BAFTA Award विजेत्या लक्ष्मीप्रिया देवी, मणिपूरच्या वेदनेला आवाज देणारा Bung चित्रपट
भडक प्रोपोगंडा फिल्म्सच्या थयथयाटात आपल्या देशातलं ‘वास्तव’ दाखवणारी कलाकृती निर्माण करण्याच धाडस लक्ष्मीप्रिया देवी यांनी बुंग चित्रपटाच्या माध्यमातून केलं आहे. काय आहे या चित्रपटाची कहाणी? BAFTA Award घेताना लक्ष्मीप्रिया काय म्हटल्या? सांगताहेत अभिनेता किरण माने..
X
A powerful Film on Manipur Violence भवताली माणुसकीची निर्घृण हत्या होत असताना... भर रस्त्यावर आईबहिणींची अब्रू लुटली जात असताना... एक जातीवंत सच्चा कलावंत काय करू शकतो? याचं मुर्तीमंत उदाहरण म्हणजे मणिपूरची लेखिका-दिग्दर्शिका लक्ष्मीप्रिया देवी !
...लक्ष्मीप्रिया आणि तिच्या सिनेमाविषयी सांगण्याआधी तुम्हाला न्यूज चॅनल्स कधीच दाखवणार नाहीत अशी भयानक गोष्ट सांगतो की अगदी कालपरवापर्यन्त, म्हणजेच २२ फेब्रुवारीपर्यंत मणिपूर अक्षरश: पेटलंय. घरांना आगी लागल्यात... माणसांचे मुडदे पडताहेत... लोक विस्थापित होताहेत... पण न्यूज चॅनल्स मात्र त्याबद्दल शब्दही काढत नाहीत. निष्क्रिय सत्ताधार्यांना जाब विचारण्याऐवजी त्यांचे तळवे चाटण्यात पत्रकारिता गुंग आहे. आज आपल्या देशातल्या एका प्रांतात हजारो भारतीय भाऊबहिणी शरणार्थी छावण्यांमध्ये रहात आहेत हे सरकारचे दारूण अपयश झाकण्याचा प्रयत्न आपला चौथा स्तंभ निकरानं करत आहे. अत्यंत लाजिरवाण्या पद्धतीनं देशाची इज्जत चव्हाट्यावर आणणारी एआय समीट असो किंवा भारतानं लोटांगण घातलेलं ट्रेड डील असो...सगळीकडे मीडियानं भाटगिरीची मर्यादा ओलांडली आहे. असो.
...तर अशा या परिस्थितीत लक्ष्मीप्रिया देवी ही एक मणिपूरी महिला एक कलावंत म्हणून प्रचंड अस्वस्थ होती. मुंबईला येऊन स्ट्रगल करणारी लक्ष्मीप्रिया लक्ष्य, तलाश, पीके अशा अनेक सिनेमांची सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम करत होती. तिच्या सोशल मीडियावरून ती मणिपुरी बांधवांसाठी आवाज उठवत होती. याच प्रचंड घुसमटीतून तिनं या अराजकावर भाष्य करणारा एक सिनेमा लिहीला - बुंग ! ‘केरला स्टोरी’, ‘काश्मीर फाईल्स’ सारख्या खोट्या, भडक प्रोपोगंडा फिल्म्सच्या थयथयाटात आपल्या देशातलं ‘वास्तव’ दाखवणारी कलाकृती निर्माण करणं म्हणजे किती मोठं धाडस आहे हे आता मी सांगायची गरज नाही. तरीही लक्ष्मीच्या धाडसाच्या पाठीशी फरहान अख्तरसारखा निर्माता उभा राहिला.
'बुंग' नांवाच्या एका ९-१० वर्षांच्या खोडकर, शाळकरी मणिपुरी मुलाच्या नजरेतून हा भवताल आपल्याला दिसतो. नोकरीसाठी शहरात गेलेला त्याचा बाप अनेक वर्ष परत आलाच नाही. अशी अफवा पसरली की जातीय दंग्यात तो मेला. बुंगला हे पटत नाही. तो आपल्या आईला सर्वोत्तम गिफ्ट द्यायचं ठरवतो... ते म्हणजे आपला बाबा घरी परत आणणे ! तो आणि त्याचा राजस्थानी बेस्ट फ्रेन्ड राजू त्या शहराकडं जायला निघतात. या प्रवासात या मुलांच्या नजरेतून मणिपूरमधली जातीय द्वेषाची तेढ, परकेपणाची भीती आणि सामाजिक-राजकीय तणाव अशा अनेक गोष्टी प्रचंड प्रभावीपणे आणि काळजाला भिडेल अशा पद्धतीनं या दिग्दर्शिकेनं दाखवलं आहे. हे दाखवताना आपण लहान मुलांच्या नजरेतून हे दाखवतोय हे भान तिनं फार नाजूकपणे जपलंय. त्यामुळं या सिनेमातली निरागसता. खेळकरपणा आणि हसरेपणा हरवला नाही.
...नुकताच बाफ्ता अवॉर्ड्स २०२६ मध्ये या सिनेमाला 'बेस्ट चिल्ड्रेन्स ॲन्ड फॅमिली फिल्म' हा पुरस्कार मिळाला. झुटोपिया, लिलो आणि स्टीच अशा हॉलीवूड फिल्म्सना मागे टाकून एक भारतीय सिनेमा हे यश मिळवतो ही साधी गोष्ट नाही... पण तरीही भारतीय मिडीयानं त्याचा फार गवगवा होऊ दिला नाही... याचं कारण सुज्ञ प्रेक्षक ओळखू शकतात. बाफ्ताचं अवार्ड घेताना स्पीचमध्ये तिनं मणिपूरच्या हिंसाचारामुळे होणार्या वेदनांचा उल्लेख केला... मणिपूर शांत व्हावा अशी कळकळीची इच्छा व्यक्त केली.
'कलाकार' असा असतो राजा !
सलाम लक्ष्मीप्रिया...कडकडीत सलाम.❤️
- किरण माने.
(साभार - सदर पोस्ट किरण माने यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे)






