Home > Top News > Ambedkar Jayanti 2026 : “जातिभेदाच्या राखेतून उभा राहिलेला विचारसूर्य”

Ambedkar Jayanti 2026 : “जातिभेदाच्या राखेतून उभा राहिलेला विचारसूर्य”

Ambedkar Jayanti 2026 : “जातिभेदाच्या राखेतून उभा राहिलेला विचारसूर्य”
X

भारताच्या मातीत असे काही माणसे जन्माला येतात जी केवळ स्वतःसाठी जगत नाहीत, तर एका संपूर्ण युगाला आकार देतात. अशाच एका असाधारण व्यक्तिमत्त्वाचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू Mhow in Madhya Pradesh या छोट्याशा गावात झाला. Ramji Maloji Sakpal रामजी मालोजी सकपाळ आणि भीमाबाई यांचे ते चौदावे अपत्य भीमराव. हिंदू महार जातीत जन्म घेतल्यामुळे त्यांना समाजाने 'अस्पृश्य' म्हणून हिणवले. शाळेत वर्गाबाहेर बसणे, सार्वजनिक विहिरींचे पाणी मिळू न देणे, गावात माणसाप्रमाणे वागणूक न मिळणे हे त्यांच्या बालपणाचे क्रूर वास्तव होते. पण या अपमानांनी त्यांना खचवले नाही; उलट, त्या प्रत्येक दुखावलेल्या क्षणाने त्यांच्यात एक अदम्य आग पेटवली समाजव्यवस्थेला बदलण्याची, माणसाला माणूस म्हणून ओळखण्याची.

Baroda बडोद्याचे महाराज सयाजीराव गायकवाड यांनी भीमरावांची असामान्य बुद्धिमत्ता ओळखली आणि त्यांना शिष्यवृत्ती देऊन उच्च शिक्षणासाठी परदेशात पाठवले. १९१३ मध्ये ते अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठात दाखल झाले. भारतात जिथे जन्माची जात माणसाची किंमत ठरवत होती, तिथून हजारो मैल दूर त्यांनी एक मुक्त जग अनुभवले. Columbia कोलंबियामध्ये त्यांनी राज्यशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, तत्त्वज्ञान आणि अर्थशास्त्र या विषयांत सखोल अभ्यास केला. Political Science, Sociology, Anthropology, Philosophy, and Economics तिथे त्यांनी भारतीय जातिव्यवस्थेवरील एक संशोधनपर निबंध सादर केला ज्याची जगभरात प्रशंसा झाली. पुढे त्यांनी London School of Economics लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधूनही अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळवली. कोलंबिया आणि लंडन या दोन्ही जागतिक दर्जाच्या विद्यापीठांतून डॉक्टरेट मिळवणारा हा माणूस त्याच समाजातून आला होता जिथे त्याला शाळेत वर्गात बसण्याचाही हक्क नव्हता. हा केवळ एका माणसाचा विजय नव्हता हा लाखो अपमानांच्या उत्तरांचा संग्रह होता.

भारतात परतल्यावर त्यांनी जे पाहिले ते हृदयाला जड करणारे होते. शिक्षण घेऊन आलेल्या माणसालाही जातीमुळे अपमान सहन करावा लागत होता. समाजव्यवस्था बदलायला केवळ शिक्षण पुरेसे नाही, तर संघर्ष लागतो हे त्यांनी ओळखले. त्यांनी आपले जीवन एका महान उद्दिष्टासाठी वाहून घेण्याचा निर्धार केला. १९२७ मध्ये त्यांनी अस्पृश्यतेविरुद्ध व्यापक आंदोलन उभारले. चवदार तळ्याचे पाणी अस्पृश्यांनाही मिळावे यासाठी त्यांनी सत्याग्रह केला. हिंदू मंदिरांमध्ये दलितांना प्रवेश मिळावा यासाठी त्यांनी लढा दिला. अस्पृश्यांना ग्रामीण भागातील वेठबिगारी आणि जातीभेदाच्या परंपरागत गुलामगिरीतून बाहेर काढण्याचा त्यांचा निर्धार होता. ते आपल्या समाजाला सांगत 'खेडे हे गुलामगिरीचे माहेरघर आहे, शहरांकडे चला, नवे कौशल्य शिका, नवा व्यवसाय उभारा.' औद्योगिकीकरणाच्या युगात संधी ओळखून दलितांनी स्वतःला आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवावे, हा त्यांचा आग्रह होता. राजकीय शक्तीशिवाय संरक्षण नाही आणि संरक्षणाशिवाय मुक्ती शक्य नाही हे त्यांचे ठाम मत होते, म्हणून त्यांनी अस्पृश्यांना राजकीयदृष्ट्या संघटित होण्याचे आवाहन केले.

