Home > Top News > Dark Reality of Marathwada : सुखी संसारासाठी अंधश्रद्धेतून लग्नाआधी १९ वर्षीय मुलीचं देवाशी लग्न

Dark Reality of Marathwada : सुखी संसारासाठी अंधश्रद्धेतून लग्नाआधी १९ वर्षीय मुलीचं देवाशी लग्न

मातंग समाज कुठे अडकला आहे? मुलींना शिकवण्याऐवजी अंधश्रद्धेतील रुढी-परंपरेच्या नावाखाली त्यांचं शोषण केलं जात आहे. काय आहे प्रकरण? मातंग समाजातील वास्तव सांगणारा लेखक सुदर्शन चखाले यांचा लेख

Dark Reality of Marathwada : सुखी संसारासाठी अंधश्रद्धेतून लग्नाआधी १९ वर्षीय मुलीचं देवाशी लग्न
X

Marathwada मराठवाडा... नुसतं नाव ऐकलं तरी डोळ्यासमोर येतो तो रखरखलेला भूप्रदेश, दुष्काळ आणि त्यातूनही जगण्याची उमेद न सोडलेली माणसं. पण या सगळ्या पलीकडे, या भूमीने अनेक History इतिहास पाहिलेत, अनेक कथा-व्यथा मनात साठवल्यात. कधीकाळी Nizam's rule निजामाच्या राजवटीचा भाग असलेला हा प्रदेश, आता कुठे विकासाच्या वाटेवर पाऊल टाकण्याचा प्रयत्न करतोय, पण खरी प्रगती अजून दूर आहे. माझ्या डोळ्यासमोर अजूनही तो प्रसंग येतो, ज्याने माझ्या मनाला अक्षरशः हलवून सोडलं आणि मराठवाड्याच्या तथाकथित प्रगतीचा बुरखा फाडून टाकला.

मी, शहरात वाढलेला, आधुनिक विचारांचा माणूस. पंढरपूरच्या विठ्ठलावर साधी, सोपी, बिनखर्चिक श्रद्धा ठेवणारा. कर्मकांडांपासून शक्यतो दूरच राहणारा. पण नातेवाईकांच्या आग्रहास्तव आणि मराठवाड्यातील स्थानिक परंपरा व संस्कृती जवळून अनुभवण्याच्या उत्सुकतेपोटी, मी एका दूरस्थ ग्रामीण भागातील 'देव देवाच्या' कार्यक्रमाला जाण्याचा निर्णय घेतला. मला काय माहीत होतं, की हा प्रवास माझ्या मनावर इतका खोलवर परिणाम करेल?

गावात पोहोचल्यावर कार्यक्रमाची लगबग सुरू होती. बोकड कापण्याचा आवाज, हळदीचा सुगंध, पाहुण्यांची वर्दळ... सारं काही एखाद्या लग्नसोहळ्यासारखं भासत होतं. पण हे 'लग्न' नव्हतं. हे होतं एका निरागस आयुष्याला superstition एका क्रूर परंपरेच्या नावाखाली शोषणाच्या खाईत ढकलण्याचं दुर्दैवी चित्र.


मी पाहिलं, एक १९-२० वर्षांची मातंग समाजातील मुलगी, जिच्या डोक्यावर मुंडवळ्या बांधलेल्या होत्या आणि चेहऱ्यावर एक निरागस गोंधळ स्पष्ट दिसत होता. तिचं 'देवाशी लग्न' लावलं जात होतं. (लग्नाआधी सुखी संसारासाठी अंधश्रद्धेतून ग्यानमाळ परंपरा मातंग समाजात होते.) "चांगला नवरा मिळावा" या भाबड्या अपेक्षेने तिच्या आयुष्याची दोरी एका अदृश्य देवाच्या, किंबहुना परंपरेच्या नावाखाली चाललेल्या शोषणाच्या हाती दिली जात होती.


२१व्या शतकात, जिथे जग चंद्र-मंगळावर स्वारी करतंय, मोठमोठी यानं तयार होत आहेत, तिथे आपला समाज आजही या भयाण रूढींमध्ये गुरफटलेला पाहून माझं मन हेलावून गेलं. श्रद्धा आणि अंधश्रद्धा यातील सीमारेषा किती धूसर आहे, हे पुन्हा एकदा प्रकर्षाने जाणवलं. पंढरीच्या पांडुरंगाने आपल्याला कधीच शिकवलं आहे की, कुठलाही देव कर्मकांड मागत नाही, तर साधी भक्ती आणि जगण्यातला प्रामाणिकपणाच अपेक्षितो. पण ही साधी शिकवण आजही समाजाच्या मोठ्या वर्गापर्यंत पोहोचलेली नाही, हे कटू सत्य माझ्या डोळ्यासमोर उभं होतं.


