Home > Top News > Mahavir Jayanti 2026 : महावीर जयंती - तत्त्वज्ञान आणि आचरणातील दुटप्पीपणा !

Mahavir Jayanti 2026 : महावीर जयंती - तत्त्वज्ञान आणि आचरणातील दुटप्पीपणा !

महावीर जयंतीच्या निमित्ताने लेखक जगदीश काबरे यांचा लेख

Mahavir Jayanti 2026 : महावीर जयंती - तत्त्वज्ञान आणि आचरणातील दुटप्पीपणा !
X

Jainism principles महावीर जयंतीच्या निमित्ताने जैन धर्माच्या मूलभूत तत्त्वांचा आणि आजच्या जैन समाजाच्या आचरणातील बदलांचा विचार केला तर एक अत्यंत ठळक आणि विचार करायला लावणारा विरोधाभास समोर येतो तो म्हणजे त्यांच्या उक्ती आणि कृतीमध्ये सतत दांभिकपणा असतो. इतिहासात पाहिले तर महावीरांनी जे तत्त्वज्ञान मांडले होते ते मूलत: नास्तिक प्रवाहाशी संबंधित होते. त्यांनी सृष्टीच्या निर्मितीसाठी कोणत्याही सर्वशक्तिमान ईश्वराची गरज नाकारली, वेदांची अपौरुषेयता फेटाळून लावली आणि कर्मसिद्धांताच्या आधारे मनुष्य स्वतःच आपल्या मुक्तीचा मार्ग घडवू शकतो असे ठामपणे सांगितले. या भूमिकेमुळे जैन धर्म हा वेदविरोधी आणि ईश्वरनिरपेक्ष असा स्वतंत्र तत्त्वप्रवाह म्हणून उभा राहिला. परंतु आजच्या काळात जैन समाजाच्या धार्मिक व्यवहारांकडे पाहिले असता, त्यात मूर्तिपूजा, देवदेवतांची भक्ती, मंदिरसंस्कृती आणि कठोर आहारनियमांच्या माध्यमातून एक प्रकारचा नैतिक अहंकार दिसून येतो. हा बदल केवळ आचरणातील नाही, तर मूळ तत्त्वज्ञानालाच विसरून गेलेला आहे, असे म्हणावे लागते.

महावीरांनी स्पष्टपणे सांगितले होते की, सृष्टी ही अनादी-अनंत आहे आणि तिचा कोणताही निर्माता नाही. आत्मा आणि पदार्थ हे स्वतंत्र तत्त्व आहेत आणि त्यांच्यातील संबंध हा कर्मांच्या आधारे ठरतो. यात ईश्वराला कोणतीही भूमिका नाही. त्यामुळे जैन धर्मात मोक्ष मिळवण्यासाठी देवाची कृपा नव्हे, तर स्वतःच्या आचरणाची शुद्धता महत्त्वाची मानली जाते. परंतु आजच्या जैन समाजात मंदिरात जाऊन पूजा करणे, आरती करणे, व्रत-उपवासांच्या माध्यमातून पुण्यसंचय करणे आणि देवाकडे यश, आरोग्य, संपत्ती यासाठी प्रार्थना करणे ही सर्वसामान्य गोष्ट झाली आहे. ही प्रवृत्ती पाहता जैन धर्माचा मूळ नास्तिक आणि तर्कप्रधान स्वभाव हरवून बसल्याचे स्पष्ट दिसते. महावीरांनी ज्या तत्त्वज्ञानात ईश्वराची गरजच नाकारली, त्याच धर्माचे अनुयायी आज देवावर अवलंबून राहू लागले आहेत, हा मोठा विरोधाभास आहे.

याचबरोबर वेदांविषयीचा दृष्टिकोनही बदललेला दिसतो. महावीरांनी वेदांना अंतिम सत्य मानण्यास नकार दिला होता. त्यांनी ब्राह्मणवादी परंपरेतील यज्ञयाग, प्राणीहिंसा आणि कर्मकांड यांचा निषेध केला. जैन धर्माचा उदय हा त्या काळातील धार्मिक अंधश्रद्धा आणि कर्मकांडाविरोधातील एक बंड होते. परंतु आजच्या जैन समाजात अनेक प्रकारची कर्मकांडे दिसून येतात. मंदिरात विशिष्ट पद्धतीने पूजा करणे, विशिष्ट दिवशी उपवास करणे, काही ठराविक मंत्रांचे जप करणे, या गोष्टींना धार्मिक महत्त्व दिले जाते. या गोष्टींमध्ये तर्कशुद्धतेपेक्षा परंपरेचे आणि भावनांचे वर्चस्व अधिक दिसते. त्यामुळे जैन धर्माने ज्या कर्मकांडविरोधी भूमिकेतून स्वतःची ओळख निर्माण केली होती, तीच भूमिका आज दुर्बल झालेली दिसते.

