Reading Culture : ग्रंथ युगाचा अस्त ?
वाचनाची सवय कमी होतेय? ग्रंथ युगाच्या अस्ताची चाहूल यासंदर्भात लेखक सुनील तांबे यांचा लेख
X
why people don’t read books अमेरिकेत आणि युरोपमध्ये वाचनाबाबत सर्वेक्षणे वेळोवेळी होत असतात. त्यांचा निष्कर्ष असा की वाचन कमी होत आहे. विशेषतः पुस्तकांचं वाचन कमी होत आहे. वयात आलेल्या अमेरिकन लोकांपैकी सुमारे ६० टक्के लोक उभ्या आयुष्यात एकही पुस्तक वाचत नाहीत. बाकीच्या ४० टक्के लोकांपैकी बहुसंख्य लोक दरवर्षी सरासरी एकच पुस्तक वाचतात. इंग्लडमध्येही वाचकांच्या संख्येत झपाट्याने घट होते आहे.
जॉर्ज स्टाईनर ह्या समीक्षकाच्या मते वाचनाचं आदर्श (क्लासिकल वा अभिजात) युग आता हळू हळू संपत चाललं आहे. आदर्श वाचन युगात ग्रंथाकडे पाहण्याचा एक खास वैशिष्ट्यपूर्ण असा दृष्टिकोन होता. उच्च प्रतीची व जिला काही खास अधिकार आहेत अशी साक्षरता तेव्हा होती. मध्यमवर्गीयांचं या जगात असलेलं वर्चस्व आणि त्या वर्गाशी संबंधित शिक्षणपद्धती व मूल्ये आज कोलमडून पडली आहेत, असं त्याचं म्हणणं होतं.
आदर्श वाचन युग संपुष्टात येतंय याचा अर्थ असा नाही की मुद्रित वा वाचनीय साहित्याचं उत्पादन घटू लागेल. १९७० साली अमेरिकेत ३६०७१ नवी पुस्तकं प्रसिद्ध झाली. १९८४ साली ही संख्या ५१०५८ च्या घरात पोचली. आता तर ह्यापेक्षा प्रचंड संख्येने पुस्तकं प्रकाशित होत असतात. नवीन मुद्रण तंत्रज्ञान कमालीचं कार्यक्षम आहे. इंटरनेट आणि माहितीच्या मायाजालामुळे माहिती वा विचार साठवण्याचं नवीन तंत्रज्ञान आलं आहे. हे तंत्रज्ञान अधिकाधिक कार्यक्षम होत जाईल. ग्रंथ युगाचा अंत आपण पाहात आहोत.
जगातला पहिला ज्ञानकोश बनवण्याचं काम डिडेरोने हाती घेतलं. तो आणि त्याचे सहकारी खाटिक, दुकानदार, शेतकरी ह्यांच्याकडे जाऊन त्यांच्या कामाची, अवजारांची, साधनांची माहिती गोळा करीत. हा काळ फ्रेंच राज्यक्रांतीचा होता. विजेचा शोध लागायचा होता. छपाई हाताने व्हायची. कागद महाग होता त्यामुळे पुस्तकंही महाग होती. डिडेरो म्हणत असे पुस्तक बाइंड झालं म्हणजे वाचलं गेलं. आधुनिक युगातला सॉक्रेटीस असं डिडेरोचं वर्णन व्हॉल्टेअरने केलं होतं. डिडेरोने असं म्हटलं होतं की छपाईच्या तंत्रामध्ये सुधारणा होतील, अधिकाधिक ग्रंथ लिहीले जातील, एक काळ असा येईल की सर्व इमारती ग्रंथांनी भरून जातील पण त्या इमारतीत राहणारे ग्रंथ वाचणारे वाचक नसतील. ग्रंथांचा महापूर आल्याने ग्रंथ संस्कृती नष्ट होईल हे भाकीत डिडेरोने १८ व्या शतकात केलं होतं.
भारतामध्ये नेहमीच अनेक काळ एकाच वेळी नांदत असतात. इथले बहुसंख्य लोक मुखी वा लिपी संस्कृतीमध्येच जगत आहेत. त्यामुळे रामायण, महाभारत, जेजुरीचा खंडोबा इत्यादी विषयांवरील दूरचित्रवाणी मालिकांना उदंड प्रतिसाद मिळतो. दूरचित्रवाणी मालिकेमुळे जेजुरीला जाणार्या भाविकांची संख्या दुपटीने वाढली असं तिथला एक हॉटेलवाला मला सांगत होता.
शब्द प्रामाण्याला आजही महत्व आहे. मग ते शब्द वेदातले असोत की आणखी कोणत्या महापुरुषांचे. पुस्तकांवर बंदी घालण्याची मागणी, लेखकाला धमक्या आजही मिळतात. देश स्वतंत्र झाल्यापासून आजपर्यंत कुठे ना कुठे आविष्कार स्वातंत्र्याचा लढा सुरूच आहे. ग्रंथ युग संपुष्टात आल्यामुळे हा लढा आता फेसबुकवरही सुरू असतो.
मुखी आणि लिपी संस्कृतीचे काही गुण अचूकपणे ऐकणं, ऐकलेलं पाठ करणं, पारायणं करणं, हे लोप पावत आहेत. मुद्रण संस्कृतीचे गुण एकाग्रतेने, बंदिस्तपणे ग्रंथांचं वाचन करणं, वाचलेल्याचा अर्थ लावणं, वाचनाद्वारे ज्ञान मिळवणं, हे भारतीयांनी आत्मसात केलेले नाहीत. वाचलेल्या पुस्तकाशी आपला संवाद होत नसेल त्यामुळे आपल्या आचरणात बदल होत नसेल तर वाचन संस्कृती रुजली आहे असं म्हणता येणार नाही, असं निरीक्षण भा. ल. भोळे यांनी नोंदवल्याचं स्मरतं.
आत्मज्ञानासाठी वाचनाची काहीही गरज नसते, हे भारतीयांनी जाणलं आहे.
(साभार - सदर पोस्ट सुनील तांबे यांच्या फेसबुक भिंतीवरून घेतली आहे.)
decline of reading habits, reading culture decline, book reading statistics, digital vs books, importance of reading, literacy trends global, reading habits survey, impact of internet on reading, book culture decline, Reading Culture, Books, Digital Age, Education, Society, Literature, Global Trends, India News






