poverty and happiness : अभावातील अस्तित्व - जेव्हा गरिबी श्रीमंत होती !
सर्व काही असूनही, मन का शोधते त्या वाटा? जिथे गरिबीतही श्रीमंत होता, तो सुखाचा साठा….
X
life lessons from poverty आज एका मित्राच्या भावाचा साक्षगंध कार्यक्रम होता तेव्हा कुटुंबासह गेलो. त्यावेळी कारंजामधील माझे परिचित सेवानिवृत्त अधिकारी भेटले.ते माझ्यासोबत बहुतांशवेळी जिमला असायचे. आमच्या जिम फिटनेस अश्या गोष्टी सुरू झाल्या आणि माझ्या मित्राने त्याच्या पायात घातलेला लेदर शूजवर विषय येऊन थांबला.तो सांगत होता की शूज खूप छान आहे परंतु कम्फर्ट नाही तेव्हा मी माझा शूज त्याला दाखवला आणि मग हा कसा कम्फर्ट आहे ते सांगितले. मग आमच्या तिघामध्ये शूजच्या वेगवेगळ्या ब्रांड आणि त्याचा कम्फर्ट कसा ह्यावर चर्चा झाली. माझ्या सोबत असलेल्या सेवानिवृत्त अधिकारी यांनी सुद्धा त्यांचे मत मांडले आणि मी त्याना सांगितले की कम्फर्ट वैगेरे ह्या काल्पनिक बाबी आहेत सर्व मनावर आणि आपल्या विचारावर अवलंबून असते. आमची चर्चा सुरू असताना काही गोष्टी डोळ्यासमोरून झरझर निघून गेल्या मी लहान असताना पाहिल्यावेळेस मला चप्पल जेव्हा घेतली तेव्हा मी ५व्या किंवा ६ व्या वर्गात असेल. ते पण दर रविवारी ५ रुपये याप्रमाणे ४ रविवार मिळून २० रुपये जमवले आणि २२ रुपयाची पॅरागॉन चप्पल मी घेतली होती कारण परिस्थितीच तशी होती मुबलकता खूप कमी होती. त्यावेळी बहुतांश मुलांची कदाचित हीच परिस्थिती असावी किंवा त्यांची पहिली चप्पल पॅरागॉनच असावी .थंडीच्या दिवसात सकाळची शाळा असायची आणि पायी दीड दोन किमी शाळेत विनाचपलीचे जावे लागायचे .पायाला खडे टोचायचे, पायाला माती-चिखल लागायचा,जखमा व्हायच्या हे सर्व सर्व आठवले. एक वेळ उजव्या पायाचे अंगठ्याचे नख तुटले होते आणि मग डॉक्टर आणि ते नख कापून घेतले वैगेरे वैगेरे सर्व काही डोळ्यासमोरून गेले.
त्यावेळी पुरेसे पैसे नव्हते, पुरेशी साधने, जीवनावश्यक वस्तू जवळ नव्हत्या परंतु कुठलीही भ्रांत नव्हती. जीवनात आनंद होता खूप काही गोष्टीचा अभाव होता परंतु त्यामध्ये आनंद होता आणि अभाव होता म्हणूनच काही मिळवण्याची आशा पायाला बांधून होती. मला ओळखणारे किंवा ज्यांनी मला जवळून बघितले आहे त्यापैकी कुणीही ह्या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाहीत. ह्या डोळ्यासमोरून गेलेल्या आठवणी केवळ माझा वैयक्तिक प्रवास नसून तो त्यावेळच्या बहुतांश व्यक्तींच्या जीवनसत्याचा आरसा आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही .लहानपणी पायात चप्पल नसतानाही जो आनंदाचा आणि आशेचा 'स्पर्श' जमिनीतून मिळत होता, तो आज ब्रँडेड शूजच्या मऊ सोल्समध्ये हरवल्यासारखा वाटतो, हे जाणवणे स्वाभाविक आहे.
