Gandhi Talks film Review : मौनातून गजर करणारा सिनेमा !
"पैसा बोलतो" ही इंग्रजीतली म्हण आपल्याला माहीत आहे आणि "गांधी टॉक्स" या शीर्षकात तीच म्हण आहे पण मराठी संदर्भात. भारतीय चलनावरील महात्मा गांधींचा चेहरा जो सत्य, अहिंसा, साधेपणा आणि उच्च मूल्यांचे प्रतीक आहे, आज तोच चेहरा सत्ता, भ्रष्टाचार आणि विषमतेचे प्रतीक बनला आहे. शीर्षकातील विडंबना अत्यंत खोल आहे आणि ती आपल्याला विचार करायला भाग पाडते. - विकास मेश्राम
X
Gandhi Talks film आजच्या डिजिटल युगात, जिथे रील्स आणि शॉर्ट व्हिडीओंची सरबत्ती सुरू आहे, तिथे दोन तासांहून अधिक काळ मूक चित्रपट पाहणे म्हणजे काळाच्या विरुद्ध जाण्यासारखे आहे. किशोर पांडुरंग बेळेकर दिग्दर्शित "गांधी टॉक्स" हा असाच एक धाडसी प्रयोग आहे, जो मौनाला भाषा बनवतो आणि संवादहीनतेला शक्तिशाली कथनाचे साधन. हा चित्रपट केवळ मनोरंजन नाही, तो एक अनुभव आहे जो आपल्याला आपल्याच आत घेऊन जातो आणि आपल्या जगण्याच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह उभे करतो.
मुंबई हे स्वप्नांचे शहर म्हणून ओळखले जाते, पण त्याचबरोबर ते संघर्षांचे शहरही आहे. लोकल ट्रेनचा आवाज, वाहनांचे हॉर्न, बांधकामाची खटपट आणि लाखो लोकांच्या महत्त्वाकांक्षांचा गजबज यामुळे हे शहर कधीच थांबत नाही किंवा विसावत नाही. पण "गांधी टॉक्स" या गोंगाटातून शांततेचे क्षण शोधतो आणि त्यातूनच आपली कथा सांगतो. दिग्दर्शकाची नजर मुंबईवर अत्यंत प्रेमळ आहे आणि कॅमेरा सरळ चाळींच्या अरुंद गल्लीत, समुद्रकिनाऱ्यावर, रस्त्यावरच्या चहाच्या टपऱ्यावर आणि गगनचुंबी इमारतींच्या सावलीत थांबतो.
हे शहर विरोधाभासांनी भरलेले आहे, एका बाजूला चकाकणाऱ्या टॉवर्स तर दुसऱ्या बाजूला झोपडपट्ट्या. श्रीमंती आणि गरिबी इतक्या जवळ राहतात की त्यांच्यातली भिंत जवळजवळ अदृश्य वाटते, तरीही ती भिंत इतकी मजबूत आहे की दोन जगांतले लोक एकमेकांना पाहतातच पण भेटत नाहीत. मुंबई फक्त शहर नाही, ती या चित्रपटातील एक महत्त्वाचे पात्र आहे. समुद्राच्या लाटांसारखी ती सगळ्यांना आपल्या छातीशी धरते, मेहनती मजुरांना, स्वप्न पाहणाऱ्या तरुणांना आणि निराश झालेल्या कलाकारांना. या सगळ्यांच्या मधोमध विणलेली आहे दोन माणसांची गाथा, जी एकमेकांपासून वेगळी असली तरी मूलतः एकच आहे.