जैन धर्माचा सर्वात महत्त्वाचा आणि वैशिष्ट्यपूर्ण सिद्धांत म्हणजे अहिंसा. महावीरांनी अहिंसेचा अर्थ अत्यंत व्यापकपणे घेतला होता. केवळ शारीरिक हिंसा टाळणे नव्हे, तर मन, वचन आणि कर्म यांमध्ये कोणालाही त्रास न देणे ही खरी अहिंसा आहे, असे त्यांनी सांगितले. परंतु आजच्या जैन समाजात अहिंसा हा मुख्यत्वे आहाराशी संबंधित मुद्दा बनून राहिला आहे. शाकाहाराला इतके महत्त्व दिले गेले आहे की, मांसाहार करणाऱ्यांविषयी तिरस्काराची भावना निर्माण केली जात आहे. अनेकदा मांसाहारी लोकांना कमी लेखणे, त्यांना नैतिकदृष्ट्या खालच्या पातळीवर समजणे किंवा त्यांच्याविषयी अपमानास्पद भाषा वापरणे हेही आढळते. त्यांना सोसायटीमध्ये घर विकत घेऊ न देणे, पर्युषणाच्या काळात मांसाहारी दुकाने बंद करायला लावणे, हा दृष्टिकोन महावीरांच्या अहिंसेच्या तत्त्वाशी विसंगत आहे. ही विसंगती एवढ्या टोकाची झाली आहे की, काही जैन साधू तर भूतदयेच्या नावाखाली लोकांच्या आरोग्याला बाधा आली तरी चिंता नाही म्हणत सरळसरळ खुनाखुनीची भाषा करत आहेत. पण त्यांनी हे लक्षात ठेवावे की महावीरांनी कोणत्याही प्रकारच्या द्वेषभावनेला विरोध केला होता. एखाद्याच्या आहाराच्या आधारे त्याच्याविषयी तिरस्कार करणे हीसुद्धा एक प्रकारची मानसिक हिंसा आहे. याशिवाय आजच्या जैन समाजात शाकाहाराच्या नावाखाली काही अवास्तव आणि अतिरेकी भूमिका घेतल्या जातात. उदाहरणार्थ, काही जैन पंथांमध्ये कंदमुळे खाण्यास बंदी आहे, कारण त्यात सूक्ष्म जीव असतात असे मानले जाते. परंतु आधुनिक विज्ञानाच्या दृष्टीने पाहिले असता, प्रत्येक अन्नपदार्थात सूक्ष्मजीव असतातच. त्यामुळे पूर्णपणे अहिंसक आहार ही संकल्पना व्यवहार्य नाही. महावीरांनीही अहिंसेचा आग्रह धरला असला तरी त्यांनी व्यवहारातील मर्यादा लक्षात घेतल्या होत्या. परंतु आजच्या काळात काही जैन लोक अहिंसेच्या नावाखाली अशा अतिरेकी भूमिका घेतात की त्यातून एक प्रकारचा नैतिक दंभ निर्माण होतो. हा दंभ इतरांवर टीका करण्याच्या स्वरूपात व्यक्त होतो आणि त्यामुळे समाजात तणाव निर्माण होतो.