माणसाचं आयुष्य म्हणजे एक विचित्र वर्तुळ आहे. कधीकाळी आपण 'काहीतरी' मिळवण्यासाठी धावत असतो आणि जेव्हा ते सर्व मिळतं, तेव्हा पुन्हा त्याच वळणावर जाऊन उभं राहावंसं वाटतं, जिथे आपल्याकडे काहीच नव्हतं. १०-११ वर्षांचा होईपर्यंत पायात चप्पल नसणं, हे आजच्या चकाचक जगात काहींना दारिद्र्य वाटेल; पण ज्यानी ते फेस केलय त्याना माहीत आहे की ते केवळ दारिद्र्य नव्हतं, ती मातीशी जोडलेली एक घट्ट नाळ होती. अनवाणी पायांचा तो स्पर्श आज महागडे बूट आणि चपलांच्या जोड्यांनी पायांना जमिनीपासून तोडलं आहे. लहानपणी जेव्हा अनवाणी पायानं उन्हातल्या तापलेल्या वाटेवरून किंवा पावसाच्या चिखलातून चालायचो, तेव्हा निसर्गाचा प्रत्येक बदल थेट काळजापर्यंत पोहचायचा. पायाला टोचलेला खडा रडवायचा खरा, पण त्याच वेळी सावरून चालण्याची जिद्दही द्यायचा. आज पायात गादीसारखे मऊ शूज आहेत पण चालण्यात ती पूर्वीची सतर्कता आणि तो थरार उरला नाही.
त्या चपलेच्या अभावातही आशेचा किरण होता .पायाला टोचणारा प्रत्येक खडा काहीतरी मिळवण्यासाठी आशाळभूत करायचा. कुठल्याही अभावाचं एक वैशिष्ट्य असतं त्यामध्ये 'स्वप्न' पाहण्याची सोय असते. जेव्हा एखादी गोष्ट आपल्याकडे नसते, तेव्हा ती मिळवण्याची ओढ आपल्याला जिवंत ठेवते. १०-११ वर्षांचा मी ज्याच्या पायाला भेगा होत्या परंतु डोळ्यात मात्र भविष्याची लख्ख चमक होती. प्रत्येक पाऊल एका उद्याच्या आशेवर पडत होतं. आज चप्पल,शूज,सर्व जीवनावश्यक बाबी जवळ आहेत आणि आता मिळवण्यासारखं फारसं काही उरलं नाही उलट गमावण्याची भीती तयार झाली आहे. मनःशांती ही वस्तूंमध्ये नसते, ती तृप्तीमध्ये असते. अभावात असताना छोट्या गोष्टीही उत्सवासारख्या वाटायच्या. त्यावेळी दिवाळी ,दसरा यासारख्या सणाला नवीन नवीन कपडे ,चप्पल असा काही मिळायचे आणि ते मिळणार असेल तर त्या आनंदाची तीव्रता इतकी असायची की कित्येक रात्री झोप लागायची नाही. १५-२० दिवस अगोदरपासून दिवाळी-दसरा यायची वाट पहायचो. आज आपण हवं ते हव्या त्या क्षणी विकत घेऊ शकतो, म्हणूनच त्यातील मूल्य हरवलं आहे. महागड्या ब्रँड्सनी पाय सुखावले असतील, पण मनाची तहान भागवणारी ती साधी शांती मात्र त्या अनवाणी वाटांवरच कुठेतरी मागे राहिली आहे असे वाटायला लागले .
लहानपणचा तो पायात चप्पल नसलेला मी आजच्या सर्वकाही असलेल्या मी ला एकच गोष्ट सांगतोय की सुखाचा संबंध वस्तूंशी नाही, तर तुम्ही जीवनाकडे कसं पाहता याच्याशी आहे. अभावात एक प्रकारचं स्वातंत्र्य होतं..जबाबदाऱ्यांचं ओझं नव्हतं आणि स्वप्नांना पूर्ण आकाश होतं. आजचे पद,जवळ असलेल्या वस्तू ,आजचे राहणीमान ,पायात असलेले शूज आपल्याला समाजात प्रतिष्ठा देत असतील, पण त्या अनवाणी पावलांनी दिलेली 'खंबीरता' आजही माझ्या अस्तित्वाचा पाया आहे असे मला जाणवते .
कदाचित, खरा आनंद हा मिळवण्यात नसून, त्या 'मिळवण्याच्या प्रवासात' असलेल्या आशेमध्येच दडलेला असतो असे आज वाटते.
सर्व काही असूनही, मन का शोधते त्या वाटा? जिथे गरिबीतही श्रीमंत होता, तो सुखाचा साठा….
poverty and happiness, life lessons from poverty, simple living high thinking, happiness in simplicity, childhood memories poverty, rich vs poor lifestyle, importance of contentment, minimalism lifestyle benefits, real meaning of happiness, emotional life stories






