Home > Top News > Life After Losing Parents : अस्तित्वाचा कोपरा- आई-वडिलांच्या आठवणींची शिदोरी

Life After Losing Parents : अस्तित्वाचा कोपरा- आई-वडिलांच्या आठवणींची शिदोरी

Life After Losing Parents : अस्तित्वाचा कोपरा- आई-वडिलांच्या आठवणींची शिदोरी
X

काही नाती ही निसर्गाने दिलेली सर्वात मोठी देणगी असतात. आई आणि वडील हे केवळ दोन शब्द नसून, ते आपल्या आयुष्याचे संपूर्ण व्याकरण असतात. आपण कितीही मोठे झालो, जगात कितीही नाव कमावले, तरी त्यांच्या समोर आपण नेहमीच 'लहान मूल' असतो. आज जेव्हा ते आपल्यात नाहीत, तेव्हा घराचा तो कोपरा, ती खुर्ची आणि त्यांचा तो आवाज ऐकण्यासाठी मन व्याकुळ होते. आई-वडील सोबत असताना आपल्याला जगाची भीती वाटत नाही. "मी आहे ना, तू काळजी नको करू" हे वडिलांचे एक वाक्य कोणत्याही संकटावर मात करण्याची शक्ती द्यायचे. आईच्या हातचे ते साधे जेवण आणि तिने विचारलेले "जेवलास का?" हे प्रश्न आता कोणाकडूनच ऐकायला मिळत नाहीत. ही पोकळी केवळ माणसांची नसते, तर ती त्या निस्वार्थी प्रेमाची असते जे जगात इतरत्र कुठेही शोधून सापडत नाही.

विशेषतः जेव्हा आपण एकटे असतो, तेव्हा घराची ती शांतता अंगावर येते. कधीतरी सवयीने आपण त्यांना हाक मारतो आणि मग जाणीव होते की, आता उत्तर देणारे कोणी नाही. ही जाणीव काळजाला घर पाडणारी असते. पण याच शांततेत त्यांचे संस्कार आणि त्यांनी दिलेली मूल्ये आपल्याशी संवाद साधत असतात. त्यांनी आपल्याला चालायला शिकवले, जगायला शिकवले आणि आज त्यांच्या विरहात सावरण्याचे बळही कदाचित त्यांच्या आठवणीच आपल्याला देत आहेत.

आई-वडिलांच्या जाण्यानंतर येणारा हा 'व्हॅक्यूम' भरून काढण्यासाठी त्यांच्या आठवणींशी संवाद साधणे गरजेचे आहे. कधीतरी आईच्या आवडीची एखादी डिश बनवणे किंवा वडिलांना आवडणारे गाणे लावणे, यामुळे ते आपल्या आसपास असल्याची जाणीव होते. त्यांनी ज्या तत्त्वांवर आयुष्य जगले, ती तत्त्वे आपल्या कामात आणणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली आहे. जरी ते प्रत्यक्ष समोर नसले, तरी मनातल्या मनात त्यांच्याशी बोलल्याने मन हलके होते. आई-वडील गेले तरी ते पूर्णपणे संपत नाहीत. ते आपल्या रक्तामध्ये, आपल्या विचारांमध्ये आणि आपल्या वागण्यामध्ये जिवंत असतात. आपण जेव्हा कोणाशी प्रेमाने वागतो किंवा कोणाला मदत करतो, तेव्हा त्या कृतीतून आपले आई-वडीलच जगासमोर येत असतात. ही पोकळी कधीच पूर्णपणे भरून निघणार नाही, पण त्या रिकाम्या जागेत त्यांच्या आठवणींची फुले फुलवत राहणे, हेच आपल्या हातात आहे.

आई-वडिलांच्या जाण्यानंतर निर्माण होणारी पोकळी ही शब्दांत मांडणे कठीण आहे. हे एक असे 'वैश्विक सत्य' आहे ज्याचा सामना प्रत्येक मुलाला किंवा मुलीला कधी ना कधी करावाच लागतो. पण हा व्हॅक्यूम (पोकळी) अविवाहित (Single) व्यक्तीसाठी जास्त वेदनादायी असतो की विवाहित व्यक्तीसाठी? याचे उत्तर काळ-वेळ आणि परिस्थितीनुसार बदलते. अविवाहित व्यक्तीसाठी आई-वडिलांचे जाणे हे केवळ भावनिक नुकसान नसते, तर ते त्यांच्या संपूर्ण आधारस्तंभाचे कोसळणे असते. घरी गेल्यावर ज्यांच्याशी मनमोकळे बोलता येईल, असे दुसरे कोणीही नसते. आई-वडील हेच त्यांचे जग असते. त्यांच्या निधनानंतर घर 'घर' राहत नाही, तर ती केवळ एक 'वास्तू' उरते. भविष्यातील निर्णय घेताना सल्ला देणारे किंवा पाठीवर हात ठेवणारे कोणी उरत नाही. "आता माझं कोण?" हा प्रश्न त्यांना जास्त सतावतो.