विजय सेतुपतीने साकारलेला महादेव हा एक सामान्य माणूस आहे, पण त्याच्या साधेपणातच त्याची असामान्यता दडलेली आहे. चाळीत आजारी आईसोबत राहणारा, बेरोजगारीशी झगडणारा पण स्वतःची माणुसकी न गमावणारा हा युवक दररोज जीवनाशी संघर्ष करतो. रोज सकाळी उठून कामाच्या शोधात भटकणे, नाकारले जाणे आणि आर्थिक अडचणींशी लढणे हे त्याचे नित्यक्रम आहेत. पण यातल्या यात तो कधीच आपली मानवता विसरत नाही आणि हीच त्याची सर्वात मोठी ताकद आहे. चोरी करताना चपला बाहेर काढणे हा प्रसंग दोन गोष्टी स्पष्टपणे दाखवतो, पहिली म्हणजे मध्यमवर्गीय मूल्यसंस्कार इतक्या खोलवर रुजलेल्या असतात की अनैतिक कृत्यातही त्या उमटतात आणि दुसरी म्हणजे गरीबी माणसाला चोरीला भाग पाडू शकते पण संस्कार मात्र हिरावून घेत नाही.
आजारी आईजवळ डोके ठेवून झोपलेला महादेव हा दृश्य अत्यंत हृदयद्रावक आहे. एक प्रौढ माणूस जो बाहेरच्या जगात संघर्ष करतो, आईच्या जवळ येताच पुन्हा लहान मुलासारखा होतो आणि ही भावना, हा नाता संवादाशिवाय इतक्या सुंदरपणे व्यक्त झाला आहे की डोळे पाणावतात. महादेवचे जीवन हे आपल्या आसपासच्या लाखो सामान्य माणसांचे प्रतिनिधित्व करते, जे दररोज संघर्ष करतात पण कधी हार मानत नाहीत.
अरविंद स्वामीने साकारलेला मोहन बोसमन हा विरुद्ध टोकाचा माणूस आहे. प्रसिद्ध बिल्डर, संपन्न कुटुंब, प्रतिष्ठा आणि सत्ता यांचे प्रतीक असलेला हा माणूस जीवनाच्या शिखरावर आहे. पण आयुष्य कधी कधी एका क्षणात सगळे काही उलथापालथ करून टाकते आणि बोसमनच्या बाबतीतही तेच घडते. अपघातात पत्नी आणि मुलीचा मृत्यू ही दु:खाची सुरुवात आहे, नंतर आईचा निधन, कायदेशीर अडचणी आणि व्यवसायात येणारी अडथळे त्याच्या जीवनाला कोलमडून टाकतात. एकेकाळी ज्याचे एक शब्द कायदा होता, तो आता असहाय्य आणि एकटा आहे. पैसा त्याच्याजवळ आहे पण समाधान नाही, सुविधा आहेत पण सुख नाही आणि लोक त्याच्याभोवती आहेत पण कोणीही त्याच्या जवळचे नाही.
बोसमनचे पतन पाहणे अत्यंत वेदनादायक आहे, कारण तो दुष्ट नाही तर फक्त एक असा माणूस आहे ज्याला आयुष्याने मोठे धक्के दिले आहेत. त्याच्या डोळ्यांतला शून्यपणा आणि त्याच्या हालचालींतली थकवा यांना अरविंद स्वामीने अत्यंत संयमाने व्यक्त केले आहे. त्यांचा अभिनय सूक्ष्म आहे पण प्रभावी आहे आणि बोसमनच्या पात्रातून ते असे दाखवतात की श्रीमंती आणि संपत्ती आंतरिक शांती आणण्यासाठी पुरेसे नाहीत.
महादेव आणि बोसमन हे दोन वेगवेगळ्या जगांतले माणसे आहेत. एकाजवळ काहीच नाही तर दुसऱ्याजवळ सगळे काही आहे. पण दोघांनाही जाणवते की आयुष्य फक्त पैशावर अवलंबून नाही आणि त्यापेक्षा खोल काहीतरी असणे आवश्यक आहे. महादेवला पैसा हवा आहे जगण्यासाठी तर बोसमनला पैसा आहे पण जगण्याचे कारण नाही. जेव्हा त्यांच्या वाटा एकमेकांना ओलांडतात, तेव्हा समजते की दु:ख हे सार्वत्रिक आहे आणि ते श्रीमंतांना सोडत नाही आणि गरीबांनाही. फरक फक्त एवढाच की दोघेही वेगवेगळ्या कारणांसाठी तुटलेले असतात आणि दोघांनाही जीवनाचा अर्थ शोधायचा असतो.