१९३६ मध्ये त्यांनी स्वतंत्र कामगार पक्षाची स्थापना केली आणि १९३७ च्या विधानसभा निवडणुकीत पंधरा जागा जिंकण्यात यश मिळवले. याच वर्षी त्यांनी 'जातीचे उच्चाटन' हे अत्यंत महत्त्वपूर्ण पुस्तक प्रकाशित केले. हे पुस्तक मूळात न्यूयॉर्कमध्ये लिहिलेल्या एका संशोधन निबंधावर आधारित होते आणि त्यात त्यांनी हिंदू धर्मातील जातिव्यवस्था आणि धार्मिक नेत्यांवर कठोर भाष्य केले. गांधीजींनी दलितांना 'हरिजन' ही उपाधी दिली, पण बाबासाहेबांनी या निर्णयाचा तीव्र विरोध केला कारण त्यांच्या मते दया नको, हक्क हवा. माणसाने दुसऱ्याच्या दयेवर नाही, तर स्वतःच्या अधिकारांवर उभे राहायला हवे, हे त्यांचे स्पष्ट तत्त्व होते. लंडनच्या गोलमेज परिषदेत ते स्वतः दलितांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहिले आणि जागतिक व्यासपीठावरही आपल्या समाजाचा आवाज बुलंद केला.

१५ ऑगस्ट १९४७ रोजी भारत स्वतंत्र झाला आणि देशाच्या उभारणीचा खरा प्रश्न सुरू झाला. हजारो वर्षे जाती-धर्म-भाषेत विखुरलेल्या या महाकाय देशाला एकसंध, न्यायपूर्ण आणि लोकशाही तत्त्वांवर उभारण्याचे महाकार्य समोर होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर देशाचे पहिले कायदेमंत्री झाले आणि २९ ऑगस्ट १९४७ रोजी त्यांना स्वतंत्र भारताच्या संविधान मसुदा समितीचे अध्यक्ष म्हणून नेमण्यात आले. हे पद केवळ एक पद नव्हते ते एक ऐतिहासिक जबाबदारी होती. त्यांनी या जबाबदारीला आपल्या संपूर्ण आयुष्याच्या संघर्षाची परिणती म्हणून स्वीकारले. संविधानाच्या मसुद्यातील प्रत्येक कलम, प्रत्येक तरतूद त्यांनी विचारपूर्वक रचली. त्यांचे सहकारी म्हणत की संविधान सभेच्या प्रत्येक बैठकीत बाबासाहेब सर्वात तयारीने येत. जे प्रश्न इतरांना क्लिष्ट वाटत, त्यांची उत्तरे त्यांच्याकडे आधीच तयार असत. नोव्हेंबर १९४८ मध्ये संविधानाच्या मसुद्यावर बोलताना त्यांनी स्पष्ट केले की भारत हे राज्यांचे केवळ संघटन नाही, तर एक अविभाज्य संघराज्य आहे. फ्रेंच राज्यक्रांतीतून प्रेरणा घेत त्यांनी स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही तीन मूलभूत मूल्ये संविधानाच्या गाभ्यात रुजवली. कलम १४ ते १८ द्वारे समतेचा अधिकार, कलम १९ ते २२ द्वारे स्वातंत्र्याचा अधिकार आणि कलम २३-२४ द्वारे शोषणविरोधी संरक्षण हे सारे त्यांनी अत्यंत विचारपूर्वक घडवले. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार कलम २५ ते २८ मध्ये सुनिश्चित केला. संविधान सभेच्या अखेरच्या बैठकीत त्यांनी दिलेले भाषण आजही एक दिशादर्शक दस्तावेज मानले जाते. त्यात ते म्हणाले 'जातीव्यवस्था आणि लोकशाही एकत्र राहू शकत नाही.' हे शब्द म्हणजे केवळ एक विधान नव्हते, तर एक इशारा होता जो भारताला आजही लागू आहे. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी संविधान सभेने संविधान स्वीकारले आणि एक युगाची सुरुवात झाली.

