गुढी पाडवा, उगाडी आणि भारतातील नववर्ष सण: परंपरा, पिके आणि संस्कृतीची कहाणी
X
Gudi Padwa celebration Maharashtra 2026 गुढी पाडवा आणि उगाडी... महाराष्ट्र, कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेश या चार राज्यांमध्ये गुढी पाडवा वा उगाडी नववर्ष दिन मानला जातो. महाराष्ट्रपेक्षा कर्नाटक, तेलंगण आणि आंध्र प्रदेशात त्याचं महात्म्य अधिक आहे. चैत्र प्रतिपदेच्या सुमारास आंब्यांच्या भाराने झाडं वाकलेली असतात. काही दिवसांत आंबे पिकणार असतात. आंब्याची डाळ आणि पन्हं हा गुढीपाडव्याचा मेन्यू असायचा.
मुंबईत अनेक कुटुंबांमध्ये गुढीपाडव्याला श्रीखंड हे पक्वान्न असायचं. मात्र महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र आणि तेलंगणात पुरणपोळी हे गुढीपाडव्याचं लोकप्रिय पक्वान होतं. कडूनिंबाच्या पानांची चटणी गूळ घालून खाल्ली जाते. कडू आणि गोड. कोकणात कडूनिंब होत नाही. चुकूनमाकून एखादं झाडं गावात असेल तर त्याच्या पानांवर गुढीपाडवा साजरा व्हायचा.
चारही राज्यांत आंब्याच्या पानांची तोरणं घराच्या दरवाजाला बांधली जातात. तेलंगणात रब्बी धानाची आवक वा खरेदी उगाडीपासून सुरु होते. खरीपाच्या पिकांची सुगी दिवाळीत त्यामुळे दिवाळीतही पाडवा असतो. तोही नववर्ष दिन. रब्बीच्या पिकांची सुगी चैत्रात, त्यामुळे चैत्र पाडवाही नववर्ष दिन. पंजाबात बैसाखी, केरळमध्ये विशू, आसाममधील दिमासा कचारी जमातीत बुशु दिमा, आसामात बिहू हे सण तिथले नववर्ष दिन आहेत. एप्रिल महिन्यात म्हणजे रब्बीच्या हंगामात ते येतात. खरीप आणि रब्बी हे दोन पिकांचे हंगाम बहुधा फक्त भारतात आहेत. मात्र हे दोन्ही शब्द अरबी आहेत. खरीप म्हणजे नैऋत्य मॉन्सूनचे वारे आणि रब्बी म्हणजे ईशान्य मॉन्सूनचे वारे. खरीपाचे वारे वाहू लागतात एप्रिल महिन्यात त्यावेळी रब्बी हंगामाची सुगी असते. रब्बीचे वारे वाहू लागतात ऑक्टोबर महिन्यात त्यावेळी खरीप हंगामाची सुगी असते.
(साभार- सदर पोस्ट सुनील तांबे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)






