Home > Top News > Maharashtra Expectations : "सुनेत्राताई, धर्मनिष्ठा वैयक्तिक आणि राज्यकारभार संविधाननिष्ठ ठेवावा."

Maharashtra Expectations : "सुनेत्राताई, धर्मनिष्ठा वैयक्तिक आणि राज्यकारभार संविधाननिष्ठ ठेवावा."

आज राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री म्हणून सुनेत्रा पवार यांनी स्वीकारला कार्यभार... महाराष्ट्रच्या त्यांच्याकडून काय आहेत अपेक्षा? यावर डॉ. सुभाष देसाई यांचा लेख...

Maharashtra Expectations : सुनेत्राताई, धर्मनिष्ठा वैयक्तिक आणि राज्यकारभार संविधाननिष्ठ ठेवावा.
X

Maharashtra's Expectations from Sunetra Pawar महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तांतर, शपथा, दर्शन-पूजा, राजकीय सोहळे हे नवे नाहीत. पण काही घटना केवळ राजकीय नसतात त्या संकेत देत असतात. सुनेत्रा पवार यांना घाईघाईने उपमुख्यमंत्री पदाची शपथ, त्यानंतर सिद्धिविनायक मंदिरात दर्शन, आणि भोवती भाजपशी जवळीक असलेले नेते हा सारा दृश्यपट अनेकांच्या मनात शंकेची रेष उमटवणारा आहे.

पूजा-अर्चा करणे हा वैयक्तिक श्रद्धेचा विषय आहे. त्यावर आक्षेप असण्याचे कारण नाही. परंतु जेव्हा श्रद्धा आणि सत्ता एकत्र येऊन राजकीय संदेश देऊ लागतात, तेव्हा प्रश्न उपस्थित होतो. महाराष्ट्र हा फक्त सत्तेचा भूभाग नाही. तो छत्रपती शाहूंची सामाजिक समता, महात्मा फुल्यांची शिक्षणक्रांती, डॉ. आंबेडकरांची संविधाननिष्ठ न्यायव्यवस्था, आणि साने गुरुजींची मानवतावादी संस्कृती यांचा वारसा जपणारा प्रदेश आहे. या भूमीत धर्माध, जातीय, विभाजनकारी राजकारणाला फार काळ टिकाव लागलेला नाही. पण आजची परिस्थिती वेगळी आहे. पूर्वी विरोधक बाहेरून येत होते. आज भीती अशी आहे की पुरोगामी घरातूनच प्रतिगामी विचारांची पेरणी होत आहे. हेच सर्वात धोकादायक.

इतिहास सांगतो, मुघलांशी लढताना शत्रू बाहेरचा होता; पण पेशवाईत अंतर्गत कारस्थानांनी मराठ्यांचे नुकसान केले. ‘अनाजीपंत’ ही उपमा म्हणूनच आजही जिवंत आहे. जर पुरोगामी पक्षांच्या घरातील नेतृत्वच हिंदुत्ववादी राजकारणाचे मुखवटे बनले, जर शाहू-फुले-आंबेडकरांच्या नावाने मतं घेऊन नागपूर-दिल्लीच्या अजेंड्याला खतपाणी घातले, तर महाराष्ट्राचा आत्मा हरवेल. म्हणून आज गरज आहे व्यक्तीपूजेची नाही, विचारपरीक्षणाची.

महाराष्ट्राने काय काळजी घ्यावी?

१. नेत्यांपेक्षा विचारांशी निष्ठा ठेवावी. कोणत्याही घराण्याला ‘अभेद्य’ मानू नये.

२. प्रत्येक वक्तव्य, निर्णय, धोरण तपासावे. शाहू-फुले-आंबेडकरांचा उल्लेख फक्त भाषणापुरता आहे का, की कृतीत आहे?

३. तरुण पिढीने इतिहास समजून घ्यावा. विचारांची मुळे मजबूत असतील तर कुठलाही अजेंडा रुजत नाही.

४. सामाजिक संघटना, बुद्धिजीवी, पत्रकार यांनी जागरूक प्रहरी बनावे. मौन हीच सर्वात मोठी सहकारी शक्ती असते.

५. धर्मनिष्ठा वैयक्तिक ठेवावी, राज्यकारभार संविधाननिष्ठ ठेवावा. हा मूलमंत्र विसरू नये.

आज प्रश्न ‘कोण पवार, कोण पटेल’ असा नाही. प्रश्न आहे महाराष्ट्र पुरोगामी राहणार का? कारण शेवटी, सत्ता तात्पुरती असते, पण विचारच इतिहास घडवतात. महाराष्ट्राने नेहमीच जागृत नागरिकत्वाने आपली परंपरा वाचवली आहे. आज पुन्हा एकदा तीच वेळ आली आहे.


(या लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक आहेत. त्याच्याशी मॅक्स महाराष्ट्र सहमतच असेल असे नाही.)

Updated : 10 Feb 2026 12:35 PM IST
author-thhumb

डॉ. सुभाष के देसाई

वयाच्या 19व्या वर्षापासून आजपर्यंत ज्येष्ठ पत्रकार, लेखक, पर्यटक, गिर्यारोहक, संशोधक, धर्म आणि विज्ञान विषयातील तज्ञ अशा विविध भूमिकेतून कार्यरत असणारे डॉक्टर सुभाष के देसाई हे बहुआयामी व्यक्तिमत्व आहे. गुलमोहर आर्ट गॅलरी येथे संस्थापक आहेत दैनिक सिंहवाणीचे संस्थापक संपादक, पीटीआय, टाइम्स ऑफ इंडिया, इंडियन एक्सप्रेस, लोकसत्ता, सकाळ, पुढारी अशा विविध वृत्तपत्रात लिखाण केले अकॅडमी ऑफ रिलीज युनिटी या विविध धर्मांना एकत्र आणणाऱ्या संस्थेचे ते संस्थापक आहेत. शिवाजी विद्यापीठात वृत्तपत्र विद्या विभागात त्यांनी 25 वर्षे योगदान केलेले आहे. जवळजवळ 30 देशांमध्ये, साऱ्या हिमालयात त्यांनी भ्रमंती केली आहे. अनेक देशांमध्ये आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये शोधनिबंध सादर केले जगातील आणि देशातील अनेक महत्त्वपूर्ण व्यक्तींशी त्यांचा संपर्क आला याशिवाय स्वामी विवेकानंद या व्यक्तिमत्त्वाचा त्यांच्यावर आजन्म प्रभाव राहिला ते अविवाहित असून बहुजन हिताय बहुजन सुखाय हे त्यांनी जीवनाचे ध्येय ठेवले.


Next Story
Share it
Top