बाबासाहेबांचा राष्ट्रवाद हा कधीही संकुचित नव्हता. जाती, वर्ण आणि धर्माच्या पलीकडे जाणारी, समतेवर आधारलेली राष्ट्रभावना त्यांनी मांडली. ते म्हणत 'राष्ट्र हे केवळ एक भौगोलिक क्षेत्र नाही. ते भूतकाळातील माणसांनी केलेल्या त्यागाचे, अथक परिश्रमांचे आणि देशभक्तीचे जिवंत फळ आहे.' राष्ट्रीयत्व ही एक सामाजिक चेतना आहे या चेतनेतूनच माणसे एकमेकांजवळ येतात आणि बंधुत्व साकार होते. पण जेव्हा संकुचितपणाची मानसिकता येते जेव्हा माणूस स्वतःला आधी हिंदू, मुसलमान, मराठा किंवा दलित समजतो आणि मग भारतीय तेव्हा हे बंध तुटतात. म्हणून ते आग्रहाने म्हणत 'माझी इच्छा आहे की सर्व भारतीयांनी स्वतःला केवळ भारतीय समजावे, इतर सर्व ओळखी त्यापुढे दुय्यम ठराव्यात.' हा विचार आजही जितका आवश्यक आहे, तितकाच तो त्या काळात क्रांतिकारक होता.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांसाठीचे कार्य हे त्यांच्या समग्र सामाजिक दृष्टीचा अविभाज्य भाग होता. मुंबईच्या महिला सभेत ते म्हणाले होते 'स्त्री ही राष्ट्राची निर्माणकर्ता आहे. स्त्री जागृत केल्याशिवाय राष्ट्राचा विकास शक्य नाही.' हे शब्द त्या काळात अत्यंत धाडसाचे होते, कारण स्त्रियांचे स्थान समाजात केवळ घरापुरते मर्यादित मानले जात होते. महिलांसाठी नोकरीत आरक्षण देण्याचा पुढाकार त्यांनीच घेतला. हिंदू कोड विधेयकाच्या मसुद्यात त्यांनी वारसाहक्क, विवाह आणि कायद्यात लैंगिक समानतेची स्पष्ट मागणी केली. हे विधेयक संसदेत थांबवण्यात आले तेव्हा त्यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातून राजीनामा दिला. सत्तेची खुर्ची सोडणे त्यांना सहज जमले, कारण त्यांच्यासाठी तत्त्व हे पदापेक्षा मोठे होते.

बाबासाहेबांचे व्यक्तिमत्त्व हे अनेक पैलूंनी सजलेले होते. ते एकाच वेळी समाजसुधारक, राजकारणी, अर्थशास्त्रज्ञ, क्रांतिकारक, तत्त्वज्ञ, विधिज्ञ आणि पत्रकार, लेखक होते. त्यांनी केवळ नियतकालिके आणि मासिके प्रकाशित केली नाहीत, तर क्रांतिकारक लेखनाने समाजाला हादरवून सोडले. आयुष्याच्या सुरुवातीला ते अर्थशास्त्राचे प्राध्यापक होते, नंतर वकिली केली, मग राजकारणात उतरले आणि संविधान लिहिले एका आयुष्यात इतक्या भूमिका निभावणारा माणूस जगाच्या इतिहासात विरळच आढळतो. त्यांचे व्यक्तिमत्त्व म्हणजे स्मृती, बुद्धिमत्ता, प्रामाणिकपणा, चिकाटी आणि प्रखर लढाऊ वृत्ती यांचे दुर्मीळ संयोजन होते. बहुभाषी असलेले बाबासाहेब धर्म आणि तत्त्वज्ञानाचेही गाढे अभ्यासक होते. त्यांनी आपले संपूर्ण जीवन भारतातील अस्पृश्यता आणि सामाजिक विषमता दूर करण्यासाठी समर्पित केले. १९५१ मध्ये हिंदू कोड विधेयकावरून राजीनामा दिल्यानंतरही त्यांचा संघर्ष थांबला नाही. आयुष्याच्या अखेरच्या काळात मधुमेहाने त्रस्त असतानाही त्यांनी लेखन, चिंतन आणि आंदोलन सुरूच ठेवले. डॉ. आंबेडकर वस्तुतः समान नागरी संहितेच्या बाजूने होते आणि काश्मीरबाबत कलम ३७० चे ते कट्टर विरोधक होते. त्यांच्या मते जिथे भारत जाती, धर्म आणि भाषेच्या आधारावर विभागलेला आहे, तिथे राज्यघटनाच एकमेकांना जोडणारी कडी बनू शकते. संविधान हे केवळ कायद्याचे पुस्तक नाही. ते एका राष्ट्राचे नैतिक अधिष्ठान आहे, असे ते मानत.