याच कार्यक्रमात माझी एका पोतराजाशी भेट झाली. हलगी वाजवणारा तो माणूस पूर्णपणे थकूनही काहीतरी गुणगुणत होता. त्याच्या बाजूला त्याचा सोळा-सतरा वर्षांचा मुलगा ताशा वाजवत होता. लहानग्या वयातच त्याच्या चेहऱ्यावर कष्ट आणि एक प्रकारचा निराशेचा भाव स्पष्ट दिसत होता. "बापजन्मापासून आमच्या हातात डफड आहे," असं तो अभिमानाने आणि तितक्याच हिकेने सांगत होता. त्याचा आवाज त्या ढोलाच्या आवाजात मिसळून जात होता. त्या मुलाला शिक्षणाबद्दल विचारल्यावर, दारू पिलेल्या त्याच्या बापाने दिलेलं उत्तर काळजाला भिडलं: "त्याला पुढे शिकवायचं नाही, लखाई त्याला पास करते." आणि पुढे तो म्हणाला, "माझा लेक महारापेक्षा चांगलं डफड आणि ताशा वाजवतो. त्यांची पोरं आमच्यापुढे काय वाजवणार?" हे ऐकून मी लगेच म्हणालो, "काका, महाराच्या पोरांनी डफड, हलगी आणि ताशा सोडला, म्हणूनच त्यांची पोरं आज डॉक्टर, कलेक्टर, इंजिनियर झाली आहेत. आता मातंग समाजातल्या पोरांनीही बाबासाहेबांचं बोट धरून शिक्षणाकडे वळलं पाहिजे, त्यांनीही डॉक्टर, वकील, कलेक्टर झालं पाहिजे." हा संवाद कितीतरी गोष्टी सांगून गेला.



समाजाच्या एका मोठ्या वर्गाला आजही शिक्षणापासून दूर ठेवून, पिढ्यानपिढ्या एकाच साच्यात अडकवून ठेवण्याचं दुष्टचक्र आजही सुरू आहे. या प्रक्रियेत केवळ आर्थिक शोषणच नाही, तर मानसिक आणि सामाजिक गुलामीही कायम ठेवली जाते.


कार्यक्रमाचा शेवट तर अधिकच विचलित करणारा होता. स्मशानभूमीच्या दिशेने निघालेली वऱ्हाडी मंडळी आणि २५ हजार रुपये दिल्याशिवाय 'देवदेव' पूर्ण होत नाही, हे सांगणारा तो नाचणारा माणूस...


हे सारं भयाण होतं. डोक्यावर कळशी आणि लिंबाचा पाला घेऊन, हलगी-डफडच्या गजरात स्मशानभूमीकडे निघालेली ती मिरवणूक आणि तिथे पोतराजाला 'अंगात आलेला' देव, कोंबडा तोडून प्रसन्न झालेला देव... या सगळ्याच्या केंद्रस्थानी होती ती कोवळ्या वयाची अतिशय देखणी मुलगी, जिचं शिक्षण घेण्याचं वय असताना देवाशी लग्न लावलं जात होतं. मुंडवळ्या बांधलेल्या त्या मुलीला दाताने कोंबडा तोडायला लावला, हा प्रसंग पाहून मन अक्षरशः सुन्न झालं. तिच्या दुर्दशेने मन व्याकूळ झालं.


अण्णाभाऊ साठे म्हणतात ते किती खरं आहे, 'धनवंतांनी पिळले धर्मनंदांनी तसेच छळले'. याचा अर्थ असा की, गरीब, कष्टकरी, दलित, उपेक्षित आणि वंचित जातीला इथल्या धार्मिक व्यवस्थेने पद्धतशीरपणे शोषून घेतलं आहे. त्यांच्या श्रमाचं योग्य मोल न देता, भांडवलशाही आणि जातीय व्यवस्थेने त्यांचं आर्थिक शोषण केलं आहे. हे केवळ आर्थिक शोषण नाही, तर पिढ्यानपिढ्या त्यांच्या बुद्धीला आणि आत्मविश्वासाला मारण्याचा हा एक प्रकार आहे.


हे सारं मराठवाड्याच्या ग्रामीण भागात घडत असताना, मला विचार करायला लावतं की, आपण कोणत्या दिशेने जात आहोत? शिक्षणाचा प्रसार झाला, कायदे आले, पण मानसिकतेत, विशेषतः ग्रामीण भागातील रूढ विचारसरणीत, बदल झाला का? सामाजिक जाणिवेच्या पातळीवर आपण अजूनही किती मागे आहोत? मराठवाड्याच्या विकासाच्या घोषणांमागे दडलेले हे सामाजिक वास्तव आपल्याला अस्वस्थ करायलाच हवं. केवळ सिंचनाचे प्रकल्प आणि औद्योगिक विकास प्रगतीचं द्योतक नाही, तर समाजाच्या प्रत्येक घटकाला समान संधी मिळणं, त्यांना अंधश्रद्धेच्या गर्तेतून बाहेर काढणं आणि त्यांच्यात शिक्षणाची, वैज्ञानिक दृष्टिकोनाची ज्योत पेटवणं, हीच खरी प्रगती.

ही केवळ एका व्यक्तीची व्यथा नाही, तर आपल्या समाजाच्या सामूहिक अस्वस्थतेचं प्रतिबिंब आहे, ज्यावर आपण सर्वांनी मिळून गांभीर्याने विचार करण्याची वेळ आली आहे. ही केवळ चर्चा न राहता, यावर कृती होणं गरजेचं आहे. समाजातील प्रत्येक घटकाची उन्नती, हेच खऱ्या अर्थाने विकसित भारताचे स्वप्न पूर्ण करू शकेल. आपण या सामाजिक प्रश्नांकडे आणखी किती काळ दुर्लक्ष करणार आहोत?

सुदर्शन चखाले ( यशवंत नगर येरवडा पुणे 6 ) 7887630615

Updated : 22 Feb 2026 7:00 AM IST
author-thhumb

सुदर्शन चखाले

लेखक ज्योतिबा सावित्री फाउंडेशन चे संस्थापक, अध्यक्ष आहेत.


Next Story
Share it
Top