"पैसा बोलतो" ही इंग्रजीतली म्हण आपल्याला माहीत आहे आणि "गांधी टॉक्स" या शीर्षकात तीच म्हण आहे पण मराठी संदर्भात. भारतीय चलनावरील महात्मा गांधींचा चेहरा जो सत्य, अहिंसा, साधेपणा आणि उच्च मूल्यांचे प्रतीक आहे, आज तोच चेहरा सत्ता, भ्रष्टाचार आणि विषमतेचे प्रतीक बनला आहे. शीर्षकातील विडंबना अत्यंत खोल आहे आणि ती आपल्याला विचार करायला भाग पाडते. ज्या गांधीजींनी सांगितले की पृथ्वीवर सगळ्यांच्या गरजा पुरवायला पुरेसे आहे पण एकाच्या लालसा पुरवायला नाही, त्याच गांधीजींचा चेहरा आज पैशावर छापला आहे. आणि तो पैसा ठरवतो कोण मोठा कोण लहान, कोणाला न्याय मिळेल आणि कोणाला नाही.
पण चित्रपट फक्त व्यंग करत नाही तर एक आशा देखील दाखवतो, की गांधीवादी तत्त्वे म्हणजे प्रामाणिकपणा, सहानुभूती आणि त्याग अजूनही जिवंत आहेत. फक्त त्यांना शोधण्याची गरज आहे आणि जोपासण्याची गरज आहे. चित्रपटाचे शीर्षक एकाच वेळी व्यंगात्मक आणि आशावादी आहे, जे आपल्याला आपल्या समाजाची वास्तविकता पाहायला लावते.
"गांधी टॉक्स"ची सर्वात मोठी ताकद म्हणजे तिचे मौन. दोन तासांहून अधिक काळ संवाद नसणे हे आजच्या काळात ही कल्पनाच धोकेदायक वाटते पण हा चित्रपट सिद्ध करतो की शब्दांशिवायही कथा सांगता येते आणि भावना व्यक्त होतात. मौनातच कितीतरी गोष्टी सांगितल्या जातात, एक नजर, एक हसू, एक अश्रू यातून संपूर्ण कथा उलगडते. कॅमेरा त्या सगळ्या क्षणांना पकडतो आणि प्रेक्षकांपर्यंत पोहोचवतो. विजय सेतुपतीचे डोळे बोलतात, आनंद, दु:ख, राग आणि निराशा सगळे भाव त्यातून उमटतात. अरविंद स्वामीची शांत उदासी आणि अदिती राव हैदरीचे सौम्य स्मित हे सगळे मौनातूनच अधिक प्रभावी होते.
ए. आर. रहमान यांचे संगीत या मौनाला आवाज देते. संगीत केवळ पार्श्वसंगीत म्हणून काम करत नाही तर ते कथेचा एक अविभाज्य भाग बनते आणि प्रत्येक भावना अधिक तीव्र करते. मौन आणि संगीत यांचा संयोग इतका परिपूर्ण आहे की शब्दांची गरजच भासत नाही.
छायाचित्रण हे या चित्रपटाचे आणखी एक हायलाइट आहे आणि प्रत्येक फ्रेम काळजीपूर्वक रचलेली आहे. मुंबईच्या चाळी, समुद्र, रस्ते आणि इमारती सगळे काही जिवंत झाले आहे. कॅमेरा कधी महादेवच्या डोळ्यांतून पाहतो तर कधी बोसमनच्या, कधी ती उंचावरून शहराला पाहतो तर कधी गल्लीतल्या सामान्य जीवनात शिरतो. दिवसाचा उजेड, रात्रीचे अंधार आणि पावसाचे थेंब सगळे काही भावनांना आकार देतात आणि कथा सांगण्यात मदत करतात.