१४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपुरात एक ऐतिहासिक क्षण घडला. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लाखो अनुयायांसह बौद्ध धर्म स्वीकारला. हे केवळ धर्मांतर नव्हते ते एका पिचलेल्या समाजाचे आत्मसन्मानाचे पुनरुज्जीवन होते. बुद्धाच्या प्रज्ञा आणि करुणेच्या मार्गावर चालत त्यांनी एका नव्या समाजरचनेची पायाभरणी केली. बौद्ध तत्त्वज्ञानातील बंधुता आणि समता ही मूल्ये त्यांच्या जीवनदृष्टीशी पूर्णपणे सुसंगत होती. त्यानंतर अवघ्या दोन महिन्यांनी, ६ डिसेंबर १९५६ रोजी, दिल्लीत झोपेतच त्यांनी या जगाचा निरोप घेतला. पण ते गेले नाहीत ते विचारांच्या रूपात अजरामर झाले.

'बहुजन हिताय, बहुजन सुखाय' हे त्यांचे तत्त्वज्ञान आजही तितकेच प्रासंगिक आहे. समानता आणि सामाजिक न्याय या दोन स्तंभांवर उभारलेला त्यांचा विचार कोणत्याही एका जाती, धर्म किंवा वर्गापुरता मर्यादित नव्हता. सामाजिक न्याय प्रस्थापित केल्याशिवाय खऱ्या अर्थाने आर्थिक आणि राजकीय प्रश्न सुटत नाहीत, हे त्यांनी ठामपणे सांगितले. आर्थिक प्रगती सामाजिक न्यायाला आपोआप जन्म देते, ही धारणा त्यांना मान्य नव्हती. उलट, सामाजिक भेदभाव संपवणे हेच आर्थिक आणि राजकीय विकासाचे खरे द्वार आहे, असे त्यांनी आग्रहाने मांडले. मानवजातीच्या इतिहासात असे क्वचितच घडले आहे जेव्हा एका माणसाने बुद्धिप्रामाण्यवाद, तर्कशास्त्र आणि मानवतेचा आग्रह धरत जातीभेदाच्या हजारो वर्षांच्या दुर्गावर एकट्याने चाल केली.

१९९० मध्ये त्यांना मरणोपरांत 'भारतरत्न' हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला. पण खरा सन्मान हा आहे की आज भारतातील कोट्यवधी माणसे त्यांच्या नावाने प्रेरणा घेतात, त्यांच्या विचारांनी जगतात. हजारो वर्षे दास्यत्वात राहिलेल्या समाजाला आत्मसन्मानाने उभे करणारे, संविधानाच्या माध्यमातून न्यायाची हमी देणारे आणि माणसाला माणूस म्हणून ओळखण्याचा सतत आग्रह धरणारे डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ एका जातीचे, एका वर्गाचे किंवा एका धर्माचे नेते नव्हते ते संपूर्ण मानवजातीचे महानायक होते. त्यांना आठवणे म्हणजे केवळ स्मरण नाही ते म्हणजे एक आदर्श, समतामूलक आणि न्यायपूर्ण समाज घडवण्याच्या संकल्पाला नव्याने उजाळा देणे होय. जोपर्यंत भारतात जातीभेद आहे, विषमता आहे, शोषण आहे तोपर्यंत बाबासाहेबांचा विचार हा दीपस्तंभासारखा मार्ग दाखवत राहील.

विकास परसराम मेश्राम

मु+पो, झरपडा,ता, अर्जूनी/मोर, जिल्हा गोंदिया

मोबाईल नंबर -7875592800

[email protected]

Updated : 13 April 2026 7:43 PM IST
Next Story
Share it
Top