विवाहित लोकांच्या घरात जो मुलांचा किंवा जोडीदाराचा गोंगाट असतो, तो इथे नसल्यामुळे शांतता अधिक भयाण वाटते. अनेकांना वाटते की विवाहित व्यक्तीकडे जोडीदार आणि मुले आहेत, त्यामुळे त्यांना दुःख कमी होत असेल. पण हे पूर्णपणे खरे नाही. लग्न झाले तरी आई-वडिलांसाठी आपण नेहमी 'बाळच' असतो. त्यांच्या मृत्यूनंतर त्या व्यक्तीच्या आयुष्यातील तो 'लहान मुलगा' किंवा 'मुलगी' कायमची हरवते. आता ती व्यक्ती फक्त कोणाची तरी पत्नी, पती किंवा आई-वडील असते. स्वतःचे दुःख बाजूला सारून त्यांना स्वतःच्या मुलांचे आणि संसाराचे गाडे ओढावे लागते. त्यांना मनमोकळे रडण्यासाठीही अनेकदा एकांत मिळत नाही. आई-वडिलांची आठवण येणे ही एक अशी भावना आहे जी वयाची किंवा वैवाहिक स्थितीची मर्यादा ओलांडून प्रत्येकाच्या आयुष्यात कधी ना कधी येतेच.

मी एकदा माझ्या एका विवाहित आणि स्थिरावलेल्या मैत्रिणीला विचारले, "जेव्हा तुला खूप अस्वस्थ, तणावग्रस्त किंवा थकल्यासारखे वाटते, तेव्हा तू काय करतेस?" तिने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, "मी लगेच माझ्या आईला फोन करते. माझ्या आवाजातील तणाव ती इतक्या पटकन ओळखते की, तिला न सांगताच समजते की मी काहीतरी काळजीत आहे."

दुसऱ्या एका विवाहित आणि यशस्वी मित्राने सांगितले की, "माझी आई वारली तेव्हा मला खऱ्या अर्थाने पोरके वाटले. प्रश्न हा होता की आता रोजच्या जगण्यातील छोट्या-छोट्या गोष्टी मी कोणाला सांगू? मी रोज तिला फोन करून माझ्या दिवसाचा वृत्तांत सांगायचो आणि ती शांतपणे सर्व काही ऐकून घ्यायची."

"वडिलांचे केवळ असणेच तुम्हाला सुरक्षिततेची खात्री देते. 'मी आहे ना,' हे त्यांचे काही शब्दच जगातील सर्व भीती दूर करण्यासाठी पुरेसे असतात."

तात्विकदृष्ट्या पाहिले तर, अविवाहित व्यक्तीसाठी ही पोकळी 'जास्त' वेदनादायी ठरू शकते. कारण त्यांच्याकडे दुःखाचे वाटप करण्यासाठी घरात कोणीही नसते. विवाहित व्यक्तीकडे जोडीदाराचा खांदा असू शकतो किंवा मुलांकडे बघून जगण्याची नवी उमेद मिळू शकते. अविवाहित व्यक्तीला मात्र त्या रिकाम्या घराशी आणि स्वतःच्या विचारांशी एकट्याने झुंजावे लागते. मात्र, वेदनेची तीव्रता ही व्यक्तीच्या स्वभावावर आणि आई-वडिलांशी असलेल्या त्यांच्या बॉन्डिंगवर (Bonding) अवलंबून असते. या पोकळीतून बाहेर कसे पडायचे?दुःख व्यक्त करा, त्यांच्या आठवणी जपा, संवाद साधा, स्वतःला कामात गुंतवा. आई-वडिलांची जागा कोणीच घेऊ शकत नाही, पण त्यांनी पाहिलेली स्वप्ने पूर्ण करणे हीच त्यांना खरी श्रद्धांजली ठरते.

Updated : 14 March 2026 8:01 AM IST
author-thhumb

मनीषा रेगे

प्रेस ट्रस्ट ऑफ इंडिया (PTI) मधील एक अनुभवी वरिष्ठ पत्रकार म्हणून ओळखल्या जातात. त्यांनी अनेक दशकांपासून राजकीय आणि सामाजिक विषयांवर वार्तांकन केले आहे.


Next Story
Share it
Top