एक विशेष दृश्य आहे जिथे महादेव बाल्कनीत उभा असतो आणि समोरच्या इमारतीत राहणाऱ्या मुलीकडे पाहतो. दोघांच्या नजरा भेटतात आणि तो तिला हातातून चुंबन पाठवतो, ती हसते. हे छोटेसे प्रेम, ही साधी आशा मौनात किती सुंदर व्यक्त झाली आहे हे पाहिले पाहिजे. या एका दृश्यात संपूर्ण प्रेमकथा आहे, शब्द नाहीत पण भावना इतक्या तीव्र आहेत की हृदय भरून येते.
चित्रपटात विनोद देखील आहे पण तो अत्यंत सूक्ष्म आहे. महादेव चोरी करायला जातो पण चपला बाहेर काढतो, एका ठिकाणी तो पोलिसांपासून लपतो आणि त्याचे चेहरे इतके हास्यास्पद असतात की हसू आवरत नाही. पण त्याच क्षणी जाणवते की हे हास्य आहे का किंवा दु:ख आहे. गरीब माणसाला चोरीशिवाय पर्याय नाही हे दु:खदायक आहे पण तो चोरी करतानाही संस्कार विसरत नाही हे हास्यास्पद आणि विडंबनात्मक आहे. चित्रपट या दोन्ही भावनांमध्ये संतुलन साधतो आणि जीवनाची वास्तविकता दाखवतो.
"गांधी टॉक्स" फक्त वैयक्तिक कथा नाही तर ती सामाजिक भाष्य देखील आहे. भ्रष्ट पोलिस, लाचलुचपत, गरीब आणि श्रीमंत यांच्यातील अंतर आणि मध्यमवर्गीय संघर्ष या सगळ्या गोष्टींवर चित्रपट प्रकाश टाकतो. महादेव नोकरीसाठी अर्ज करतो पण त्याला मिळत नाही कारण त्याच्याजवळ पाठबळ नाही. बोसमन संपन्न आहे पण कायदेशीर प्रकरणांत अडकतो कारण त्याच्या शत्रूंनाही पैसा आहे. दोन्ही बाजूंवर पैसा सत्ता ठरवतो आणि नैतिकता, प्रामाणिकपणा यांना फारसे महत्त्व नाही.
चित्रपट असे सुचवतो की व्यवस्था बिघडलेली आहे आणि सुधारणा करणे आवश्यक आहे. गरजूंना मदत मिळत नाही आणि श्रीमंतांनाही शांती नाही, मध्यमवर्ग दोन्ही टोकांमध्ये पिसाळलेला आहे आणि कोणालाच न्याय मिळत नाही. पैसा हे एकमेव मापदंड बनले आहे आणि मानवी मूल्ये कुठेतरी हरवली आहेत. चित्रपट हे प्रश्न उपस्थित करतो की आपण कुठे चाललो आहोत आणि आपल्याला कुठे पोहोचायचे आहे.
विजय सेतुपती या चित्रपटाचा जीव आहेत आणि त्यांच्या अभिनयात एक सहजता आहे, एक प्रामाणिकपणा. महादेव हे पात्र त्यांनी इतके जिवंत केले आहे की तो पडद्यावरून उतरून तुमच्या शेजारी बसलेला वाटतो. त्यांची प्रत्येक हालचाल, प्रत्येक हावभाव अर्थपूर्ण आहे आणि पात्राला खोली देतो. विजय सेतुपतीने या भूमिकेसाठी स्वतःला पूर्णपणे रूपांतरित केले आहे आणि महादेवच्या वेदनांना, आनंदाला आणि संघर्षाला त्यांनी प्रामाणिकपणे जगले आहे.
