. एकही भोंदू प्रचारक कधीही तिकडे फिरकलेला नाही. जर त्यांच्यात दम असेल तर त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समिती बरोबर एकत्रित येऊन काम करावे. पण अट एकच असेल. मुस्लीम बुवा पकडल्या नंतर हिंदू बुवा पकडायच्या वेळी गायब व्हायचे नाही. पण ती हिम्मत ते दाखवणार नाहीत. कारण हिंदू-मुस्लीम असे करत त्यांना राजकारण करायचे असते आणि सत्तेची पोळी भाजायची असते. सध्या सोशल मीडियावर जे जे विरोध करत आहेत ते ते सर्व राजकीय व सांस्कृतिक वर्चस्वासाठीचे अंधभक्त आहेत. त्यांच्या गोटातून याच पद्धतीने प्रचार करून राजकारण यशस्वी करण्याचा फंडा चालू ठेवायचा आहे.

अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही सर्व धर्मांच्या अंधश्रद्धांचा समाचार घेते. एक विशेष गोष्ट मला इथे नमूद करावीशी वाटते. जेव्हा जेव्हा मुस्लीम महाराज-मुल्ला-मुजावर यांच्या विरोधात तक्रार आमच्याकडे आली आहे तेव्हा ती तक्रार घेऊन येणारे लोक हे मुस्लीम आहेत. खुद्द मुस्लिमांनाच अशा बुवांच्या विरोधात कारवाई करायची इच्छा असते. पण हे भोंदू प्रचारकांना माहिती नसते. त्यामुळे त्यांना असे वाटते की अंधश्रद्धा निर्मूलन समिती ही मुस्लिमांना घाबरते किंवा भिते. असे काहीही आजवर घडलेले नाही. महाराष्ट्रातील दोन मोठ्या दर्ग्यांमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने प्रत्यक्ष जाऊन तेथील भूते येणाऱ्या व अंगात येणाऱ्या व्यक्तींवर उपचार केले आहेत व अघोरी प्रकारांविरोधात तक्रारीही दाखल केल्या आहेत.

कॅप्टन खरात प्रकरणांमध्ये सर्व पक्षांच्या राजकीय व्यक्ती अडकलेल्या दिसत आहेत.

माझे म्हणणे आहे की बुवाबाजीला कोणताही राजकीय पक्ष नसतो. सर्व राजकीय पक्षातील अनेक लोक बुवाबाजी मध्ये तुडुंब बुडलेले आहेत. काँग्रेसच्या राजवटीमध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीला हा अनुभव आलेला आहे की त्या वेळचे सत्ताधारी बुवांचे संरक्षक होते. आज तर आजचे सत्ताधारी बुवांचे केवळ संरक्षक बनलेले नसून त्यांचे पाठीराखे बनलेले आहेत. कॅप्टन खरातचे चाळे सत्ताधार्‍यांना माहिती नव्हते असे असू शकत नाही. त्याच्या अघोरी उपचार पद्धती खुद्द सत्ताधारी पक्षातील अनेकांनी करून घेतलेल्या आहेत. आणि त्याचा गौरव देखील केला आहे! गंभीर बाब म्हणजे स्त्रियांचा बळी जाईपर्यंत सत्ताधारी गप्प बसलेले आहेत. यात भाजपा, राष्ट्रवादी, शिवसेना आणि अन्य सर्व पक्ष सामील आहेत.

प्रश्न फक्त कॅप्टन खराताचा नाही. तर आसाराम बापू, नित्यानंद, धीरेंद्र शास्त्री, रामपाल, गुरमीत राम रहिम सिंग, झाकीर नाईक, रोग बरे करणारे ख्रिश्चन पाद्री, असे असंख्य बुवा महाराज आजही सत्ताधारी पक्षाचे लोक पदरी बाळगून आहेत. लोकल देवऋषी आणि मांत्रिक यांची तर गणतीच नाही. त्यांना संरक्षण देत आहेत सर्वपक्षीय नेते. सत्ताधारी यांचे मेरूमणी आहेत. बुवांच्या बुवाबाजीकडे कानाडोळा करणे हे गंभीर गुन्हेगारी कृत्य आहे आणि हे सर्वपक्षीय लोक करतात. जोवर त्याचे बिंग फुटत नाही तोवर ते त्यांच्या त्यांच्या धर्माचे मुकुटमणी असतात. करोडो लोक त्यांना डोक्यावर घेऊन नाचतात. कारण मंत्रीच त्यांच्या पायाशी बसून असतात.

८० टक्के हिंदू असलेल्या समाजामध्ये दर दहा बुवांमध्ये आठ बुवा हे हिंदू असतात. उरलेले दोन मुस्लीम किंवा ख्रिश्चन व अन्य धर्मीय असतात. जेव्हा अंधश्रद्धा निर्मूलन समिती बुवांना पकडते तेव्हा अर्थातच हे आठ बुवा पकडले जातातच. याचा अर्थ असा नव्हे की फक्त हिंदू बुवाच पकडले जातात. याचा अर्थ असा आहे की बुवाबाजीच्या क्षेत्रात हिंदू बहुसंख्येने आहेत. खेडोपाडी मंत्र-तंत्र करणारे देवऋशी, मुजावर आणि महाराज यांचे प्रचंड मोठे जाळे पसरलेले आहे. २०१४ पासून हे जाळे आणखीनच वाढलेले आहे. आणि त्यांना हिंदुत्व या विचारसरणीचे पाठबळ मिळाल्यामुळे ते शिरजोर बनले आहेत. जाणीवपूर्वक या जाळ्याकडे सत्ताधारी दुर्लक्ष करत आहेत. आणि त्यांचे प्रचारक सोशल मीडिया मधून पोस्टी झाडत आहेत. मुस्लीम बुवांवर अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या असलेल्या कोर्ट केसेस आजही चालू आहेत.