जैन समाजातील आणखी एक महत्त्वाचा विरोधाभास म्हणजे आर्थिक आणि सामाजिक जीवनातील व्यवहार. जैन समाज परंपरेने व्यापार आणि उद्योग क्षेत्रात सक्रिय राहिला आहे. आर्थिक प्रगती, व्यवसायातील स्पर्धा आणि नफा यासाठी जे व्यवहार केले जातात, त्यात अनेकदा कठोर निर्णय घ्यावे लागतात. काही वेळा कामगारांचे शोषण, पर्यावरणाचे नुकसान किंवा अनैतिक व्यावसायिक पद्धती यांचाही समावेश असू शकतो. अशा परिस्थितीत एकीकडे अहिंसेचा आणि नैतिकतेचा पुरस्कार करताना दुसरीकडे व्यवहारात वेगळेच आचरण दिसते, हा देखील एक प्रकारचा दुटप्पीपणा आहे. महावीरांनी ज्या आत्मसंयम, सत्य आणि अपरिग्रह यांचा उपदेश केला होता, त्याची अंमलबजावणी आजच्या भौतिकवादी जीवनशैलीत फारशी दिसत नाही. या सर्व विरोधाभासांचा विचार केला तर असे दिसते की जैन धर्माचा मूळ गाभा आणि आजचे आचरण यामध्ये मोठी दरी निर्माण झाली आहे. महावीरांनी जे तत्त्वज्ञान मांडले ते अत्यंत तर्कसंगत आणि मानवकेंद्रित होते. त्यांनी माणसाला स्वतःच्या कर्मांची जबाबदारी घ्यायला शिकवले, अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांना नाकारले आणि अहिंसेच्या माध्यमातून सहअस्तित्वाचा मार्ग दाखवला. परंतु कालांतराने या तत्त्वज्ञानाचे रूपांतर एका परंपरागत धर्मात झाले, ज्यात मूर्तिपूजा, कर्मकांड आणि सामाजिक प्रतिष्ठा यांना अधिक महत्त्व दिले जाऊ लागले. हा बदल केवळ जैन धर्मापुरता मर्यादित नाही, तर अनेक धर्मांमध्ये असा बदल झालेला दिसतो. तथापि, जैन धर्माच्या बाबतीत हा विरोधाभास अधिक ठळकपणे जाणवतो, कारण त्याचा प्रारंभच नास्तिक आणि तर्कप्रधान भूमिकेतून झाला होता.

आजच्या काळात या विरोधाभासांवर खुल्या मनाने चर्चा होणे आवश्यक आहे. जैन समाजाने महावीरांच्या मूळ तत्त्वज्ञानाकडे पुन्हा एकदा पाहण्याची गरज आहे. ईश्वरनिरपेक्षता, तर्कशुद्धता आणि आत्मसंयम या मूल्यांना पुन्हा स्वीकारल्याशिवाय जैन धर्माची खरी ओळख टिकून राहू शकणार नाही. तसेच अहिंसेच्या संकल्पनेचा व्यापक अर्थ समजून घेणे आणि इतरांच्या जीवनशैलीबद्दल सहिष्णुता बाळगणेही आवश्यक आहे. अन्यथा, शाकाहाराच्या नावाखाली किंवा धार्मिक आचरणाच्या नावाखाली जो दुटप्पीपणा दिसून येतो, तो केवळ समाजात फूट पाडणारा ठरेल.

एवंच महावीर जयंती हा केवळ उत्सव साजरा करण्याचा दिवस नसून आत्मपरीक्षण करण्याची संधी आहे. महावीरांनी दिलेल्या तत्त्वांचा खरा अर्थ समजून घेऊन त्यानुसार आचरण करण्याचा प्रयत्न केला तरच त्यांच्या विचारांची खरी बुज राखली जाईल. अन्यथा, त्यांच्या नावाचा वापर करून जे आचरण केले जाते, ते त्यांच्या तत्त्वज्ञानाशी विसंगत राहील आणि त्या विसंगतीतूनच दुटप्पीपणा अधिकाधिक गडद होत जाईल. त्यामुळे जैन समाजाने या प्रश्नांवर गंभीरपणे विचार करणे आवश्यक आहे, कारण धर्माचा खरा उद्देश माणसाला मुक्त करणे हा आहे, बांधून ठेवणे नव्हे.

( या लेखातील मतं ही लेखकाची वैयक्तिक मतं आहेत. त्या मतांशी मॅक्स महाराष्ट्र सहमतच असेल नाही)

Mahavir Jayanti 2026, Jainism principles, Lord Mahavir teachings, Ahimsa meaning Jainism, Jain religion beliefs, Jain philosophy vs modern practices, Jain community issues, Jainism and atheism, Mahavir philosophy explained, Non-violence in Jainism

Updated : 31 March 2026 5:15 PM IST
Next Story
Share it
Top