अरविंद स्वामी संयमी राहतात आणि ते अतिरेकी अभिनय करत नाहीत पण त्यांची उपस्थिती मात्र अत्यंत प्रभावी आहे. बोसमनची उदासी आणि त्याचा एकटेपणा हे सगळे त्यांच्या डोळ्यांतून दिसते. अदिती राव हैदरी कमी वेळ स्क्रीनवर आहेत पण त्यांची छाप राहते, त्यांचे स्मित आणि त्यांची हालचाल सगळे काही काव्यात्मक आहे. सिद्धार्थ जाधव, उषा नाडकर्णी आणि महेश मांजरेकर यांनी आपापल्या भूमिकांमध्ये उत्तम साथ दिली आहे आणि चित्रपटाला मजबूती दिली आहे.
किशोर पांडुरंग बेलेकर यांनी दादासाहेब फाळके यानी भारतीय सिनेमाचे जनक यांना सुंदर श्रद्धांजली दिली आहे. फाळकेंच्या काळातही सिनेमा मूक होता पण तो अत्यंत प्रभावी होता आणि "गांधी टॉक्स" त्या परंपरेला पुढे घेऊन जातो. चार्ली चॅप्लिन आणि बस्टर कीटन यांच्या जुन्या चित्रपटांची आठवण या चित्रपटातून येते, भारतीय संदर्भात सत्यजित रे आणि कमल हासनच्या "पुष्पक" ची छाया स्पष्ट दिसते. पण "गांधी टॉक्स" नक्कल नाही तर मौलिक आहे आणि तिला स्वतःची वेगळी ओळख आहे.
बॉक्स ऑफिसवर मूक चित्रपटाला स्वीकारले जाईल का हा एक मोठा प्रश्न आहे. आजच्या प्रेक्षकांना वेगवान कथा, मोठमोठे संवाद आणि रोमँटिक गाणी हवी असतात आणि "गांधी टॉक्स" यापैकी काहीही देत नाही. पण कलात्मक दृष्ट्या हा चित्रपट उत्कृष्ट आहे आणि तो सिद्ध करतो की भारतीय सिनेमा प्रयोग करू शकतो आणि धाडस करू शकतो. बेलेकर यांनी व्यावसायिकता बाजूला ठेवून कला निवडली आहे आणि त्यासाठी त्यांचे कौतुक व्हायला हवे.
"गांधी टॉक्स" हा फक्त चित्रपट. रील्स आणि शॉर्ट व्हिडीओंच्या युगात दोन तास शांत बसून एखादा चित्रपट पाहणे हे स्वतःच एक ध्यान आहे. चित्रपट पाहताना जाणवते की आपण किती गोंगाटात जगतो आणि आपल्याला शांततेची किती गरज आहे पण ती शोधत नाही. मौन भीतीदायक वाटते कारण त्यात आपले स्वतःचे विचार ऐकू येतात आणि आपल्याला आपल्या आयुष्याचा आरसा दिसतो."गांधी टॉक्स" हा चित्रपट मनाला शांत करतो, विचार जागवतो आणि हृदयाला स्पर्श करतो. तो दाखवतो की कला आणि व्यावसायिकता यांचा समतोल साधला तर सुंदर चित्रपट तयार होऊ शकतो, की पैसा महत्त्वाचा आहे पण मूल्ये अधिक महत्त्वाची आहेत आणि की बोलणे सोपे आहे पण मौनातही सत्य उमटते. शेवटी शब्दांशिवायही कथा सांगता येते आणि कधी कधी तीच कथा सर्वात प्रभावी असते, हे "गांधी टॉक्स" सुंदरपणे सिद्ध करतो आणि आपल्याला चित्रपटाची नवी भाषा शिकवतो
विकास परसराम मेश्राम
मु+पो, झरपडा,ता, अर्जूनी/मोर, जिल्हा गोंदिया
मोबाईल नंबर -7875592800