अनेक बुवांच्या प्रकरणांमध्ये कायद्याअभावी त्यांना सोडून देण्यात आलेले आहे. कारण महाराष्ट्र नरबळी व जादुटोणा विरोधी कायदा आजही अपुरा आहे. तो अपुरा रहाण्यामागे हिंदुत्ववादी संघटनांचा विरोध हे एक ठळक कारण होते. त्याचाच फायदा खरातच काय, सर्व महाराज, गुरु, बुवा, मुजावर, घेतात. अशावेळी लव जिहादचा कायदा करण्यात पुढाकार घेणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी बुवाबाजीचे जाळे उखडून लावण्याचे सुद्धा कायदे तीव्र करायला स्वतःची सनातनी शक्ती का वापरलेली नाही? त्याचे कारण उघड आहे. बुवा, महाराज, गुरु, हे धर्माच्या राजकारणात सहजतेने वापरता येतात व फेकून देता येतात. धार्मिक असलेल्या समाजाला एखादा नारा देऊन धोक्यात असल्याची खोटी आवई उठवून भीतीग्रस्त करून मते लाटता येतात. आणि अशा मतांसाठी बुवांचे दरबार हे सहज सोप्या पद्धतीने उपलब्ध असतात. मग ते रामदेव बाबा असो नाहीतर श्री श्री रविशंकर असो नाहीतर ते झाकीर नाईक असो नाहीतर एखादा जैन मुनि किंवा बुद्ध भंते असो. धर्मसत्ता आणि राजसत्ता जेव्हा एकत्र येते तेव्हा गुलाम आणि भक्त जनतेचा बुद्धिभ्रंश करणे सोपं होतं. आज तेच चालू आहे. सोशल मीडिया मधून विशेष करून सत्ताधारी आयटी सेल कडून व त्यांच्या भक्तगणंगांकडून मोठ्या प्रमाणावर हिंदू विरोधी जे जे त्यांना हाणा असा प्रचार कडवटपणे आणि खूनशीपणे केला जात आहे. याचा अर्थ उघड आहे की, 'आमच्या धर्मातल्या अंधश्रद्धांचे आम्ही बघू'. म्हणजेच याचा अर्थ असा की आम्ही लोकांना अंधश्रद्ध ठेवू आणि सत्तेवर बसून राहू!

हिंदू बुवा हा हिंदू जनतेलाच लुटत असतो. मुस्लिम बुवा मुस्लिम जनतेलाच लुटत असतो. आज खरातच्या लैंगिक अत्याचाराच्या बळी असलेल्या स्त्रिया या हिंदूच आहेत. मग जर हिंदूच हिंदूंना मारत असेल तर 'आमच्या धर्माचे आम्ही बघून घेऊ' असे म्हणणारे बिनडोकपणा करत आहेत किंवा राजकीय पोळी भाजण्यासाठी खोटा आव आणत आहेत हे निश्चित.

आज उघडपणे अंधश्रद्ध प्रथा व परंपरा यांना पाठिंबा दिला जातो आहे. अशावेळी हा 'आमच्या धर्माचा अंतर्गत मामला आहे' असे म्हटले जाते. मग याच प्रथा संविधानास धाब्यावर बसवून जाहीरपणे गौरविल्या जातात तेव्हा तो अंतर्गत मामला न बनता सार्वजनिक बनतो. याचा अर्थ संविधाना ऐवजी धर्मग्रंथ, धर्मप्रथा व धर्म रूढी श्रेष्ठ ठरतात. नेमका याचाच फायदा बुवा उचलतात आणि ते समाजाचे शोषण करत राहतात. लोकांवर वचक बसवितात. आणि लैंगिक अत्याचार करतात.

धर्माचे उन्नयन करायचेच असेल तर ते नीती आणि विवेक या आधारे होणे गरजेचे असते. पण सध्या धर्म म्हणजे एक बाजार बनलेला आहे. येथे बुवा आणि महाराज अध्यात्माच्या नावाखाली, सत्संगाच्या नावाखाली आणि धर्मप्रभावना व प्रसाराच्या नावाखाली दुकाने खोलून बसले आहेत. कॅप्टन खरातची मालमत्ता जेवढी सापडली आहे त्याच्या कैक पटीने जास्त मालमत्ता भारतातल्या अनेक महाराज बुवांची आहे. ही मालमत्ता लोकांच्या श्रद्धेचा वापर करून मिळवलेली आहे. हा श्रद्धेचा व्यापार अव्याहतपणे हजारो वर्षे चालू आहे. सर्व बुवा-महाराजांच्या मालमत्तांची तपासणी केली तर अब्जावधी रुपयांची उलाढाल हाती लागेल. म्हणूनच खरात सारखे बुवा हे हिमनगाचे टोक आहेत. लोकांच्या श्रद्धा या मूल्यवादी न बनवता त्यांना फसवून लुटणे हाच उद्योग बुवा करत असतील तर त्याला विरोध करणे म्हणजे धर्मद्रोह नव्हे. पण हे लक्षात घेतो कोण?

-डॉ. प्रदीप पाटील

अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते व अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्राचे माजी संपादक


(साभार - सदर पोस्ट डॉ. प्रदीप पाटील यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)

Updated : 1 April 2026 2:19 PM IST
Next Story
Share it
Top